Tuesday, 22 March 2022

काश्मीर फाईल्स- डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का देणारा चित्रपट


दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. पण काहींना या चित्रपटामुळे पोटशूळ उठला आहे. त्यामुळे थेट टिका करण्याऐवजी; ते पडद्याआडून टिका करत आहेत. वास्तविक, या चित्रपटामुळे डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का दिला आहे.

कारण, ज्या पद्धतीने डाव्यांचा गढ मानल्या जाणाऱ्या जेएनयूमधून त्यांची मोडस ऑपरेंटी सिस्टिमद्वारे निष्पाप तरुणांचा ब्रेन वॉश करुन, त्यांना देशविरोधी कारवायांमध्ये अडकवले जाते. त्यावर जोरदार आघात या चित्रपटातून केला आहे. अन् यात पल्लवी जोशीने साकारलेल्या राधिका मेननच्या पात्रामुळे डावी मंडळी प्राध्यापिकेचा बुराखा पांघरुन, कशापद्धतीने तरुणांना मिसगाईड करतात, अन् आपला अजेंडा पुढे रेटतात हे अतिशय समर्पकपणे दाखवले आहे. त्यामुळेच अनेकांना यावर पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे.

दोन दिवसापूर्वीच्या सकाळच्या पूरवणीमध्येही श्रीराम पवार यांच्यासारख्या ज्य़ेष्ठ पत्रकारांचा एक लेख छापून आला आहे, त्यातून ही मळमळ अतिशय स्वच्छपणे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी व्ही.पी.सिंह सरकारचा दाखला देऊन अटलबिहारी वाजपेयी यांनी आवाज का उठवला नाही, वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले.

वास्तविक, श्रीराम पवार काय किंवा स्वरा भास्कर काय एकाच माळेचे मणी. कारण, जर या चित्रपटातून तत्कालिन काश्मिरमधील विदारक स्थिती जशी आहे, तशी दाखवली नसती, आणि नेहमीप्रमाणे मुळमुळीत दाखवली असती, तर त्यांनीच हा चित्रपट कसा चांगला आहे? हे ओरडून ओरडून सांगितले असते. पण या चित्रपटातून डाव्यांच्या इकोसिस्टिमलाच जोरदार धक्का लागल्याने, ते आपली मळमळ या-ना-त्या प्रकारे व्यक्त करत आहेत. असो...

मी पत्रकारिता शिकत असताना गोवा फिल्म फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या राक्षसीवृत्तीवर आधारित चित्रपट पाहिला होता. त्याचे नाव आज आठवत नाही. पण त्यातील काही दृष्ये आठवतात. कारण, चित्रपटाची धाटणी देखील अशीच होती.

ज्या मुस्लिम महिला तालिबान्यांचे कायदे पाळत नाहीत, त्यांचाही असाच शेवट केला जात होता. जसा दि कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शेवटच्या भागात कश्मिरी पंडित महिलेला मारल्याचं दाखवले आहे. त्यावेळी तिथले अनेक विश्लेषकांनी या चित्रपटाचे कौतुक केलं होतं.

पण असंच वास्तव, जेव्हा आपल्याकडे दाखवलं जाते, त्यावेळी ते एकांगी वाटतं. कारण, का तर यातून एखादा ठराविक वर्गाची इको सिस्टिम डळमळीत होणार असते. त्यामुळे यापूर्वी विवेक अग्निहोत्रीचाच ताशकंद फाईल्स या चित्रपटाबाबत देखील असाच वाद उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी तर चित्रपट रिलीज करु नये, यासाठी विवेक अग्निहोत्रीला धमकावले ही जात होते. पण तरीही हा चित्रपट रिलीज झालाच. अन् लालबहाद्दूर शास्त्रीजींचा मृत्यूचे गुढ नव्या पीढिला समजले.

भविष्यातही असे अनेक चित्रपट येतील, त्यातही जर डाव्यांच्या इकोसिस्टिमला धक्का लागणार असेल, तर त्याबाबत वाद निर्माण केला जातोच जातो. पण त्यामुळे सत्य काही लपत नाही, हे मात्र नक्की!

Thursday, 17 February 2022

RIP ऐवजी ॐ शांती


नुकतेच गानसम्राज्ञी लता दीदि आणि प्रसिद्ध संगितकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. बॉलिवूडसह प्रत्येक देशवासियांनी लता दीदि आणि बप्पीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सोशल मीडियावरही श्रद्धांजलीच्या अनेक पोस्ट आल्या. पण हे करताना एक बदल ठळकपणे अधोरेखित होत होता. तो म्हणजे, अनेकांनी RIP ऐवजी ॐ शांती वापरले होते. हा बदल भारतीयांसाठी फारच सकारात्मक म्हटला पाहिजे.

कारण, आपल्याकडे कोणाचेही निधन झाले की, RIP म्हणजेच Rest in Peace (शांततेत विश्रांती घ्या!) हा शब्द प्रयोग वापरण्याची पद्धत रुढ झाली होती. पण तो वापरणे कितपत योग्य याबद्दल अनेक मतप्रवाह दिसून येत होते. पुरोगामी मंडळी याचे समर्थन करताना दिसत होती. तर राष्ट्रवादी, भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते RIP चा विरोध करत होते. ते RIP ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे यावर व्यक्त होताना अनेकांना प्रश्न पडायचा. पण आता यातून परदेशातच, विशेष करुन ज्यांनी हा शब्द वापरण्याची सवय लावली त्या ख्रिश्चनांमध्येही याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळे याचा खोलात जाऊन आपणही विचार करण्याची गरज आहे.

वास्तविक, RIP म्हणजे Rest in Peace हा मूळ लॅटिन शब्द आहे. Requiescat in permanens या शब्दापासून RIP ची निर्मिती झाली. ख्रिश्चनांमधील अँग्लिकन, लूथरन, मेथोडिस्ट आणि कॅथेलिक प्रार्थनेत या शब्दाचा वापर केला जातो. याचा अर्थ जेव्हा विश्वाचा अंत होईल, त्यावेळी तुझ्या पाप-पुण्याचा हिशेब केला जाईल, तोपर्यंत तू इथेच शांतपणे विश्रांती घे!”

आता याबद्दल अजून जाणून घेऊया. कारण या RIP चा इतिहास ही अतिशय रोमांचक आहे. पाचव्या शतकात हा शब्द काही प्रमाणात कबरवर लिहिला जात असे. पण कालांतराने ख्रिश्चन संप्रदायांमध्ये हा शब्द कबरवर लिहिण्याची प्रथाच रुढ झाली. त्यानंतर रोमन काळात कॅथलिक प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थनेसाठी सर्रास वापरला जाऊ लागला.

दरम्यान, १७ व्या शतकात यूकेमध्ये कॅथेलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि ऑरेंज ऑर्डरची निर्मिती झाली. यूकेमधील प्रोटेस्टंटांचे समूळ उच्चाटन करणे, हे आपल्या जीवनाचे इति कर्तव्यच असल्याची भावना कॅथेलिकांमध्ये निर्माण झाल्याने ते प्रोटेस्टंटचा दुस्वास करु लागले.

त्यातच २०१७ साली उत्तर आयर्लंडमध्ये ऑरेंज ऑर्डरच्या सदस्यांनी प्रोटेस्टंटना RIP हा शब्द वापरण्यास बंदी घातली. यानंतर प्रोटेस्टंटांमधील एका गटाने ऑरेंज ऑर्डरच्या निर्णयाचे स्वागत केले. तर दुसरा गट आजही विरोध करताना दिसत आहे.

प्रोटेस्टंटांमधीलच इवांजेलिकल प्रोटेस्टंटांनी RIP च्या वापरास बंदीला मान्यता दिली आहे. इवांजेलिकल प्रोटेस्टंट सोसायटीच्या सचिव वालेस थॉम्पसन यांनी बीबीसी रेडिओच्या टॉकबॅक कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, RIP ही मृतांसाठी प्रार्थना करताना वापरले जाते. आणि बायबलच्या सिद्धांताच्या हे विरोधात असल्याने, आम्ही रेस्ट इन पीस शब्दाचा वापर न करण्यास सर्वांना प्रोत्साहित करु. त्यासोबतच थॉम्पसन यांनी आपल्या फेसबुक वॉलवरुनही पोस्ट लिहून RIP शब्दाचा वापर थांबवण्यासाठी आवाहन केले.

तर दुसरीकडे प्रेस्बिटेरियन चर्चचे माजी मॉडरेटर डॉ. केन नेवेल यांनी थॉम्पसन यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. प्रेस्बिटेरियन केन नेवेल यांच्या मते, जेव्हा लोक सोशल मीडियावर रेस्ट इन पीस शब्द वापरतात, तेव्हा ते एकप्रकारे स्मरण आणि शुभेच्छा देत असतात.आजही या वादाला पूर्णविराम मिळालेला नाही.

दुसरीकडे भारतीय विशेष करुन हिंदू संस्कृतीत मानवी शरिर नश्वर असून, आत्मा अमर असल्याची धारणा आहे. त्यामुळे हिंदू धर्मात मृत व्यक्तीला मुखाग्नी दिला जातो. मुखाग्नीनंतर त्याचे शरीर पंचत्वातविलीन झाले, असे म्हटले जाते. कारण, श्रीमत भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील २३ व्या श्लोकानुसार,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

अर्थात आत्म्याला ना शस्त्रांनी कापता येते, ना अग्नीने जाळता येते, ना पाण्याने भिजवता येते, ना वाऱ्याने वाळवता येते.त्यामुळे हिंदू संस्कृतीत नश्वर शरिराला आग्नीला समर्पित केलं जातं. त्यामुळे एखाद्याच्या निधनानंतर रेस्ट इन पीसच्या ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरला जातो.

त्याचा परिणाम आता दिसत आहे. लता दीदि आणि बप्पीदांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सेलिब्रेटींकडून ट्विट करण्यात आले, त्यात अनेकांकडून ॐ शांती हाच शब्द प्रयोग करण्यात आला. त्यामुळे आता हा मतप्रवाह एकार्थाने रुढ होताना दिसत आहे. अजय देवगन, अक्षय कुमारसह अनेक नेटकऱ्यांनी रेस्ट इन पीस ऐवजी ॐ शांती हाच शब्दप्रयोग वापरला आहे. त्यामुळे नव्या पीढिच्या अनुषंगाने ही आपल्या सर्वांसाठी सकारात्मक बाब आहे, असेच म्हणावे लागेल.

 

Monday, 3 January 2022

भय इथले संपत नाही...

२० च्या दशकाच्या अखेरीस म्हणजे साधारणपणे १९९८-९९ साली दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसिद्ध होणाऱ्या महाश्वेताया मालिकेच्या शीर्षगीतातील वरील ओळ. कवी ग्रेस यांनी लिहिलेले, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले, आणि लतादिदींनी गायलेले हे समुधूर गीत आजही प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करते. कारण, गाण्याच्या ओळीही तशाच होत्या, अन् लतादिदींच्या आवाजात ऐकताना, मनाला एक वेगळीच शांती देऊन जात होते.

ग्रेस यांच्या या गीताचा भावार्थ पाहिला तर; भय म्हणजे जिथेजिथे आपण जोडलो गेलो आहोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे असं वाटतं, ते तुटण्याचं भय. मग तो आधार, तो आनंद आपल्या जीवलगाचा देह असो, किंवा आपला, त्याच्या विरहाचे भय. ते नातं, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. त्यामुळे जोपर्यंत आपण या देहात आहोत, तोपर्यंत हे भय सतत जाणवत राहतं. ते मृत्यूपर्यंत काही केल्या संपत नाही. असो...

तर आजच्या परिस्थितीत या ओळींकडे पाहिलं, तर आज प्रत्येक माणसाच्या मानसिकतेचं प्रतिबिंबच यातून प्रतित होत असल्याचं जाणवतं. याचे कारण म्हणजे आपल्याला सर्वांना हदरवून सोडणारा कोरोना’! २०२० पासून सातत्याने या शब्दाने साऱ्यांनाच धडकी भरवली आहे. या महारोगाने अनेकांनी आपल्या आप्त स्वकीयांना गमावले, अनेक चिमुकल्यांचे डोक्यावरचे छत्र हरपले, तर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने उपासमारीची वेळ आली.

आजही २०२२ मध्ये आपण पदार्पण करत असताना, ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंट मार्फत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अन् त्यातून बचावासाठी आपले राज्यकर्ते लॉकडाऊनची जपमाळ ओढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर अनिश्चितेचं मळभ दाटून आलं आहे. लॉकडाऊन लागला, तर आता खायचं काय? हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे. तर जे कोरोनाच्या वादळात (म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे) सापडलेत, ते यातून आपली सुखरुपपणे सुटका होईल का? या विवंचनेत आहेत.

वास्तविक, २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या दोन लाटा आपण यशस्वीपणे परतवल्या, त्यावेळी लॉकडाऊन हा एक सपोर्टीव उपाय असल्याचे राज्यकर्त्यांचे मत होते; आणि काहीअंशी ते बरोबर पण होते. पण आज जेव्हा तिसरी लाट येऊ घातली आहे, तेव्हा लॉकडाऊन हा सर्वांनाच रोगापेक्षा इलाज भयंकर वाटत आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण लॉकडाऊन नकोच!’, या मानसिकतेत आहोत. त्यामुळे राज्यकर्त्यांनी देखील लोकांना लॉकडाऊनची भिती घालण्यापेक्षा, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे.

पण दोन्ही लाटेनंतर ही आपण म्हणावे तितके शाहणे झालेलो नाही, हे सिद्ध वारंवार होत आहे. कारण, गेल्या महिन्यातच मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आरोग्य यंत्रणांच पंचनामाच केला आहे. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशनच्या दाव्यानुसार, मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत ८५८ प्राथमिक दवाखान्यांची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ वीस टक्केच म्हणजेच केवळ १९९ दवाखानेच मुंबईत कार्यरत आहेत. एवढं मोठं बजेट असूनही महापालिकेला आपली आरोग्य यंत्रणांचं सक्षमीकरण करता आलेलं नाही, हे या आहवालाने दाखवून दिलंय.  

दुसरं म्हणजे, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या सक्षमीकरणासाठी आवाहन केले. त्याला जनतेकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. आमदार, खासदारच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आपापल्या क्षमतेने निधी संकलित केला. यातून जवळपास १३० कोटी रुपये निधी संकलित झाला. त्यापैकी केवळ ३० कोटी निधी खर्च झाला असून, १०० कोटी निधी अजूनही तसाच पडून असल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे.

याशिवाय आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याऐवजी त्यासाठीच्या परिक्षांचा घोळ घालून, यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग सुरु असल्याचे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. राज्याच्या इतर भागातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जी हेळसांड सुरु असून, आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हे सर्वचित्र पाहता, राज्यातील प्रत्येक नागरीक आज हेच म्हणतोय, भय इथले संपत नाही...

Sunday, 12 December 2021

रग रग हिंदू मेरा परिचय

 बरोबर राहुलजी ... तुम्ही सोकॉल्ड हिंदू आहात... म्हणजे जे जन्माने तर हिंदू आहेत, पण चार चौघात हिंदू म्हणवून घ्यायला लाज वाटते, अशा कॅटेगरीतील. (तुम्ही केवळ गांधी आडनाव सांगता, म्हणून हिंदू मानायचे) कारण हिंदू हे सांगून होता येत नाही, तर अटलजींच्या शब्दात सांगायचे तर;  'हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग


हिन्दू मेरा परिचय!' असं तुम्हाला बनणं शकत नाही.‌ असो...


दुसरं तुम्ही बोललात ते म्हणजे हिंदुत्वाबदद्दल, मुळात हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद हा रक्तात असावा लागतो.... ते येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. आपल्या देशात हिंदुत्व ही आदर्श जीवन पद्धती आहे. 


आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभूःपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः॥


जरा अजून पुढे जाऊ, म्हणजे विस्कटून सांगता येईल. हिंदू आणि हिंदुत्व समजण्याकरिता हिंदुत्व, हिंदूधर्म आणि हिंदूजगत या  तीन शब्दांचा अर्थ नीट समजणे अत्यावश्यक आहे.जे तुमच्या सारख्या सोकॉल्ड हिंदुंना शक्य नाही. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. 


दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून, त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. 


अन् तिसरे आणि शेवटचे हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.


पण हे एवढं सगळं तुम्हाला कसं कळणार. कारण, तुमचं हिंदू पण आणि हिंदुत्व हे पार्ट टाईम आहे.‌निवडणुका आल्या की, आपण हिंदू आहोत, ब्राह्मण आहोत, मंदिरं आठवतात, जानवं आठवतं. एवढं सगळं काही काळापूरतंच. इतरवेळी तुम्ही काय आहात हे दाखवून देतातच.‌असो... यावर जास्त बोलायला नको... उगीच त्रास होईल. 


त्यामुळे तुम्ही जरी हिंदू आहात हे आज म्हणत असाल, तरी ते तथाकथित आहे हे सर्वांना माहीत आहे. कारण आपल्या... मुद्दाम आपल्या शब्द वापरतोय हं! तर आपल्या देशात हिंदुत्व म्हणजे आदर्श जीवन पद्धती आहे. जी अनादी काळापासून चालत आलेली आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राने आणि श्रीकृष्णाने आखून दिलेली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी पुनर्स्थापना केलेल्या हिंदवी स्वराज्याचे पालन करणे अन् तिचं अनुकरण करणं ही आमची (मुद्दाम आमची म्हणतोय) संस्कृती आहे. त्यालाच आम्ही हिंदुत्व म्हणतो. आणि जो या आदर्श जीवन पद्धतीचं पालन करतो, तो हिंदुत्ववादी... त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्ववाद हे तुमच्या कडून शिकण्याची गरज नाही.

Thursday, 25 November 2021

यशवंतराव चव्हाण ते... की हे...!


काल महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर ही यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीच्या पोस्टचा पाऊस पडल्याचे दिसून येत होते. पण त्यात एक गोष्ट खटकणारी होती. कारण, हल्लीच्या पीढिला यशवंतराव चव्हाणांचा परिचयच नसल्याचे दिसून आले. अगदी मी-मी म्हणणारे पत्रकारितेतल्या व्यक्तींना देखील यशवंतराव चव्हाणांची साधी तोंड ओळख देखील नसावी, हे फारच अश्चर्याचे म्हणावे लागेल.

कारण, अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहताना जो फोटो पोस्ट केला होता. तो खरं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्मित केलेला, आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला, 'यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची' या चित्रपटात स्वर्गीय यशवंतरावांची भूमिका साकारणाऱ्या अशोक लोखंडे यांचाच फोटो पोस्ट करुन आदरांजली वाहिली होती. आणि स्वर्गीय यशवंतरावांबद्दलच्या आपल्या सहृद भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे या पोस्ट पाहताना महाराष्ट्राचे शिल्पकाराचा परिचय आजच्या पीढिला नसावा, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, "जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही. जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल; तर प्रथम तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करावा लागेल." पण यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टरांचे हे वाक्य खरंच गांभीर्याने कधी घेतलं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. की केवळ थोर महापुरुषांचे फोटो आणि त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथी साजरी केली म्हणजे, आपले इस्पित साध्य झाले म्हणायचे.  

खरंतर ब्रिटीश काळापासून आपल्याला एक शापच लागलेला आहे. लॉर्ड मॅकलेने आपली भारतीय शिक्षण पद्धती मोडित काढून, पाश्चिमात्य शिक्षण पद्धती अंमलात आणली. इंग्रजी शिक्षण घेणे म्हणजे वाघिणीचे दूध पिण्यासाराखे आहे, असे विचार भारतीय जनमानसावर बिंबवून आपली गुरुकुल शिक्षण पद्धती अक्षरश: मोडित काढली. मॅकलेच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे नीट संज्ञापन होण्याऐवजी, वरवरचे शिक्षण देऊन मार्क कसे मिळवायचे, यावरच भर देण्यात आला. त्यामुळे आपल्याकडे शिक्षणाऐवजी, चांगले मार्क घेऊन नोकरीच्या बाजारात उतरणारी एक फॅक्टरी निर्माण झाली. 

अन् याच फॅक्टरीतून तयार होऊन, सॉरी शिक्षित होऊन बाहेर पडलेली आजची पीढि आपल्या इतिहासाला साफ विसरत चालली आहे. त्यामुळे आपले महापुरुष कोण? त्यांनी समाजासाठी काय आणि कोणत्या प्रमाणात बलिदान दिले. हे देखील आपण साफ विसरुन चाललो आहोत. 

आजच्या पीढिला आपल्या महापुरुषांचा मातृभाषेत लिहिलेला इतिहास पचनी पडत नाही. उलट तोच इतिहास मोड-तोड करुन दिला असेल, तर तो नव्या पीढिला लगेच अॅक्सेप्ट होतो. 

दुसरीकडून चित्रपटातून जो इतिहास रंजक पद्धतीने मांडला असतो, तोच खरा आहे म्हणून आजची पीढि मार्गक्रमण करत आहे. अन् त्या चित्रपटात महापुरुषांची व्यक्तीरेखा साकारणारे कलाकारच आपल्याला खरे महापुरुष वाटत आहेत. त्यामुळेच आजच्या पीढिला खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे.

 केवळ रट्टा मारुन, पाठांतर करुन परिक्षेत मार्क नक्कीच मिळतील. पण त्यातून महापुरुष समजणार नाहीत. त्यामुळे 'वाचाल तर वाचाल', नाहीतर सर्वनाश निश्चित आहे.

Thursday, 18 November 2021

उडता पंजाब ते उडता महाराष्ट्र...



काही वर्षांपूर्वी शाहीद कपूर, करिना कपूर, आलिया भट अशी तगडी स्टारकास्ट असलेला उडता पंजाब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून पंजाबमधील अमली पदार्थ सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य करण्यात आले होते. अन् अकाली दल सरकारला एकप्रकारे टार्गेट करण्यात आले. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थाचा मुद्दा अतिशय कळीचा बनला होता. या मुद्द्याने जनमानस ढवळून निघाले होते. त्यामुळे परिणाम अपेक्षितच झाला, अन् अकाली दलाचे सरकार गेले. अन् कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आले. त्यानंतर या अमली पदार्थाचे पुढे काय झालं? म्हणजे नव्या राज्य सरकारला अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या उद्योगाला चाप बसला का? माहित नाही.

पण आज महाराष्ट्रातही तशीच स्थिती निर्माण होत आहे. आधी मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्या घरी २०० किलो गांजा सापडल्याने एनसीबीकडून अटक, अन् आठ महिने तुरुंगवास, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्स पार्टी प्रकरण, आणि आता एनसीपीने नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त केल्याचं प्रकरण,  किंवा काल-परवा कोल्हापूरमधील एका फार्महाऊसवरुन ३८ किलो एमडी ड्रग्स जप्त होण्याचे प्रकरण असो;  या सगळ्यातून महाराष्ट्र हा आमली पदार्थांचा सुपरस्टॉक्सिस्ट होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.

नांदेड मध्ये पकडण्यात आलेलं ११२७ किलोच्या गांजाच्या प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणात ३० वर्षांपूर्वी म्हशींचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गृहस्थाची गेल्या १० वर्षात झालेली प्रगती अनेकांना अचंबित करणारी आहे. विशेष म्हणजे नांदेड प्रकरणातील जळगाव जिल्ह्यातील एक पोलीस पाटील ही अडकणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे कोल्हापूरमधील फार्महाऊसवरुन जप्त करण्यात आलेल्या ३८ किलो एमडी ड्रग्स प्रकरणी केअर टेकर ताब्यात घेण्यात आला आहे. तर यातील मुख्य आरोपी एक वकील असून, तो आता फरार झाला आहे.

तिकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केजमधील पोलीस एका गोदामावर छापा टाकायला गेले. तिथे गुटख्याचा अवैध साठा सापडला. त्यामुळे तो जप्त करणार, तितक्यात तिथे उपस्थित कोणीतरी एका व्यक्तीला फोन करतो, तोे व्यक्ती समोरुन सांगतो की, "पोलिसांना सांग, हा खांडेचा (शिवसेना जिल्हाप्रमुखाचा) गुटखा आहे. तुम्ही इथून निघून जा!" यानंतर पोलिसांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्राला एकीकडे व्यसनाधीनतेपासून मुक्त ठेवण्याची राज्यकर्त्यांकडून अपेक्षा असताना, राज्यकर्त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच जर अशा पद्धतीत बोलत असतील, तर त्याला जबाबदार कोण?

त्यामुळे हे सगळं एवढं दिवसागणिक भीषण होत आहे की, महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेने सुरु आहे? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. आता यात एक एक मासे गळाला लागत असल्याने, या प्रकरणाची धग कुठे पर्यंत जाईल, हे आताच सांगणे अवघड असले, तरी उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला आहे का? असे विचारण्याची वेळ आली आहे.

Friday, 5 February 2021

ओ नाना... हे वागणं बरं नव्हं!


आजच्या दैनिक लोकमत मध्ये यदू जोशी सरांचा संपादकीय पानावर लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात त्यांनी जुनी निवडणूक प्रक्रिया, सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतची भेट, आणि विधानसभेला पर्यावरण स्थळ बनवण्यावरुन सडेतोड भूमिका मांडली आहे. यातील निवडणूक प्रक्रिया आणि विधानभवनाची सुरक्षा धोक्यात? या दोन मथळ्या खालील उतारे अतिशय विचार करायला लावणारे आहेत.

पहिल्या उताऱ्यात त्यांनी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. कारण, अध्यक्षांनी राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमबरोबर मतपत्रिकांचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश विधीमंडळाला दिले आहेत. याच्या बातम्यांचे रकानेच्या रकाने भरुन प्रकाशित झाले आहेत. पण अशा प्रकारचा अधिकार आपल्याला नसल्याचे विधीमंडळ अधिकाऱ्यांनी सूचित केलं होतं. पण तरीही नानांनी त्याकडे दुर्लक्ष करुन कायदा बनवण्याचे निर्देश देत नस्ती उठाठेव केली आहे.

वास्तविक, निवडणूक आयोग ही स्वयत्त संस्था आहे. केवळ विधासभाच नव्हे, तर लोकसभेची निवडणूक प्रक्रिया देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. ही निवडणूक मतपत्रिकेऐवजी ईव्हीएमवर घ्यावी, यासाठी 80 आणि 90 च्या दशकात अनेक घडामोडी घडल्या. कारण आपल्या देशातील पारंपरिक निवडणूक प्रक्रिया ही वेळखाऊ आणि खर्चिक झाली होती. त्यातच बुथ कॅप्चरिंग सारख्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे मतदान प्रक्रियेवरच अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

त्यामुळे मतदान पत्रिकांसंबंधी उद्भवत असलेल्या अडचणींवर मात करण्यासोबतच मतदारांना आपले मत अचूकरित्या कोणतीही संदिग्धता न राहता देता यावे, तसेच मते बाद होण्याची शक्यता राहू नये, या उद्देशाने डिसेंबर 1977 मध्ये निवडणूक आयोगाने नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार, केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1979 मध्ये ईव्हीएम तयार केले. यानंतर 6 ऑगस्ट 1980 रोजी त्याच्या वापराचे प्रात्यक्षिक निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीयांना दाखवण्यात आले. यानंतर 1982 मध्ये केरळमधील उत्तर परुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत 50 मतदान केंद्रावर पहिल्यांदा ईव्हीएम वापरण्यात आले.

पण हे होत असतानाच याच्या सार्वत्रिक वापराला घटनात्मक मान्यता मिळण्यासाठी ही विशेष प्रयत्न सुरु होते. यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा अधिनियम 1951 (रिप्रेंझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट 1951) मध्ये 1988 मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणांअंतर्गत कायद्यात कलम 61 (अ) हे नवीन कलम समाविष्ट करुन, निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्यासाठीचे अधिकार प्राप्त झाले.

या अधिकारानंतरही लगेच ईव्हीएम सगळीकडे वापरायला सुरु झाले असं नाही. कारण, याच्या चाचण्या अद्याप बाकीच होत्या. तसेच याच्या विश्वासहर्तेवरही शिक्कामोर्तब होणं गरजेचं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने जानेवारी 1990 मध्ये निवडणूक सुधारणा समितीची नेमली. या समितीत मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरिय पक्षांचे प्रतिनिधी होते. या समितीने यंत्राचे मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञान कुशल व्यक्तींची आणखी एक समिती नेमली. यामध्ये इलेक्ट्रोनिक प्रा. एस. संपथ, प्रा. पी.व्ही. इंदिरेसर आणि डॉ. सी. राव कसारबडा यांचा समावेश होता.

या समितीने एप्रिल 1990 मध्ये या यंत्राच्या सर्व तांत्रिक बाजू सूक्ष्मपणे तपासून एकमताने शिफारस केली की, यापुढे वेळ न दवडता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर सुरु करावा. समितीच्या शिफारशीनंतरच 1990 पासून सर्वत्र ईव्हीएमचा वापर सुरु झाला. हा सर्व कालक्रम पाहिला, यातील बहुतांश काळात काँग्रेसचेच सरकार केंद्रात सत्तेत होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला पर्याय म्हणून मतपत्रिका पुन्हा आणणे म्हणजे, विज्ञान युगाला मुठमाती देऊन, वैदिक पद्धतीला पुन्हा आपलंसं करणं आहे. असो...

नाना जाता जाता आणखी एक प्रकार करुन गेले आहेत. त्यांनी विधीमंडळालाच पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा ध्यास घेतला आहे. विधीमंडळ हे आपलं अतिशय संवेदनशील ठिकाण, संसदेवरील हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता हे अशा संस्थांना पर्यटन केंद्र बनवणं हे अतिशय घातक. पण तरीही हा अट्टाहास करण्याचा उद्योग नानांनी केला. आता यानिर्णयानंतर अनेक हैसे-नवसे-गवसे विधीमंडळाची इमारत ही फोटोसेशनचा स्पॉट बनवतील. काही महाभाग तर आपलं वेडिंग शूटसाठी देखील विधीमंडळाची मागणी करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे विधीमंडळाच्या वास्तूचं पावित्र राहिल का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नाना असे विचित्र निर्णय घेताना आधी सारासार विचार करत जा... नाहीतर गाव-खेड्यातील पुरंटोरं देखील म्हणतील नाना हे वागणं बरं न्हवं!