Wednesday, 17 June 2015

इंदिरा ते नरेंद्र मोदी आणि बांगलादेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍याने काय साध्य झाले? तर दोन देशांमधील बहुप्रतिक्षित प्रश्‍न मार्गी लागले, तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तानला बांगलादेशमधून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. या दौर्‍यात स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीवेळी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींंनी केलेल्या कामाचा यथोचित सन्मान झाला. मध्यंतरीच्या काळातील या देशासोबत भारताचे संबंध कमालीचे ताणले गेले होते, ते पुन्हा जुळून येण्यासाठी संपुआ सरकारने पुढाकार घेतला नाही, पण भारतात सत्तांतर होताच सीमाबळकटीवर भर देणार्‍या मोदी सरकारने बांगलादेशासोबतचे जुने प्रश्‍न मार्गी लावल्याने, ताणलेले संबंध सुदृढ होण्यास मदत झाली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रेनॉल्ड रेगेन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘जो देश स्वत:च्या सीमा बळकट करू शकत नाही, तो देश स्वत:ला सार्वभौम म्हणूच शकत नाही.’ त्यामुळे या सार्वभौमत्वासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाच्या सीमा बळकट करणे गरजेचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिकाधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. आपला एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताना नेपाळ, भूतान, श्रीलंका, चीन आदी देशांशी परस्पर सहकार्य करार करीत, त्यांनी प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले, तसेच या देशांमध्ये भरघोस गुंतवणूक करून भविष्यात सैनिक तळ उभारण्याच्या दृष्टीने नेपाळ, भूतान, श्रीलंका आदी देशांमध्ये रोड मॅप तयार केला. देशाच्या चतु:सीमेमधील एक भाग राहिला होता, तो म्हणजे बांगलादेश. नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौर्‍यात मोदींनी ही कसरदेखील भरून काढली. मोदींनी आपल्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यात ४१ वर्षांपासून भिजत पडलेला सीमावाद निकाली काढला आणि तब्बल वीस कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करून ‘आपण कूटनीतीतील आधुनिक कौटिल्य’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 

त्यांच्या या दौर्‍यात जवळपास २२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. यात दळणवळण, व्यापार, समुद्री सुरक्षा आदींचा प्रमुख्याने समावेश आहे. हे करार भविष्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणारे आहेतच, पण त्याचबरोबर भारताने आता आशिया खंडात स्वत:ची महासत्ता बनण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या वाटचालीचे द्योतक आहे.

भारत-बांगलादेश संबंध

बांगलादेश हा भारताचा सर्वात जवळचा शेजारी आहे. भारतामुळेच या देशाचा जन्म झाला. या दोघांमध्ये जवळपास चार हजार किलोमीटरची भू-सीमा आहे. बांगलादेश हा एकमेव असा देश आहे, ज्याच्याबरोबर भारताची सर्वांत मोठी आणि लांब सीमारेषा आहे. ही सीमारेषा चीनसोबत असलेल्या भारताच्या सीमारेषेपेक्षाही ही लांब आहे. त्याचबरोबर बांगलादेश हा सार्क, बिमॅस्टिक, भारत-ओशन रिम असोसिएशन (IORA) आणि कॉमनवेल्थमध्येदेखील सहकारी देश आहे. 
या शिवाय बांगलादेश हा दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या दोन उपखंडांना जोडणारा देश असल्याने भारताच्या दृष्टीने बांगलादेशाचे भौगालिक स्थान महत्त्वाचे आहे. अलीकडेच भारताने ‘लूक ईस्ट पॉलिसी‘ ऐवजी ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’ हे धोरण अवलंबले आहे. या ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’ला मूर्त रूप द्यायचे असेल, तर भारताला बांगलादेशशिवाय पर्याय नाही. 

स्वतंत्र बांगलादेश निर्मिती आणि भारत

१९७१ साली स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीवेळी हे दोन्ही देश अतिशय जवळ आले. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय जगतात शीतयुद्ध चांगलेच पेटले होते, त्यावेळी फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पूर्व पाकिस्तानचा वापर करून भारताला कात्रीत पकडण्याचे उद्योग इस्लामाबादमधून सुरू झाले. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान याह्याखान यांनी पाकिस्तानी हवाईदलाला आदेश देऊन ‘रॅपीड ऍक्शन फोर्स’ला ३५० किमीपर्यंत भारतीय हद्दीत घुसवले. त्यांनी आग्र्याजवळ येऊन बॉम्ब टाकत भारतीय धावपट्ट्या निकामी केल्या. अवघ्या काही तासांच्या अवधीत भारतीय लष्करानेदेखील त्या धावपट्ट्या पूर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली. ही घटना घडते तोच, दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने सीमेवरही हल्ला चढवला. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४ हजार किमी प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश १९७२च्या शिमला करार तरतुदीत सद्भावनेचे प्रतीक म्हणून परत केला गेला, पण पाकिस्तान पुन्हा आपल्यावर उलटेल, याची जाणीव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना असल्याने त्यांनी आपले डावपेच जास्त प्रखर केले आणि समुद्रमार्गे पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स व एक पाणबुडी बुडवून भारतीय नौदलाने कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.
पाकिस्तानच्या बांगलादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून पाकिस्तानी हवाईदल उद्ध्वस्त केले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर अखेर गुढघे टेकले. जवळपास ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले. अशा रितीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य हवाईदल हा नावलौकीक प्रस्थापित केला व युद्ध थांबले. 

अटलजींच्या गौरवामागचे कारण

या युद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने त्या काळचा पूर्व पाकिस्तान आणि आत्ताच्या बांगलादेशीयांवर अनन्वित अत्याचार सुरू केले होतेे. त्यामुळेच बांगलादेश मुक्ती संग्रामाचे प्रणेते शेख मुजीबुर रेहमान यांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी लावून धरली. त्याला स्थानिकांचादेखील मोठा प्रतिसाद मिळत होता. याचा फायदा घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामासाठी भारतीय सैन्याची रसद पुरवली. या सर्व घडामोडींमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दुहेरी भूमिका बजावली. पहिली म्हणजे, लोकसभेत विरोधी बाकावर बसून इंदिरा गांधी सरकारला समस्यांच्या गांभीर्याची जाणीव करून दिली आणि दुसरीकडे पडद्याआड राहून समस्येच्या निवारणासाठी ठोस उपायदेखील सुचवले. 
विशेष म्हणजे, युद्ध संपून बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर अटलजींनीच ‘बांगलादेश मुक्ती’ संग्रामाबद्दल लोकसभेमध्ये इंदिरा गांधींचे अभिनंदन केले आणि आपल्या अभिनंदनपर भाषणात त्यांनी त्यांचा उल्लेख ‘मॉं दुर्गा’ असा केला. अटलजींचा हा मोठेपणाच होता. एकीकडे विरोधी बाकांवर बसताना विरोधकांची ठाम भूमिका वटवायची आणि दुसरीकडे देशावर येऊ घातलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करायचे. अटलजींच्या याच भूमिकेमुळे बांगलादेश सरकारने त्यांचा ‘फे्रंण्डस ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर’ पुरस्कार देऊन सन्मान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्‍यावेळी हा सन्मान पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आला.

गुरू तैसा शिष्य

पंतप्रधान मोदी हे तर अटलजींचेच शिष्य असल्याने त्यांनादेखील बांगलादेश आर्थिक, सामरिक आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असल्याची जाणीव आहे. कारण बांगलादेशच्या निर्मितीनंतरही उभय देशांमध्ये आज जवळपास चार हजार किलोमीटरची भू-सीमा असूनही, भारताला बांगलादेशसोबत सागरीमार्गेच व्यापार करावा लागतो आहे. दुसरीकडे, चीनने हिंद महासागरात ‘स्ट्रींग ऑफ पेरील्स’च्या माध्यमातून भारताची मोठी कोंडी केली आहे. ती कोंडी तोडण्यासाठी श्रीलंका, मालदिव, सोमालिया यांच्याप्रमाणेच बांगलादेशदेखील तितकाच महत्त्वाचा आहे, पण याकडे संपुआ सरकारने दुर्लक्षच केले होते. याचा परिणाम चीनने हिंद महासागरात आपले हातपाय पसरवण्यात झाला. मोदींना या सर्व गोष्टींची जाणीव असल्याने त्यांनी भारताच्या सीमा बळकट करण्यावर भर दिला आणि शेजारील राष्ट्रांमधील कच्चे दुवे शोधून त्यासोबत करारांच्या माध्यमातून त्यांना बांधून ठेवले अन् चीनला जशास तसे उत्तर दिले.

अपयशी कॉंग्रेस सरकार
बांगलादेश सोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात कॉंग्रेस सरकारला अपयश आले. या अपयशालादेखील तशी दोन कारणे होती. एक तर आवामी लिगचा पाडाव करून बांगलादेशमध्ये सत्तेत आलेले खालिद झिया यांचे सरकार. या सरकारचे पहिल्यापासूनचे धोरण भारतविरोधी होते. त्यामुळे सत्तारूढ होताच, या सरकारने भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आणि दहशतवादालाही चांगलेच खतपाणी घातले. उल्फासारख्या फुटीरवादी संघटनेला आश्रय देऊन सीमेवर चांगलाच उपद्रव माजवला. त्यामुळेच तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ‘जर तुम्ही दहशतवादी कारवायांना लगाम घातला नाही, तर तुमची आर्थिक नाकेबंदी करू’ अशी तंबीच दिली. २००९ मध्ये शेख हसिना यांनी पुन्हा बांगलादेशाच्या सत्तेची सूत्रे हातात घेतली आणि त्यांनी लगेचच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यामुळेच सीमेवरील दहशतवादी कारवाया कमी झाल्या. 

निमित्त ‘लॅण्ड बाऊंडरी अग्रीमेंट’चे

आता मोदी सरकारवर जबाबदारी होती, ती आर्थिक नाकेबंदी उठवून बांगलादेशला जवळ करण्याची. कारण एकीकडे चीनने भारताच्या भोवती फास आवळलाच होता, तो फास सैल करण्यासाठी मोदींनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून देशाच्या सीमा बळकट करण्यावर अधिक भर दिला. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम भूतानचा दौरा केला, तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून बांगलादेशाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. कारण भूतान आणि बांगलादेश हे दोन्ही देशच चीनने भारताची केलेली कोंडी तोडण्यास उपयोगाच्या ठरू शकतात. त्यामुळे बांगलादेशला जवळ करायचे असल्यास, ४१ वर्षांपासून लटकलेला ‘लॅण्ड बाऊंडरी अग्रीमेंट’चा प्रस्ताव निकाली काढल्याशिवाय मार्ग नाही, याची जाणीव मोदींना होती. त्यामुळे लोकसभेत त्यांनी हा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून घेतला. या करारान्वये, दोन्ही देशातील सरकारांनी वार्‍यावर सोडलेेली आणि विकासापासून वंचित अशी बांगलादेशातील ५१ खेडी (क्षेत्रफळ ७ हजार ११० एकर) भारताकडे हस्तांतरित करण्यात आली, तर भारतीय सीमेवरील १११ खेडी (क्षेत्रफळ १७ हजार १६० एकर) बांगलादेशाकडे हस्तांतरित करण्यात आली. या करारामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी कमी-अधिक प्रमाणात या भू-भागाचे हस्तांतरण झाले असले, तरी यामुळे भारतात होणार्‍या घुसखोरीला लगाम घालण्यात यश मिळणार आहे, तसेच व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. 

बससेवेला हिरवा झेंडा
या एकमात्र कराराखेरीज अन्य २२ करारांवर उभयदेशांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. यात प्रामुख्याने व्यापार आणि दळणवळणाशी संबंधित करार आहेत. त्याचबरोबर, भारतातर्फे २० कोटी अमेरिकन डॉलर देण्याचे मान्य करून दोन अब्ज डॉलरची के्रडिट लाईन देण्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे भारताला दुहेरी फायदे मिळणार आहेत. एक तर भारताला आता व्यापारासाठी सागरी मार्गांऐवजी भू-मार्गाचा अधिकाधिक वापर करता येणे शक्य होणार आहे तसेच चीनच्या हिंद महासागरातील कुरापतींवर अंकुश ठेवता येणार आहे. 
या दौर्‍यात आणखीन एक महत्त्वाची बाबींवर उभय देशांमध्ये सहकार्य करार झाले तो म्हणजे, हे दोन्ही देश मिळून आंतरराष्ट्रीय रस्तेविकासाचा प्रकल्प हाती घेणार आहेत. बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ या चार राष्ट्रांमधून एक सामूहिक रस्त्याच्या प्रकल्पाची घोषणा या भेटीदरम्यान केली गेली. दुसरा प्रकल्प म्हणजे कोलकाता, ढाका आणि आगरतळा, तसेच गुवाहटी, शिलॉंग आणि ढाका अशी बससेवा सुरू केली आहे. या रस्तेविकासाच्या प्रकल्पामुळे परिवहन परिक्षेत्र (ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर) निर्माण होणार आहे. यातून रस्त्याच्या माध्यमातून व्यापार वाढणार आहे. 
व्यापारासाठी जे थांबे तयार केले जातात, ते आजपर्यंत विकसितच झाले नसल्यामुळे व्यापार समुद्रमार्गे करावा लागत होता आणि भारतीय निर्यातदारांची शोकांतिका होती. या पार्श्‍वभूमीवर हाती घेतलेले रस्तेविकास प्रकल्प तडीस जाणे फार गरजेचे आहे. या रस्त्याच्या माध्यमातून भारताचा ईशान्य भाग बांगलादेशसोबत जोडला जाणार आहे. यामुळे व्यापाराबरोबरच लोकांचा लोकांशी संपर्क वाढणार आहे. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा हे नरेंद्र मोदी यांच्या या दौर्‍याचे विशेष महत्त्व आहे.

ममता बॅनर्जींनाही केले आपलेसे

या दौर्‍याच्या निमित्ताने आणखीन एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा. तिस्ता नदीवरून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारला तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जींनी चांगलेच जेरीस आणले होते. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बांगलादेश दौर्‍यावेळी तिस्ता पाणीवाटपाचा प्रश्‍न अजेंड्यावर घेतल्याने, शिष्टमंडळातून ममता बॅनर्जी यांनी काढता पाय घेतला. याचे कारण, एक तर तिस्ता नदीमुळे बांगलादेशला चार हजार टीएमसी पाणी मिळते, पण उन्हाळ्यात तिस्ताच्या पाण्याची पातळी तब्बल एक हजार टीएमसीपर्यंत खाली घसरते, ज्यामुळे पश्‍चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होते. जोपर्यंत पश्‍चिम बंगलामध्येच या प्रश्‍नावर एकमत होत नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न चर्चेत घेणे योग्य नसल्याने, मोदींनी दौर्‍या आधीच हा प्रश्‍न चर्चेच्या अजेंड्यामधून वगळला. त्यामुळे ममता बॅनर्जी दौर्‍यात सहभागी झाल्या.
पाकला इशारा
या दौर्‍यावेळी मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोेरेखित झाली. ढाक्यामधील प्रत्येक चौकात मोदींचे कटाऊटस् त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते, तसेच त्यांच्या स्वागतानिमित्त ढाका विद्यापीठातील बंगबंधू सभागृहात आयोजित कार्यक्रमात मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. बांगलादेशच्या भूमीत दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करा, असे सांगून दहशतवादाने कुणाचेच हित झालेले नाही. त्यामुळे असल्या कुरापती बंद करा, असा सज्जड दम मोदींनी पाकिस्तानला पुन्हा एकदा भरला.

इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी

बांगलादेशच्या विरोधी पक्षनेत्या खालिद जिया यांचा या दौर्‍याच्या निमित्ताने त्यांच्या भूमिकेतदेखील बदल झालेला दिसला. कारण शेख मुजीबुर रेहमान यांच्यानंतर सत्तेत आलेल्या जमात - ए - इस्लामीने भारताच्या ईशान्येकडील भागात चांगलाच उच्छाद मांडला होता. इतकेच नव्हे, तर मोदींच्या दौर्‍याअगोदर ‘शेख हसिना या भारताची कठपुतली असल्याची’ टीका खालिद जिया करीत होत्या, पण मोदींच्या भेटीनंतर त्यांच्या भूमिकेतदेखील नरमाई आल्याचे जाणवले. 
एक काळ असा होता की, इंदिरा गांधींनी बांगलादेशला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केल्याबद्दल बांगलादेशमध्ये इंदिरा गांधींचा जयजयकार होत होता, पण आता काळ बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रूपाने देशालाच नव्हे, तर जगाला विकासाची नवी दृष्टी देणार्‍या पंतप्रधानांचा काळ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचाच जयघोष सुरू आहे.

Friday, 29 May 2015

मंगोलिया- एक ब्रह्मास्त्र

प्रसन्न जोशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पूर्वोत्तर देशांचा दौरा पूर्ण केला. या दौर्‍यात चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाला भेट देऊन विविध व्यापार उदीम करार केले. मंगोलियाच्या दौर्‍यावेळी त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करून, चीनला जशास तसे उत्तर दिले. ही गुंतवणूक पाहून चीनचेदेखील डोळे विस्फारले आहेत. कारण मंगोलिया हे भारताच्या हातचे एक ब्रह्मास्त्र आहे, जे मोदी सरकारला या वर्षपूर्तीनिमित्त प्राप्त झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन, मंगोलिया, दक्षिण कोरिया आदी देशांचे दौरे केले. या दौर्‍यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण करार केले. चीनची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ‘मेक इन इंडिया’ला मोठी बळकटी दिली. मंगोलियासारख्या देशात गुंतवणूक करून, चीनला ‘इट का जवाब पत्थर से’ दिला आहे. कारण नुकतेच चिनी राष्ट्रध्यक्ष शी झिनपिंग यांनी पाकिस्तानचा दौरा केला. या दौर्‍यावेळी ‘मी माझ्या लहान भावाला भेटायला आलो आहे,’ असे वक्तव्य करून, भारताला छेडण्याचा उद्योग केला, पण त्यावेळी जितका बाऊ झाला नसेल, तितका बाऊ हा मोदींच्या मंगोलिया भेटीनंतर झाला. सोशल नेटवर्किंग साईटस्वर भारताच्या मंगोलियातील गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी करण्यास सुरुवात झाली. माध्यमांतूनदेखील याचे पुरेसे विश्‍लेषण न करता, त्यावर टीकाच झाली. काही वृत्तपत्रांनी तर मोदींना देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. मात्र, मंगोलियातील सामन्य नागरिक दिसतो, अशा आशयाचे मथळे प्रकाशित करून भारतीय जनतेमध्ये मोदींविरोधात खतपाणी घातले. त्यामुळेच भारतीय जनतेला ही गुंतवणूक व्यर्थ असल्याचे वाटत असावे, पण चीनची गुंतवणूक आणि मंगोलियातील गुंतवणूक यामधील फरक आणि याचे दूरगामी असणारे परिणाम याकडे डोळस नजरेने पाहण्याची गरज आहे.
दुर्दैवाने असे न झाल्याने अशा गंभीर विषयांवर विडंबनात्मक टीका-टिप्पणी सुरू आहे. चीन आणि मंगोलियाच्या दौर्‍यावर तशी झालीदेखील. वास्तविक, आज आंतरराष्ट्रीय जगतात जे वारे वाहत आहेत, ते पाहिल्यास जागतिक अर्थव्यवस्था बदलाच्या नव्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे देश परस्परांचे कट्टर शत्रू समोरासमोर येऊन ठाकले होते, पण कालांतराने रशियाचे विघटन झाले आणि रशियातील छोटे-छोटे देश बाहेर पडले. त्यामुळे आंतराराष्ट्रीय जगतात अमेरिकेचीच मक्तेदारी निर्माण झाली, ती आजपर्यंत कायम आहे.
मंगोलियाचे महत्त्व
मंगोलिया हा देश रशिया आणि चीन या दोन महाकाय देशांना खेटून वसलेला देश आहे. सन १२०६ साली मोगल सम्राट चंगेज खानने ‘मंगोल साम्राज्या’ची स्थापना केली, पण या साम्राज्यातील युवाम राजघराण्याच्या पतनानंतर मंगोल साम्राज्यदेखील संपुष्टात आले अन् तेथे एक वेगळाच संघर्ष निर्माण झाला. तो म्हणजे जमीनदारविरुद्ध कामगार वर्ग. या वर्ग संघर्षाने मंगोलियाच्या स्वातंत्र्याची मागणी जोेर धरू लागली. १९११ पासून ते १९२१ पर्यंत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी येथील लोक कडवा संघर्ष करीत होते. वर्ग संघर्षाचा फायदा घेत, कम्युनिस्टांनी मंगोलियामध्ये आपले चांगले हातपाय पसरवले आणि सोव्हिएत रशियाच्या मदतीने १९५४ साली मंगोलियाच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. सोव्हिएत रशियामुळे मंगोलियाला मात्र ओझ्याखाली काम करावे लागले, पण १९८९ साली सोव्हिएत रशियाचेच तुकडे झाले आणि एकप्रकारे मंगोलियाला रशियाच्या बेडीतून मुक्ती मिळाली, पण हातची सत्ता जाण्याने कम्युनिस्टांचे पित्त खवळले. त्यांनी चीनकडून मंगोलियावर दबाव आणण्यास सुरुवात केली.
चीनची भिंत आणि मंगोलिया
चीन आणि मंगोलिया यांच्यातील वितुष्टाचे आणखीन एक कारण म्हणजे चीनची भिंत. या भिंतीचा वाद हा मध्यंतरीच्या काळात थेट व्हाईट हाऊसपर्यंत जाऊन धडकला आहे. वास्तविक, चीनने उत्तरेकडील आक्रमणे थोपवण्याच्या नावावर ६४०० किलोमीटरची भली मोठी भिंत उभारली, पण ही भिंत उभारत असताना, सीमा भागातील देशांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप शेजारील राष्ट्रांनी केला. मंगोलियादेखील त्यातीलच एक देश. या भिंतीच्या नावावर चीनने आपली भूमी बळकावली असून, त्यामुळे ३०० फूट खाली असलेल्या सोन्यांच्या खाणींचे अतोनात नुकसान केेले असल्याचा आरोप मंगोलियाने सातत्याने केला, पण चीनने आपल्या दादागिरीने मंगोलियावर दबाव टाकून हे आरोप धुडकावले आहेत. त्यामुळेच मंगोलियानेदेखील चीनच्या भिंतीशेजारी खाण उत्खननाचे परवाने विविध कंपन्यांना देऊन चीनला ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.
ड्रॅगनची हाव
सध्या चीनला अमेरिकेला टक्कर देण्याची हाव जडली आहे. त्यासाठी तो सोव्हिएत रशियाप्रमाणे आसपासचे देश बळकावत आहे. मंगोलियादेखील बळकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १५ लाख ५६ हजार क्षेत्रफळ असलेल्या या देशाची आजची लोकसंख्या जवळपास ३० लाखांच्या घरात आहे. या देशाची अर्थव्यवस्था युरेनियम आणि तांबे यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे, पण तुटपुंज्या उत्पन्नामुळे देशाच्या सर्व गरजा भागवणे या देशाला अडचणीचे जात आहे. चीनने हाच डाव साधला आहे. चीनने मंगोलियाला परावलंबी बनवण्याचा घाट घातला आहे. मंगोलियातील जवळपास ८० टक्के बाजारपेठ आज चीनने बळकावल्या आहेत. त्यामुळे मंगोलियाची जवळपास सर्व गंगाजळी चीनमध्ये जात आहे.
मोदींची ‘ऍक्ट इस्ट पॉलिसी’
पंतप्रधान मोदी यांनी या सर्वच गोष्टींचे अतिशय बारकाईने निरीक्षण करून आणि भविष्यात संभावित धोक्याची घंटा लक्षात घेऊन, ऍक्ट इस्ट पॉलिसीचा आवलंब केला आहे. या धोरणारनुसार पूर्वेकडील मोठ्या देशांना उद्योगाच्या दृष्टिकोनातून बांधून ठेवणे आणि छोट्या-छोट्या देशांमध्ये गुंतवणूक करून त्यांना जवळ करणे हा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जो सर्वात प्रथम दौरा केला तो भूतानचा.जो देश चीनला खेटून आहे अन् तेथेही जलविद्युत प्रकल्पांसाठी दहा कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. ज्यातून वीज तर मिळवलीच, पण चीनपासून दूर करून स्वत:जवळ घेतले. त्यानुसारच आपल्या कार्यकालाचे एक वर्ष पूर्ण करताना, पुन्हा पूर्वोत्तर भागाकडे लक्ष केंद्रित करून आधी चीन, नंतर मंगोलिया आणि मग दक्षिण कोरियाचा दौरा केला. दि. १४ मे रोजी ते चीनमध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या आपल्या दौर्‍यात त्यांनी चीनसोबत जे करार केले, त्यामध्ये केवळ व्यापार वृद्धी हाच दृष्टिकोन होता. त्याने एक प्रकारे ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेला बळकटी दिली, पण दि. १७ मे रोजी ते मंगोलियाला गेले, त्यावेळी मंगोलियामध्ये त्यांनी सांस्कृतिक विकास, वायू दल सक्षमीकरण आणि सायबर सुरक्षा आदी विषयांसंदर्भातील करारामध्ये एक अब्ज कोटींची गुंतवणूक केली. हे तीन विषयच चीनला रुचले नाहीत.
सांस्कृतिक पहल
कारण ज्याप्रमाणे चीनमध्ये बौद्ध धर्म हाच श्रेष्ठ धर्म आहेे. त्याचप्रमाणे मंगोलियामध्ये देखील बौद्ध धर्मच श्रेष्ठ धर्म आहे. मंगोलियातील जवळपास सर्वच नागरिक हे बौद्ध धर्मिय आहेत. अनेक बौद्ध लेणी मंगोलियात आहेत, तसेच भारतीय संस्कृतीचे दाखले देणारी अनेक मंदिरेदेखील आहेत. हाच सांस्कृतिक धागा पकडत मोदींनी सांस्कृतिक विकासासाठी गुंतवणूक केली आहे.या आधी तिबेट घशात घालण्याच्या दृष्टीने चीनने तिबेटवर आक्रमण केले. यामुळे दलाई लामा आणि त्यांच्या अनेक शिष्यांना परागंदा व्हावे लागले. दलाई लामांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनचे पित्त खवळले. त्यातून १९७२ साली चीनने भारतावर चाल केली. यावेळी भारताला सपाटून मार खावा लागला. याची कारणे आज बरीच सांगितली जातात, पण महत्त्वाची काही कारणे म्हणजे, एक तर त्यावेळी आपल्याकडे स्वत: बनवलेली शस्त्रास्त्रे नव्हती. जी होती, ती रशियाकडून उचलावी लागत होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे रशियाकडून मिळणारी शस्त्रास्त्रांची रसद अपुरी पडत होती. वाहतूक मार्गच ठप्प झाल्याने या युद्धात आपल्याला सपाटून मार खावा लागला, पण आज तशी परिस्थिती नाही मोदींनी ‘मेक इन इंडिया’द्वारे शस्त्रास्त्र स्वावलंबी बनण्याचा संकल्प सोडला आहे.दुसरे कारण म्हणजे रशियन बनावटीची जी उपलब्ध लढाऊ विमाने होती, त्यासाठीदेखील विमानतळ नव्हते. कारण एक तर तो सर्वच भाग डोंगराळ भाग होता अन् स्वातंत्र्य प्राप्त होऊन दोन दशकांचा काळ लोटला होता. त्यामुळे या भागांमधून रस्तेविकास आणि विमानतळ विकसित झालेले नव्हते. बरं इतर देशांकडून मदत मिळवावी म्हटलं, तर तेही शक्य नव्हते. कारण त्यावेळी नेहरूंवर पंचशील तत्त्वाची पट्टी चढलेली होती, ही उतरवणं अशक्य बनल्याने, हा पराभव सहन करावा लागला. त्यावेळीच जर अशा छोट्या देशांशी सहकार्य वाढवले असते, तर युद्ध काळात भारताला त्याचा उपयोग होऊन पराभवाचा सामना करावा लागला नसता, पण देशाचं दुर्दैवच म्हणावे लागेल.
जशास तसे उत्तर मिळेल
या युद्धानंतर चीनने भारतीय सीमाभागात प्रचंड घुसखोरी करून भारतीय भूभाग बळकावला. पाकिस्ताननेदेखील यासाठी चीनला वेळोवेळी रसद पुरवली. तेव्हा इतिहासाची ही पुनरावृत्ती होऊ नये, म्हणूनच मोदींनी आपल्या मंगोलिया दौर्‍यात वायुसेनेला तळ उभारता यावे, या दृष्टीने गुंतवणूक केली. कारण आज चीनला अमेरिकेला टक्कर देण्याची हाव जडली आहे. जर चीनने पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास, वायुसेनेचा उपयोग करून मंगोलियन सैन्य चीनमध्ये घुसवावे अन् ड्रॅगनच्या शेपटावर घाव घालून गिळंकृत केलेला भारतीय भूभाग परत मिळवता येईल.
सावध ड्रॅगन
चीनला याचा आता अंदाज येऊ लागल्याने चीननेदेखील सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी एक नवी शब्दावली वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘एशियाटिक कंट्रीज’ या नावाची ही शब्दावली म्हणजे एकप्रकारे छोट्या-छोट्या देशांना गिळंकृत करणे अन् दुसरीकडे मोठ्या देशांना ‘अशिया खंडातील छोटे-मोठे देश एकत्र आल्यास, अमेरिकेशी दोन हात करून आपणही महासत्ता बनू शकतो,’अशी दिवास्वप्ने दाखवणे. तेव्हा आज ना उद्या चीनी ड्रॅगन पुन्हा भारतावर झडप घालण्याची शक्यता आहे. त्यावेळी जर मंगोलियातील विमानतळांवर भारतीय लढाऊ विमाने तयार ठेवल्यास, चीनच्या भारतावर आक्रमणांना चोख प्रत्युत्तर देता येईल. त्यासाठीच हा वायुसेनेवर खर्च करण्यात आला आहे.
धोका सायबर क्राईमचा
राहिला विषय तो सायबर क्राईमचा. देशाला सायबर क्राईमचा मोठा धोका आहे. हे सर्व खेळ चीन आणि पाकिस्तान गळ्यात गळे घालून खेळत आहे. चीनने तर स्वत:च्या देशात गुगलसारख्या सर्चइंजिन वापरावर बंदी घातली आहे अन् फक्त स्वत:च विकसित केलेले ब्राऊजर वापरण्याची सक्ती देशातील जनतेला केली आहे. त्यामुळे या देशातील बहुतेक साईटस् चोरणे इतर देशांतील सायबर गुन्हेगारांना आजपर्यंत जमले नाही, तर दुसरीकडे भारतात सायबर गुन्ह्याचे प्रमाण लक्षणीय आहे. हे सर्व खेळ चीन आणि पाकिस्तानमधून खेळले जात असल्याचा संशय वारंवार आपल्या गृहखात्याने व्यक्त केलेला आहे. त्यावर लगाम घालण्यासाठी भारतालादेखील चीनी ड्रॅगनची नाळ ओळखणारा साथीदार हवा आहे.
ब्रह्मास्त्र
मंगोलियालादेखील चीनच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करून घेण्यासाठी एक आश्‍वासक सहकारी हवा आहे. भारतातील सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने मंगोलियाला हा आश्‍वासक चेहरा दिसत आहे. त्यामुळेच मंगोलियानेदेखील दोन पावले पुढे येऊन, भारताशी सहकार्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. मंगोलियाच्या या यशस्वी खेळीनंतर चीनला पोटशूळ उठला आहे, पण चीनची आज स्थिती सहनही होत नाही आणि धड सांगताही येत नाही, अशी आहे. कारण चिनी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारतासोबतचे जे करार झाले आहेत, ते चीनचे हात बांधण्यासाठी झालेले आहेत. मंगोलियाच्या विषयावरून जर हे करार तोडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांचेच व्यवसायिक बंधू त्यांच्यावर उलटून सत्तेतून खाली खेचण्यात मागे पुढे पाहणार नाहीत, अशी भीती शी झिनपिंग यांना आहे. त्यामुळेच चीननेदेखील तूर्तास सावध भूमिका घेत, आपला संघर्ष भारताशी नसून, अमेरिकेशी आहे, असे जाहीर केले आहे. त्यासाठीच शी झिनपिंग यांनी ही ‘एशियाटिक कंट्री’ची टूम काढली आहे, जेणेकरून भारताचा रोष न ओढावता आपला स्वार्थ साधता येऊ शकेल, पण वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या बुद्धिचातुर्याद्वारे मंगोलियाचे ब्रह्मास्त्र प्राप्त केले आहे. ज्याचा उपयोग भविष्यात चीनवर करता येईल.
९९७०६४९००१

prasannajoshi89@gmail.com

Thursday, 8 January 2015

धोनीच्या निवृत्तीचा वाद

२०१४च्या पूर्वसंध्येला क्रिडा क्षेत्राला धक्का देणारी घटना घडली ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रीकेट मधून घेतलेल्या निवृत्तीची. धोनीच्या निवृत्तीचे वृत्त बाहेर आले आणि अनेक क्रीकेटप्रेमींच्या नववर्ष स्वागत कार्यक्रमाच्या उत्साहाला विरजण लागले. धोनीचा कसोटी क्रीकेटमधून निवृत्तीचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक असला तरी त्याचे वृत्त बाहेर येण्याच्यावेळाने अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. अन या प्रश्‍नांच्या आधारावर तज्ज्ञांकडून देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे वृत्त बाहेर येण्याच्या दुसर्‍या दिवशी असाच एक तर्क लढविला जात आहे तो, म्हणजे या निवृत्तीमागे रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील जवळकीचा. शास्त्री आणि कोहली यांच्या जवळकीवरून जे चर्वितचर्वण सुरू आहे त्याचे फलित नेमके काय: का एकाचे खापर दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रकार आहे. तसेच धोनीला देखील शास्त्रीबुवांची आणि कोहलीची ही जवळकी इतकी का खटकावी? हा देखील प्रश्‍न आहे.
वास्तविक, धोनीची कसोटी सोबतच एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी कर्णधार पदी नियुक्ती करण्यात रवी शास्त्रीनींच महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यावेळी गुरू ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दित सौरभ गांगुली यांच्या सोबत सुरू झालेल्या शितयुद्धाने भारतीय क्रीकेट संघाची वाताहत झाली होती. त्याचवेळी भारतीय नियामक मंडळाने काही काळापुरते रवी शास्त्री, व्यंकटेश प्रसाद आणि रॅबिन सिंग यांची हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. धोनीमधील नेतृत्त्वगुण ओळखुन त्याच्यावर कर्णधारपदाची धुरा द्यावी असे शास्त्रींनीच सुचवले होते. त्याला त्यावेळच्या नियमाक मंडळाने देखील सहमती दर्शवली होती. त्यामुळे शास्त्रींनीच धोनीला कर्णधार पदी आरुढ केले होते असे म्हणलास वावगे ठरणार नाही.
धोनीने आपल्यावर सोपावलेली जबाबदारी लिलया पार पाडली. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकालातील कसोटी मालिकेतील एकूण ६० सामन्यांपैकी २७ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला. तर १८ सामने अनिर्णित राहिले. तसेच त्याच्याच नेतृत्त्व काळात भारतीय संघ अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाने टॉप ५ मधून कधी टॉप १ तर कधी टॉप २ पर्यंत मजल मारली. अशा या चमकदार र्नतृत्त्वाला काळानुरूप अनेक संकटांचादेखील सामना करावा लागला. मात्र तरीही त्याला समर्थपणे तोंड देत धोनीने आपल्यातील नेतृत्त्व गुणांचा परिचय सर्वांना करून दिला. अशा या नेतृत्वानेच विराट कोहली नावाचे रत्न हेरुन काढले. २००८ साली १९ वर्षांखालील विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने संघाचे नेतृत्व करून भारताला विश्‍व चषक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानाच त्याला भारतीय संघात समावेश झाल्यानंतर त्याला खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य धोनीने दिले. धोनीच्या नेतृत्वशैलीमुळेच विराट कोहली मधील उत्कृष्ट फलंदाजीचे आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाचे गुणांना बहर आला. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी देखील धोनीला पुरेपुर सहकार्य केले. तेव्हा मग धोनीच्या या निर्णया मागे या दोघांचा हाथ असण्याचे वृत्त म्हणजे दुसर्‍यावर खापर फोडण्याचा प्रकार आहे का? असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
तसेच धोनीच्या निवृत्तीची घोषणा धोनीने स्वत: केलेली नसून नियामक मंडळाकडून झाली आहे. कारण जेव्हा हे वृत्त बाहेर आले त्याचवेळी नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी पीटीआयाला दिलेल्या माहितीनुसार धोनीने जेव्हा फोन करून निवृत्ती घेण्याची माहिती दिली, त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटपेक्षा एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. तसेच ते पुढेही म्हणाले, ‘‘धोनीने मला सांगितले की, निवृत्तीचा निर्णय सहकार्‍यांना कळवल्याशिवाय जाहिर करू नये.’’ तर मग असे असेल तर मग बीसीसीआयने देखील इतर खेळाडूंच्या निवृत्तीच्या घोषणेप्रमाणे धोनीला पत्रकार परिषद घेऊन स्वत:च निवृत्ती जाहिर करण्यास का सांगितले नाही? हा देखील प्रश्‍न उद्भवतो. कारण पटेल यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘‘एखाद्या खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय त्याचा वैयक्तीक असतो. अन तो त्यांनीच जाहीर केलेला असतो.‘‘ आजपर्यंत अनेक खेळाडूंनी आपली निवृत्ती स्वत: पत्रकार परिषद घेऊन जाहिर केली. मग तो ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटींग असेल, सौरभ गांगुली असेल, सचिन तेंडूलकर असेल अशी एकना अनेक नावे सांगता येतील.या सर्वांनी आपली निवृत्ती पत्रकारांसमोर सांगितली. मग धोनीनेच का आपली निवृत्ती जाहीर करण्यास बीसीसीआयला सांगितले. तो स्वत: देखील हा निर्णय जाहिर करू शकला असता. कारण आजपर्यंत धोनीने कधीही आडपडद्याने खेळी केलेले एकीवात पण नाही. तर मग निवृत्तीसाठी हा आडपडदा कशासाठी? असे अनेक प्रश्‍न क्रीकेट प्रेमींसोबत माजी क्रीकेट खेळाडूंनादेखील पडले आहेत. त्यामुळे या निर्णयावर सर्वच माजी खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
माजी क्रिकेट पटू चंदू बोर्डे, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर सुनिल गावसकर आदीमंडळींनी निवृत्तीचा निर्णय अनपेक्षित असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच हा निर्णय स्वत: घेतला नसून घ्यावा लागला आहे. त्यातच गेल्या काही क्रिकेट मालिकांमधील ड्रेसिंग रुममधील वातावरणात कमालिचा बदल झाला आहे. तिसर्‍या कसोटी सामन्याच्या सुरूवातीलाच शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यातील वाद हाणामारी पर्यंत पोहचला. धोनीच्या वेळीच मध्यस्थीमुळे वादावर पांघरूण घातले गेले. त्यामुळे अशा वादांना कंटाळून तर धोनीने निवृत्ती जाहीर केला का? का याच्या मागेदेखील आणखी कोण आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे. या प्रकरणातील पडद्यामागील खरा सुत्रधार अजूनही अनभिज्ञ आहे. जेव्हा हा खरा सुत्रधार समोर येईल त्यावेळीच असले प्रश्‍न उपस्थित होण्यास पुर्ण विराम मिळेल.

अमेरिकेची गोची

 अमेरिकेचे पाकिस्तानवर असलेले एकतर्फी प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळेच अमेरिका पाकिस्तानला मदत करण्यास नेहमी पुढे सरसावते. याचा आणखी एक प्रत्यय  अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी आला. केरी यांनी या परस्पर भिन्न प्रतिक्रिया देत असताना मात्र, अमेरिकेची दुटप्पी भूमिका जगासमोर उघडी पाडली आहे. झाले असे की, पेशावर हत्याकांडानंतर पाकिस्तानने आपल्या तुरुंगात असणार्‍या दहशतवाद्यांना फासावर लटकावण्याची एक वेगळी मोहीमच सुरू केली अन् आपण दहशतवादविरोधी लढ्यात इतर देशांसोबत आहोत, असा कांगावा अंतरराष्ट्रीय जगतात निर्माण केला. हे पाहूनच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानवर चांगलेच खुश झाले. त्यांनी पाकिस्तानला, ‘‘तुम्ही दहशतवादविरोधी लढ्यात चांगली कामगिरी करीत अहात’’, असे प्रमाणपत्र देऊन टाकले. पाकिस्तानला ही शाबासकी चांगलीच भावली. याचाच गैरफायदा घेत त्यांनी पुन्हा आपले मगरीचे अश्रू ढाळीत अमेरिकेकडून मिळणारी मदत वाढवून मिळण्याची मागणी सुरू केली. त्यासाठी २००९ साली झालेल्या केरी-ल्युगर-बर्मन विधेयकाचे कारण समोर केले अन् दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी ५३२ दशलक्ष अमेरिकी डॉलरची मागणी केली. आपण कात्रीत सापडणार हे लक्षात आल्यानंतर परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांकडून याप्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; पण यासर्व प्रकरणामुळे अमेरिकेची चांगलीच गोची झाली आहे.

वास्तविक, अमेरिकेने तालिबानविरोधी लढ्यासोबतच रशियाला आपले पाय पसरण्याची संधी मिळू नये, यासाठी अमेरिकेचे नागरी तळ उभे करण्याच्या दृष्टीने २००९ साली पाकिस्तानसोबत एक करार केला. (केरी-ल्युगर-बर्मन या नावाने तो प्रसिद्ध आहे.) या करारान्वये पाकिस्तानला कोणतीही लष्करी मदत पुरवण्याविना इतर विकासकामांसाठी दरवर्षी १.५ मिलियन अमेरिकन डॉलर देण्याचे अमेरिकेने मान्य केले. पाकिस्तान आधीपासूनच पैशांसाठी अमेरिकेवर अवलंबून असल्याने, या ना त्या कारणाने पैसे पदरात पाडून घेण्यासाठी पाकिस्ताननेदेखील या करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर अमेरिकेकडून दरवर्षी १.५ मिलियन अमेरिकन डॉलर पदरात पडल्यानंतरदेखील पाकिस्तानची हाव संपलेली नव्हती अन् भविष्यात अमेरिका आपल्यावर उलटू नये, यासाठी पाकने दहशवाद्यांना पोसले अन् त्यांच्याकरवीदेखील पुष्कळ माया जमवली.
पण २००९च्या लादेनच्या खातम्यानंतर पाकची दहशतवाद्यांकडून मिळणारी रसद चांगलीच आटली. शिवाय, २००८ साली झालेल्या सत्तांतरानंतर दहशतवाद्यांनी इम्रान खान आणि ताहिर उल कादरी यांना उठवून बसवले अन् त्यांच्यामार्फत शरीफ सरकारला चांगलेच जेरीस आणून, सरकारला आपल्या मुठीत ठेवले. मात्र, आयएसआयने दहशतवाद्यांविरोधी मोहीम उघडल्यानंतर आणि इसिसच्या इस्लामिक देशातील वाढत्या लोकप्रियतेमुळे अफगाण-पाक भागातील दहशतवाद्यांचे चांगलेच पित्त खवळले. त्यातूनच त्यांनी पेशावर हत्याकांड घडवून आणले. या घटनेने शरीफांची खुर्ची दोलायमान झाली. यावर तत्काळ ठोस भूमिका घेतली नाही, तर आपल्याला खुर्चीवर पाणी सोडावे लागले, या जाणिवेतूनच शरीफांनी पाकिस्तानी कारागृहात बंद असलेल्या तेराशे दहशतवाद्यांना फासावर लटकावण्यास सुरुवात केली अन् आंतरराष्ट्रीय जगतात आपण दहशतवादी लढ्यात इतर देशांसोबत आहोत, असा कांगावा सुरू केला. वास्तविक, पाकिस्तानने ज्या दहशतवाद्यांना फासावर लटकवले, ते एकप्रकारे दहशतवाद्यांसाठी निरुपयोगी होते. त्यामुळे दहशतवाद्यांनीदेखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ना कोणता हल्ला करून पाक सरकारला इशारा दिला. आपले प्रयत्न व्यर्थ जाणार, या जाणिवेतून पाकने अमेरिकेसमोर रडगाणे पुन्हा सुरू केले अन् दहशवाद्यांशी सामना करण्यास मिळणारी मदत तुटपुंजी आहे, ती वाढवून मिळावी, अशी याचना केली. एकतर्फी प्रेमाने भाळलेल्या अमेरिकन केरींनी ‘‘तुम्ही दहशतवादाशी चांगला सामना करीत आहात’’, असे शाबासकीवजा प्रमाणपत्र देऊन टाकले. या शाबासकीवर केरींना भारताने खडे बोल सुनावले आणि आपण पाकिस्तानला असे प्रमाणपत्र दिलेच कसे? असा प्रश्‍न विचारला.

एकीकडे भारत-पाकिस्तान यांच्यात दहशतवादी करवायांवरून द्वंद्व सुरू असताना, अमेरिकेन परराष्ट्रमंत्र्यांकडून दिलेल्या या प्रमाणपत्रावर भारतदेखील असमाधानी होता. आपल्या पुढच्या आठवड्यातील नियोजित भारत दौर्‍यात याचे गंभीर पडसाद उमटू शकतील, या जाणिवेनेच केरींनी आपले प्रवक्ते जेन साकी यांच्याकडून असे कोणतेही प्रमाणपत्र आपण दिले नसल्याची सारवासारव केली. मात्र, केरी त्याच आठवड्यात भारत दौरा आटोपून इस्लामाबादलादेखील जाणार असल्याने, पाकिस्तानला आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयानेही अमेरिकेकडून ५३२ दशलक्ष डॉलर मदत मिळण्याची शक्यता सूचित केली आहे. यामुळे अमेरिकेची दुहेरी गोची झालेली आहे. कारण एकीकडे अमेरिकेला बसणार्‍या आर्थिक मंदीच्या झळीमधून उभारण्यासाठी भारतासोबतचे सुधारणारे हितसंबंध जपावेत की, रशियाचे हातपाय आवळण्यासाठी पाकिस्तानचे चोचले पुरवावेत, अशा दुहेरी कात्रीत अमेरिका सापडलेली आहे.