Saturday, 3 October 2020

खरंच हे कधी थांबणार?


सध्या हाथरस प्रकरणामुळे संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेत एका मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा असून, उत्तर प्रदेश सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. यात राजकीय पक्षांसह डाव्या माध्यमांनी उडी घेतली आहे. त्यामुळे ते याचे राजकीय भांडवल करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, नुकत्याच बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्ष याचं राजकीय स्वार्थासाठी भांडवल करताना दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रातही यावरुन चांगलं राजकारण सुरु असून, शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.

या प्रकरणा योगी आदित्यानाथ सरकारला टार्गेट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन हे कधी थांबणार?’ असा सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया ताईंचा सवाल खरंच सर्वांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण, बलात्कार, छेडछाड, विनयभंग आता रोजच्याच घटना होत आहेत. कारण, स्त्री म्हटलं की, तिला उपभोगाची वस्तू समजून, सतत तिच्याकडे वाईट नजरेतूनच पाहिलं जातं. एखादी मुलगी रस्त्यावरुन जात असेल, तर तिच्याकडे वासनांध नजरेनं पाहण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच मग बलात्कार, विनयभंग अशा घटना समोर येत आहेत.

पण खरंच याला जबाबदार कोण? असा प्रश्न असा प्रश्न विचारला, तर त्याचं एकमेव उत्तर मिळतं ते म्हणजे आपली चित्रपट सृष्टी. कारण, ज्या पद्धतीत आपल्या चित्रपट सृष्टीत स्त्रीला उपभोगाची वस्तू दाखवली जाते, त्याला कोणही आटकाव करताना दिसत नाही. सर्रास प्रत्येक चित्रपटातून बेड सीन, किसिंग सीन दाखवले जातात. त्यामुळे याचा नव्या पीढिवर विपरित परिणाम होत आहे. आज आपली ही चित्रपट सृष्टी आजच्या नव्या पीढिवर इतकी हावी झाली आहे की, जो-तो त्याच दुनियेत जगत आहे. त्यामध्ये मुलांसोबत मुलीदेखील तेवढ्याच पुढारलेल्या आहेत. आजच्या मुली अंग प्रदर्शन करण्यावर भर देतायत. तर मुलं ही एक नाही दुसरी या मानसिकतेतून वागत आहेत. त्यामुळे एकप्रकारे सगळीकडे सावळागोंधळ आहे. बरं यावर काही बोलायला गेलं की लगेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेमी गळे काढायला सुरुवात करतात. म्हणे, चित्रपट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रभावी माध्यम आहे वगैरे... अन् आपापल्या नजरेतून तो अभिव्यक्त होत असतो, असे एक-ना अनेक उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात होते. असो... त्यामुळे सुप्रिया ताई जो प्रश्न विचारतायत, तो या चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक यांना का विचारु नये?

आपल्या महाराष्ट्रात चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये. या घटनेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर पेट्रोल टाकून भर दिवसा जाळण्याचा प्रकार झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची एकच लाट उसळली होती. जो तो त्या नराधमाला कठोर शासन करण्याची भाषा बोलत होता. त्यामुळे सरकारने ही 30 दिवसात निकाल लावला जाईल, असं छातीठोक पणे सांगितलं गेलं. पण झालं काय..? तर आज ऑक्टोबर उजाडला; तरी त्याचा ना पत्ता.. ना गुन्हेगाराला शिक्षा... असो...

कालच एक बातमी वाचनात आली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या बलात्काराच्या घटनांसंदर्भातील. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडत असून, मुंबईचा थेट दुसरे स्थान आहे.  विशेष म्हणजे मुंबईतला दोषसिद्धीचा दर देखील 30 टक्के असल्याचं यामध्ये सांगितलं आहे. हे असतानाच काल आणखी एक घटना समोर आली ती पुणे जिल्ह्यातून. चाकूचा धाक दाखवून पिंपरी-चिंचवड मधील चाकणमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर नवी मुंबईतील नेरुळमध्ये मुलाच्या संगोपनासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तर सदर मुलगी गर्भवती राहिली आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतात, त्या नागपूर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. तिथे तर कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचं वृत्तपत्रातील बातम्यांमधून दिसून येत आहे. यामध्ये एका घटस्फोटित महिलेशी शरीर संबंध प्रस्थापित करुन, त्याची अश्लिल फित बनवून सतत महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते. या पोलिसाला सध्या बडतर्फ केलं असलं, तरी प्रश्न तोच उपस्थित होतो, या घटना थांबणार तरी कधी? त्यामुळेच की काय हाथरसवरुन राजकारण करणाऱ्या संजय राऊत यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. कोरोना काळातील पनवेलमधील घटनेचा संदर्भ देऊन, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा संजय राऊत झोपले होते का? असा सवाल विचारला आहे.

बलात्कारावर आणखी बोलायचं झालं, तर सध्या देशभरात आणखी जे प्रकरण धुमाकूळ घालत आहे, त्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही सुशांतच्या जुन्या मॅनेजरवर काहीतरी विपरित घडल्याचा दावा रिपब्लिक टीव्ही आणि भाजपा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यात एक राज्याचा मंत्री देखील अकडलेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जर बलात्काराच्या घटनेतच राज्याचा एखादा मंत्री अडकलेल्याचं खरं मानलं, तर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहतील. असो...

आता आपण पुन्हा हाथरस प्रकरणाबद्दल विचार करुया..., या प्रकरणात त्यामुलीवर बलात्कार झाला हे मान्यच. त्याचं कुणीही समर्थन करणारच नाही. कारण अशा पाश्वीवृत्तीचं कधीही समर्थन करुच नये, उलट अशा घटना करणाऱ्या नराधमांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अखून दिलेल्या नितीनुसार, एकतर चौरंगा करावा, किंवा त्याचा कडेलोट करावा. पण जर यावरुन राजकारण... राजकारण... आणि केवळ राजकारणच होणार असेल, तर ते का सहन करावं.

कारण, तसं पाहिलं तर नुकत्याच बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतरच या प्रकरणाला हवा दिली गेली. कारण, ही घटना 14 घडली सप्टेंबरला. अन् 25 सप्टेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच या प्रकरणाने जोर धरला. यात डावी माध्यमांकडून जो नेहमीचा प्रपोगेंडा केला जातोय, तो खरंतर चिड आणणाराच आहे. कारण, देशाच्या कोणत्याही राज्यात निवडणूक जाहीर झाली की, ज्या राज्यात भाजपा सरकारमध्ये आहे, त्या राज्यातील एखादं प्रकरण काढायचं, आणि मतदान होईपर्यंत ते तापवत ठेवून वेगवेगळ्या जातींमध्ये भितीचं वातावरण तयार करायचं.. याच नितीचा वापर ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी केला. Divide and rule… यानंतरच्या काळातही याचा वापर राजकारण्यांनी केल्याचं प्रत्येकवेळी पाहायला मिळत आहे. दोन जातीत वितुष्ट निर्माण करणारी वक्तव्ये करायची. त्यावरुन दंगली भडकवायच्या आणि आपलं सत्तेचं स्वप्न साध्य करायचं.

गेल्या काही वर्षात डावी माध्यमं देखील याच नितीचा वापर करताना दिसत आहेत. निवडणूक जाहीर झाली की, भाजपा शासित राज्यातील एखादं प्रकरण काढायचं, ते मतदान होईपर्यंत सतत तापवायचं, एकदा का मतदान झालं... की ते तसंच ते हावेत विरु द्यायचं. ही डाव्यांची मोडस ऑपरेंटी सिस्टीम आज बिहार निवडणुकीच्या निमित्ताने वापरली जात आहे. कारण का? तर बिहारमध्ये यादवांसोबतच दलित मतांचे देखील मोठे प्रमाण आहे. त्यामुळे त्यांना भिती दाखवून निवडणुकीला वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न आहे.

या तर्काला बळ मिळेल अशी घटना कालच समोर आली आहे. इंडिया टूडेची पत्रकार तनुश्री पांडे हथरस प्रकरणातील पीडितेच्या भावाला फोन करुन असा काही दबाव टाकत आहे, की हे सरकार कशाप्रकारे दंडशाहीचा वापर करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नात आहे. याबद्दलची ऑडिओ संभाषण सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, यातून तनुश्रीच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहेत. असो...

त्यामुळे सुप्रिया ताईंनी जो सवाल उपस्थित केला आहे, तो एकार्थाने  सर्वांनाच आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. यात मग समाजातील मंडळी असतील, राजकीय नेते मंडळी, माध्यमे, या सर्वांनीच आत्मपरिक्षण करायची गरज आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी एखादे प्रकरण पकडायचे, अन् त्यातून शक्य तितका राजकीय लाभ मिळवायचा. याला मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. जे राहुल गांधी हाथरस प्रकरणावर तावातावाने बोलत आहेत, त्यांनी वर्ध्यातील जळीतकांड प्रकरणात मौन का बाळगलं हे आधी देशाला सांगितलं पाहिजे. शिवाय जे शरद पवार आज योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीचं अवलोकन करावं, अन् बलात्काराच्या घटनेतील आरोपींचा कडेलोट किंवा चौरंगा करावा. तरच बलात्काऱ्यांना जरब बसेल... अन् त्यावेळी सुप्रिया ताईंनाही हे विचारण्याची वेळ येणार नाही की, हे सगळं कधी थांबणार...!

No comments:

Post a Comment