गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या चिनी ड्रॅगनच्या घोडदौडीला आता ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे. स्वत:ला बलशाली म्हणवून घेण्यासाठी चीनने आपल्या अर्थव्यवस्थेत जे काही बदल घडवून आणले, ते बदलच त्याच्यावर उलटू लागले आहेत. सोमवारी शांघाय शेअर बाजारातील घसरण हे त्याचे एक उत्तम उदहारण म्हणता येईल. जगात दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून गणल्या जाणार्या अर्थव्यवस्थेचे पितळ आता हळूहळू उघडे पडू लागले आहे.
गेेल्या काही वर्षांपासून चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि मंदीची झालर कमी करण्यासाठी आपल्या चलनाचे अवमूल्यन करण्याचा जणू सपाटाच लावला. याचा परिणाम शांघायसह जगातील इतर देशांमधील शेअर बाजार कोसळण्यावर झाला.
तर दुसरीकडे, चीन उत्पादन करत असलेल्या उत्पादनांची विश्वासार्हता कमी झाल्याने देशांतर्गत वस्तूंची मागणी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चीनमधील आयात-निर्यातदेखील अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे, चीनची अर्थव्यवस्था एकप्रकारे मंदीच्या गर्तेत सापडली आहे. वास्तविक, चीनी अर्थव्यवस्थेचा मुख्य जोर हा आयातीपेक्षा निर्यातीवरच जास्त आहे; पण सातत्याने त्यात घटच झाली आहे. रॉयटर्स या जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार्या भारतातील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, जून अखेर चीनी वस्तूंच्या निर्यातीमध्ये ८.३ टक्क्यांची घसरण झाली. शिवाय ‘युआन’ (चीनचे चलन)च्या सातत्याने अवमूल्यनाने चीनी अर्थव्यवस्थेच्या फुग्यातील हवाच चालली आहे, असा निष्कर्ष काढला होता.
चीनने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले स्थान टिकविण्यासाठी स्थानिक उद्योगांना वारेमाप सवलती दिल्या, इथे चीन चुकला. उद्योगांना मदत करण्यासाठी देऊ केलेले कर्ज शेअर्समध्ये रुपांतरित करण्याची घोडचूक चीनने केली. सरकारचे उद्योगांना अभय मिळाल्याने चीनमधील जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला आणि त्यांनी कर्ज काढून पैसे शेअर मार्केेटमध्ये गुंतवले. त्यामुळे शेअर बाजारातील दलालांची चांगलीच चांदी झाली. एका वर्षात तब्बल १५० टक्के परतावा शेअर होल्डरांना मिळू लागल्याने शांघाय शेअर बाजारात एकच गर्दी उसळली. काही विदेशी गुंतवणूकदारांनी आपले हात ओले करून घेण्याच्या उद्देशाने डॉलर्सच्या स्वरूपात आपला पैसा शांघाय शेअर बाजारात लावला. युआनच्या अवमूल्यनाने त्याचे धक्के आता त्यांना बसू लागले आहेत.
दुसरीकडे अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानाचा परिणामदेखील चीनी अर्थव्यवस्थेवर झाला. २१व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या दरांमध्ये घसरण होऊ लागली होती. या घसरणीचा फटका वारंवार आपल्या अर्थव्यवस्थेला बसू नये, म्हणून चीनने चालाखीने खेळी करत, आपल्या ‘युआन’चे आवमूल्यन करण्यास सुरुवात केली. गेल्या सोमवारी चीनने आपल्या युआनच्या दरात तब्बल दोन टक्क्याने अवमूल्यन केले. त्याचा थेट परिणाम शांघाय शेअर मार्केेटवर झाला. शांघाय शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेले शअरचे भाव गडबडले. अन् अनेकांना अरबो-खरबोंचे नुकसान सहन करावे लागले.
वास्तविक, इतर राष्ट्रांवर दबदबा निर्माण करण्यासाठी चीनला १९७८पासून वेगाने प्रगती करण्याची हाव जडली. त्यासाठी त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेची कवाडे इतर देशांना उघडी करून दिली. १९७८ ते २००५ या काळात चीनने आपला विकास दर असा काही वाढवला की, हा आकडा बघून सगळे जग अचंबित झाले. १९७८ साली चीनचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) १५३ अमेरिकन डॉलर होता. मात्र, तोच जीडीपी २००५ साली एक हजार २८४ अमेरिकन डॉलरपर्यंत फुगला होता. हा आकडा पाहून जगातील गुंतवणूकदारांनीच नव्हे, तर अर्थतज्ज्ञांनीदेखील तोंडात बोटे घातली. चीनने आपला हा आकडा वाढविण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना बोलावून आपल्या देशात दुकान थाटावे आणि देशवासीयांना गडगंज बनवावे, यासाठी उद्योजकांना अनेक गाजरे दाखवली. अन् यावर भुललेल्या गुंतवणूकदारांनी विविध मार्गाने या देशात भली मोठी गुंतवणूक केली. शेअर बाजारात ही गुंतवणूक सर्वात मोठी होती, भारतीय रुपयांनुसार हा आकडा सात लाख कोटी इतका मोठा होता. आज हा सर्व पैसा शांघायच्या बाजारात बुडाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही, असे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडे अजून तीन हजार कोटी डॉलर्सची गंगाजळी शिल्लक असल्याने तिचा वापर अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे मत शेअर बाजारातील घसरणीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुरामन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील असे चढ-उतारांपासून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. उलट व्यक्तिगत पातळीवर शेअर बाजारातील अशी घसरण हा नव्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णकाळच असतो.