Saturday, 2 May 2026

संवेदना हरवलेली माणुसकी…!



आजच्या वेगवान युगात आपण भौतिक प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले, तरी माणूस मात्र माणसापासून दुरावत चालला आहे. समाजात घडणाऱ्या काही घटना पाहिल्या की मनात प्रश्न उभा राहतो—खरोखरच माणुसकीची धार बोथट होत चालली आहे का?


पूर्वीच्या काळी एखाद्याचे दुःख हे संपूर्ण गावाचे दुःख असायचे. आज मात्र शेजारच्या घरात काय चालले आहे, याचीही आपल्याला खबर नसते. माणुसकी म्हणजे केवळ अन्नदान किंवा आर्थिक मदत नव्हे; तर दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होणे आणि संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे होय. पण आज अनेकदा रस्त्यावर अपघात झालेला पाहून लोक मदतीला धावण्याऐवजी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यात व्यस्त दिसतात. ही संवेदनशून्यता माणुसकीची धार बोथट झाल्याचे लक्षण नाही का?


अलीकडील काही घटना हेच चित्र अधिक ठळक करतात. नर्मदा नदीतील दुर्घटना असो किंवा पहलगाममधील हल्ल्यात नवविवाहितेवर ओढवलेले दुःख—या प्रसंगांमध्ये मदतीपेक्षा दृश्यांचे चित्रीकरण आणि प्रसार अधिक झाल्याचे दिसते. ही प्रवृत्ती निश्चितच चिंताजनक आहे.


याच संदर्भात १९९३ मध्ये फोटोग्राफर केविन कार्टरने काढलेला एक फोटो जगभर गाजला होता. दुष्काळाने त्रस्त, कुपोषणाने अशक्त झालेल्या एका मुलाच्या मागे त्याच्या मृत्यूची वाट पाहणारे गिधाड—हा फोटो केवळ वास्तव दाखवत नव्हता, तर मानवी संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उभे करत होता. त्या वेळी या फोटोवर टीकाही झाली होती—कारण मदत करण्याऐवजी केवळ चित्र टिपण्याची वृत्ती लोकांना खटकली होती. आजच्या काळातही अशीच उदाहरणे पुन्हा पुन्हा दिसत आहेत.


म्हणूनच, माणुसकीची धार बोथट होऊ नये असे वाटत असेल, तर आपल्याला पुन्हा संवादाचे पूल बांधावे लागतील. मोबाईलमध्ये गुरफटत चाललेल्या पिढीला ‘माणूस’ म्हणून घडवणे गरजेचे आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची वृत्ती जोपासली, तरच ही बोथट होत चाललेली माणुसकी पुन्हा एकदा सतेज आणि प्रखर होईल.