काल महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर ही यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीच्या पोस्टचा पाऊस पडल्याचे दिसून येत होते. पण त्यात एक गोष्ट खटकणारी होती. कारण, हल्लीच्या पीढिला यशवंतराव चव्हाणांचा परिचयच नसल्याचे दिसून आले. अगदी मी-मी म्हणणारे पत्रकारितेतल्या व्यक्तींना देखील यशवंतराव चव्हाणांची साधी तोंड ओळख देखील नसावी, हे फारच अश्चर्याचे म्हणावे लागेल.
कारण, अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहताना जो फोटो पोस्ट केला होता. तो खरं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्मित केलेला, आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला, 'यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची' या चित्रपटात स्वर्गीय यशवंतरावांची भूमिका साकारणाऱ्या अशोक लोखंडे यांचाच फोटो पोस्ट करुन आदरांजली वाहिली होती. आणि स्वर्गीय यशवंतरावांबद्दलच्या आपल्या सहृद भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे या पोस्ट पाहताना महाराष्ट्राचे शिल्पकाराचा परिचय आजच्या पीढिला नसावा, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, "जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही. जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल; तर प्रथम तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करावा लागेल." पण यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टरांचे हे वाक्य खरंच गांभीर्याने कधी घेतलं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. की केवळ थोर महापुरुषांचे फोटो आणि त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथी साजरी केली म्हणजे, आपले इस्पित साध्य झाले म्हणायचे.
खरंतर ब्रिटीश काळापासून आपल्याला एक शापच लागलेला आहे. लॉर्ड मॅकलेने आपली भारतीय शिक्षण पद्धती मोडित काढून, पाश्चिमात्य शिक्षण पद्धती अंमलात आणली. इंग्रजी शिक्षण घेणे म्हणजे वाघिणीचे दूध पिण्यासाराखे आहे, असे विचार भारतीय जनमानसावर बिंबवून आपली गुरुकुल शिक्षण पद्धती अक्षरश: मोडित काढली. मॅकलेच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे नीट संज्ञापन होण्याऐवजी, वरवरचे शिक्षण देऊन मार्क कसे मिळवायचे, यावरच भर देण्यात आला. त्यामुळे आपल्याकडे शिक्षणाऐवजी, चांगले मार्क घेऊन नोकरीच्या बाजारात उतरणारी एक फॅक्टरी निर्माण झाली.
अन् याच फॅक्टरीतून तयार होऊन, सॉरी शिक्षित होऊन बाहेर पडलेली आजची पीढि आपल्या इतिहासाला साफ विसरत चालली आहे. त्यामुळे आपले महापुरुष कोण? त्यांनी समाजासाठी काय आणि कोणत्या प्रमाणात बलिदान दिले. हे देखील आपण साफ विसरुन चाललो आहोत.
आजच्या पीढिला आपल्या महापुरुषांचा मातृभाषेत लिहिलेला इतिहास पचनी पडत नाही. उलट तोच इतिहास मोड-तोड करुन दिला असेल, तर तो नव्या पीढिला लगेच अॅक्सेप्ट होतो.
दुसरीकडून चित्रपटातून जो इतिहास रंजक पद्धतीने मांडला असतो, तोच खरा आहे म्हणून आजची पीढि मार्गक्रमण करत आहे. अन् त्या चित्रपटात महापुरुषांची व्यक्तीरेखा साकारणारे कलाकारच आपल्याला खरे महापुरुष वाटत आहेत. त्यामुळेच आजच्या पीढिला खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे.
केवळ रट्टा मारुन, पाठांतर करुन परिक्षेत मार्क नक्कीच मिळतील. पण त्यातून महापुरुष समजणार नाहीत. त्यामुळे 'वाचाल तर वाचाल', नाहीतर सर्वनाश निश्चित आहे.