Wednesday, 21 October 2020

कांद्याचा वांदा कोण करतोय...


काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदीवरुन मोठा गजहब माजवला जात होता. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कसे नुकसान होतंय वगैरे... वगैरेच्या प्रतिक्रीयांचा अक्षरश: ऊत आला होता. त्यामुळे त्यातील तथ्य सांगणारा ब्लॉग मी पोस्ट केला होता. त्यावर संमिश्र प्रतिक्रीया आल्या. पण यात नवल वाटलं ते माझ्या प्रगतीशील शेतकरी मित्राचं. त्याचीही प्रतिक्रीया जाणून मला थोडं अश्चर्य वाटलं. पण माझं या क्षेत्रातलं ज्ञान कमी असल्याने, मी त्याची माहिती खरी असेल, असेच मान्य केलं होतं.

पण आज जेव्हा कांद्याचे दर गगनाला भिडत आहेत, त्या मागची कारणं जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याची माहिती चुकीचीच होती याची जाणिव झाली. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय, कांद्यांचा वांदा नक्की कोण करतोय...

कारण सध्या किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने शंभरी पार केली आहे. तर घाऊक बाजारात कांद्याचे दोन भाग/दर दिसत आहेत. एक म्हणजे कांद्याचे दर नियंत्रणात राखण्यासाठी इराण आणि इजिप्तमधून मागवलेला कांदा, अन् दुसरा आपल्या भारतातील कांदा.

देशात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी गेल्या आठवड्यात इराण आणि इजिप्तमधून 600 टन कांदा आयात करण्यात आला. त्यापैकी 25 टन कांदा सोमवारी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला. या कांद्याची घाऊक बाजारात 50-60 रुपयांनी विक्री होत आहे. तर त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला नवीन कांदा 50-65 रुपयांनी विक्री होत आहे. तर या उलट जुन्या कांद्याची 85 रुपयांनी विक्री होत आहे.

आता दर पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल, की एवढी तफावत कशामुळे.. लॉकडाऊनच्या काळात कांद्याचे दर अतिशय खालावले होते. उठाव नसल्याने हे दर खालावल्याचे सांगितले जाते. यामध्ये चांगला कांदा 10 रुपये किलोने विकला जात होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. अनलॉकनंतर 10 रुपये किलोने मिळणारा कांदा 20-25 रुपये किलोने मिळू लागला. तर आता तर या दराने 50 पार केली आहे.

पुणे-नाशिक येथील स्थानिक बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने कांद्याचे दर वाढल्याचे कारण दिलं जात आहे. अन् दिवाळीपर्यंत हेच चित्र कायम राहिल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, जर स्थानिक बाजारात कांद्याला चांगला दर मिळत असेल, तर कांद्याला चांगला उठाव मिळायला हवा होता. कारण यातून शेतकऱ्यांचाच फायदा झाला असता. पण भाव वाढताच कांदा व्यापारी आणि खरेदीदारांकडून कांदा खरेदीसाठी हात आखडता घेतला गेल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, या भाव वाढीला आणखी एक कारण दिलं जातंय ते म्हणजे, हॉटेल सुरु झाल्याने बाजारात कांद्याची मागणी वाढल्याचं. आता यात कितपत तथ्य म्हणायचं... कारण तसं पाहिलं तर कोरोनापूर्वीच्या काळात, जेव्हा लॉकडाऊन सुरु व्हायचा होता, त्यावेळी ही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कांदा लागतच होता ना.... त्यावेळी अशी भाववाढ होत नव्हती. आताच जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असताना, आणि नवीन कांदा तुलनेत कमी बाजारात येईल हे माहिती असताना कांद्याचे दर वाढत असल्याचे चित्र आहेत.

याच कांद्याच्या विषयावरुन काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ सुरु होता. केंद्र सरकारने देशात कांदा निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर आंदोलनं, मोर्चे, आरोप वगैरे वगैरे सुरु झालं. मुळात भविष्यातील धोका ओळखूनच कांदा निर्यातबंदी केली असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. कारण, आधीच अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यात कांद्याचा देशात तुटवडा होऊ नये, यासाठीच ही निर्यात बंदी केली होती. पण त्यावेळी याला कडाडून विरोध झाला.

वास्तविक, निर्यातबंदीनंतरच भविष्यातील देशाअंतर्गत कांद्याची मागणी लक्षात घेऊन काही साठेबाजांकडून कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यास सुरुवात केली होती. पण त्याकडे सगळ्यांचे सोईस्कर दुर्लक्ष होते. दुसरं म्हणजे, या (आंदोलनाच्या) काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा बाजारात येऊ न शकल्याने तो गोदामात अडकून राहिला. परिणामी लांबलेल्या पावसामुळे गोदामातील कांदा खराब झाला.

अन् जो कांदा साठेबाजांनी अडवून ठेवला होता, त्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. जुना कांद्याची घाऊक बाजारात 85 रुपयांनी विक्री होत आहे. तर नवीन कांदा कांदा 50-65 रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे याचा फायदा नक्की कुणाला होतोय, याचा शोध घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment