Thursday, 8 October 2020

खरंच याने इम्युनिटी वाढेल...?


गेल्या सहा महिन्यात कोरोना महामारीने ज्या प्रकारे धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे साऱ्यांच्याच मनात भिती आहे. कोरोना झाला म्हणजे आता काय खरं नाही. हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात (1896 साल) पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथी सारखं झालं. काखेत गाठ आली म्हटलं की, लगेच सगळे घरचे भयभित व्हायचे, अन् काही काळातच त्याचा मृत्यू झाल्याने सर्व घरात शोककळा पसरली असायची. आजही तशीच परिस्थिती आहे म्हणा... त्यामुळेच त्यापासून बचावासाठी इम्युनिटी वाढवा... काढा घ्या.. ही टॅब्लेट्स घ्या.. हे चवनप्राश घ्या... असे सतत टीव्ही वरुन हॅमर केलं जात आहे. पण खरंच यामुळे इम्युनिटी वाढते का? हा खरं प्रश्न आहे.

कारण, गेल्या काही महिन्यांचा विचार केला, तर कोरोनाचा जसा संसर्ग वाढू लागला, तसतसं ही इम्युनिटी वाढवणारी टॅब्लेट्स, चवनप्राशन सगळे फिकी पडल्याचं पाहायला मिळालं. अगदी मी-मी म्हणणारे देखील कसे मृत्यूच्या दाढेत ओढले गेले हे सर्वांनी पाहिलंय. एवढंच कशाला... सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता, त्याकाळात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचेच प्रमाण जास्त होते. त्यानंतर हळुहळु हे प्रमाण वय वर्ष 21 ते 40 वयोगटाकडे सरकले. बरं या वयोगटाकडे लक्ष दिले तर, हे इम्युनिटी वाढवणारी औषधं घेत नव्हती का? तर त्याचं उत्तर होय घेत होतीच असंच आहे. पण तरीही त्यांना कोरोनाने गाठलं, अन् त्यांना आपल्या कवेत घेतलंच... असो.

जर कंपन्यांचा दावा खरा असता तर कोव्हीड सेंटर मध्ये ही इम्युनिटी बुस्टर औषधं (टॅब्लेट्स, चवनप्राश) दिली नसती का? तिथे कशाला अंडी किंवा फळं आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या असत्या. कोव्हीड रुग्णांवर उपचारांसाठी तर डॉक्टरांची फौजच दिवसरात्र मेहनत घेत होती ना. मग त्यांनी यावर खर्च करण्यापेक्षा चवनप्राश किंवा इम्युनिटी बुस्टर टॅब्सेट्सच दिली असती ना... असो...

याबाबतच एक विषय सांगायचा झाला तर... कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी पतंजलीने कोरोना किट बाजारात आणलं होतं. सुरुवातीला त्यांचा दावा होता की, हे कोरोना किट कोरोना ग्रस्तांवर उपचारासाठी रामबाण औषध आहे. पण जेव्हा यावर आक्षेप घेतला गेला, त्यावेळी पतंजलीनेही माघार घेतली. एवढंच कशाला कोरोनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना आयुष काढा, ज्यात तुळस, सुंठ, काळी मिरी, दालचिनी याचा वापर करुन बनवलेला काढाच घेण्याचे आवाहन केले नसते. त्यांनीही इम्युनिटी बुस्टर टॅब्लेट्स किंवा चवनप्राश घेण्याचं आवाहन केलं असतं. असो...

शेवटी इतकंच जाहिरातदार आपली उत्पादनं खपवण्यासाठी काय-काय शक्कल लढवतील, याचा नेम नसतो. त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य जपायचं असेल, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घेतला पाहिजे. केवळ जाहिरातबाजीवर भुलण्याची आवश्यकता नाही.

No comments:

Post a Comment