Saturday, 28 October 2017

सावधान..! दैत्य जागा होतोय


गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातून एका पाठोपाठ एक अशा दोन मोठ्या बातम्या आल्या. पहिली 20 अॉक्टोबरला, तर दुसरी 21 अॉक्टोबर रोजी. 20 अॉक्टोबरच्या बातमीत अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील मशिदीत एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिलं. यात 56 जणांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं घेतली. तर 21 अॉक्टोबरच्या बातमीत एका मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला झाला. या गेटवरील 15 कँडेट्सचा मृत्यू झाला. या हल्ल्या पाठिमागे तालिबान्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत होता. या दोन्ही बातम्या वाचल्यानंतर अफगाणिस्तानात आयसिस आणि तालिबान्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु असल्याचं वाटत होतं. त्यातच 25 अॉक्टोबरला उत्तर अफगाणिस्तानात आयसिस आणि तालिबान्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात दोन्हीकडचे 23 दहशतवादी मारले गेले. या बातमीनं अफगाणिस्तानात वर्चस्वाची लढाई चांगलीच पेटलीय याला पाठबळ मिळालं.

पण हा संघर्ष आत्ताच का दिसून येतोय की या पाठिमागेही काही कटकारस्थाने आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. यावरच सीएनएन आणि बीबीसी यांनी या संघर्षाचे चांगलं रसभरीत वर्णनं वाचायला मिळाली. बीबीसीनं सांगितलंय की, हा संघर्ष काही आत्ताचा नाही, तर 2015 पासून सुरु झाला. अन् या पाठिमागे दोन महासत्तांचा हात आहे.

कारण एकतर दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेनं आपली तेलाची तहान भागवण्यासाठी, आणि सौदी राजांनी आपले शौक पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे दहशतवादाच्या दैत्याला जन्म दिला. आणि कशा प्रकारे अमेरिकेच्या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांचं पालनपोषण केलं. याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. त्याच धर्तीवर आता आयसिसला रशिया आणि इराणकडून छुपं पाठबळ मिळत आहे.

कारण एकतर आयसिसनं आखाती देशातील तेल विहिरींवर कब्जा मिळवलाच आहे. त्यामुळे शेल तंत्रज्ञानावर फुशारक्या मारणारी अमेरिका, तेलासाठी काही प्रमाणात अजूनही आखातावर अवलंबून आहे. पण आयसिसने या तेलविहिरींवरच डल्ला मारल्यानं अमेरिकेची कोंडी झाली आहे.

दुसरीकडे तेलाच्या पैशांवर आय्याशी पूर्ण करणार्या सौदीमधील तेल विहिरींवर आयसिसचा डोळा आहे. त्यातून आयसिसच्या दैत्यांनी आपलं जिहादी अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सौदीचे तालिबानी अस्त्र निकामी करण्यासाठी आयसिसने उत्तर अफगाणिस्तानात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

आता या प्रकरणाची दुसरी बाजू अशी की, अमेरिका आणि रशिया यांची एकमेकाला पाण्यात पाहण्याची वृत्ती अजूनही कायम आहे. शीतयुद्धाच्या काळात तालिबान आणि अल कायदाच्या जोरावर अमेरिकेनं रशियाला आखातात फिरकू दिले नव्हते. त्याचे उट्टे काढण्याची संधी रशियाला आयसिसच्या रुपाने मिळाली आहे. आयसिसने आखातातील तेल विहिरींवरच कब्जा केल्याने, रशियाकडून आयसिसला रसद पुरवली जात आसल्याचा आरोप होतो आहे.

दुसरीकडे सौदी आणि इराणमधील शिय्या-सुन्नी वाद काही नवीन नाही. सुन्नी बहुल सौदी अरेबियाच्या विरोधात जो कुणी उभा राहिल, त्याला पाठबळ देण्यास शिय्याबहुल इराण सदैव तयार असते. शिवाय, आयसिसचा जन्मच इराण, इराक, सीरिया या भागात झालेला आहे. त्यामुळे आसिसच्या सौदीवरील जिहादी चढाईसाठी छुपी रसद पुरवण्याचं काम इराणचे राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खोमेनींकडून होत आहे. त्याची लिटमस्ट टेस्ट अफगाणिस्तानात सुरु आहे. कारण, ज्या तालिबान्यांच्या जोरावर सौदी राजांनी आपले शौक आणि अमेरिकेने आपली तेलाची तहान भागवली, इतर देशांना आपल्या तालावर नाचवलं,  त्या तालिबान्यांना ठेचण्यासाठीच आयसिसला  अफगाणिस्तानात हल्ले करण्यास छुपं प्रोत्साहन मिळत आहे.

त्यातूनच तालिबानी आणि आयसीसमध्ये चकमकी सुरु आहेत. अन् आयसिसला आवळण्याच्या नावावर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अमेरिकेकडून उत्तर अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले करुन आयसिसची तळी उद्धवस्त केली जात आहेत.

या सर्व घटनांचा भारतावर थेट परिणाम होत नसला तरी याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. कारण एकेकाळी तत्कालीन सोव्हिएत संघ, पाकिस्तान, इराण आणि अमेरिका या देशातले मोठे भिडू होते. पण आज नाटो, यूरोपीयन संघातील सदस्य देश, चीन भारत आणि रशिया हे मोठे खेळाडू आहेत.भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तान आणि गनी सरकारमध्ये कुरबुरी सुरु आहेत. तेव्हा पाकिस्तानची मानसिकता पाहता, आयसिसशी हातमिळवणी करुन, अफगाणिस्तानातील भारताच्या गुंतवणूक प्रकल्पांना नख लावण्याचे उद्योग होऊ शकतात. त्यामुळे मोदी सरकारला त्या दृष्टीने ही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Friday, 14 October 2016

दहशतवाद्यांची फॅक्टरी

उरी हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे, अशी एकच हाक गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिली जात होती. त्याला केंद्राचाही सकारात्मक प्रतिसाद मिळला, अन् गुरुवारी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या घटनेला 48 तास उलटले नाहीत, तोच पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली. भारताला सर्जिकल स्ट्राईक काय असताता, हे आम्ही दाखवू अशी धमकी हाफिज देत आहे. संयुक्त राष्ट्रांनी सईदला 26/11च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले, पण तरीही हा नाग फणा काढून फुत्कारतो आहे. अन् त्याला पाकिस्तानही पाठीशी घालत आहे.
वास्तविक पाकिस्तानची ही दुतोंडी भूमिका काही नवी नाही. काश्मीरविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला नेहमीच खतपाणी घातले. यालाही अमेरिकेचे वेळोवेळी पाठबळ मिळाले. व्हिएतनाम युद्धापासून ते 1990 पर्यंतच्या काळातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हियत रशिया आणि अमेरिका ही दोन बलाढ्य राष्ट्रे समोरासमोर येऊन ठेपली होती. एकमेकाचा वचपा काढण्यासाठी हे दोन्ही देश छोट्या राष्ट्रांचा सदैव वापर करत आली आहेत.
यासाठी सोव्हिएत रशियाने अमेरिकेच्या खालोखाल असलेल्या क्युबाचा, तर अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरले. पाकच्या राज्यकर्त्यांनीही याचा पुरेपुर वापर करुन अमेरिका आणि अरबांकडून बक्कळ पैसा उखळला. अन् तोच पैसा आफगाणमधील तालिबान्यांना आणि मुजाहिद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या काळात पाकस्तानचे मेजर जनरल झिया उल हक यांनी शीतयुद्धाच्या काळात तब्बल 500 अब्ज यूएस डॉलर उखळले. तर सौदी राजपुत्रांनी याच कालावधीत 3.5 अब्ज यूएस डाँलर झियांनी घशात घातले. सेव्हियतांना रोखण्यासाठी आणि आखाती देशातले तेल मिळवण्यासाठी अमेरिकेनेही कधी आखडता हात घेतला नाही. अमेरिकेकडून अब्जावधी डाँलर्सची वाहती गंगा सुरुच राहिली.
अमेरिकेच्या सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी एकप्रकारे अफगाणिस्तानात जिहादची फॅक्टरीच उघडली. आखाती देशातील कोवळा कच्चा माल उचालायचा, अफगाणिस्तानच्या टेकड्यांमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करायची आणि हेच प्रॉडक्ट आखाती देशातील प्रस्थापितांविरोधात त्यांना धक्के देण्यासाठी वापरायचं. हेच उद्योग अमेरिका आणि पाकिस्तान विनासयास करत होतं.
यातूनच मग कालांतराने या जिहादी प्रोडक्टचे विविध गट होण्यास सुरुवात झाली, ओसामाची अल कायदा, आयमान जवाहिरीची पूर्वीची अल-जिहाद, सय्यद अबुल अला मौदुदीची जमाते इस्लामी, मौलाना मुहम्मद इलियास अल कंन्धालवीची तिबलिघ, तिबलिघमधूनच फूटून बाहेर पडलेली दावत-ए-इस्लामी, हफिज-मुहम्मद सईद व झफर इक्बाल या दोन प्राध्यापकांनी लाहोर मध्ये सुरु केलेल्या अहल-ए-हदीथ मदरशातून तयार झालेली जमातुद दावा म्हणजेच लष्कर-ए-तोयबा,बेतुल्लाह मेहसूदची तेहरीक-ए-तालिबान अशा अनेक संघटना पाकिस्तानमध्ये वाढल्या. दहशतवादी संघटनांसाठी या नंदनवनच बनल्या.
अमेरिकेतल्या 9/11 नंतर अमेरिकेचे डोळे खाडकन उघडल्यानंतर अमेरिकन राज्यकर्त्यांनी आपला हात आखडता घेतला. 9/11 च्या हल्ल्यानंतर बुश प्रशासनाने गुड मुस्लीम आणि बॅड मुस्लीमची सरमिसळ घालून आखाती देशाविरुद्ध युद्ध पुकारले. बुशनंतर सत्तारुढ झालेल्या ओबामांनीही तोच कित्ता गिरवला. एकीकडे जगाला शांततेचा दूत दाखवून दुसरीकडे मात्र 9/11चा मास्टर माईंड ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी लष्कराला रान मोकळे करुन दिले. अन् 2011 त्याचा पत्ता लागल्यानंतर त्याचा खात्मा केला.
पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं, पाकिस्तानच्या स्वार्थी राजकारण्यामुळे पाकिस्तान हा देश जिहादची फॅक्टरी बनली होता. काश्मीरला काहीही करुन भारतापासून विलग करायचेच यावरुन त्यांनी विविध गटांना सदैव पाठीशी घातलं. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांनीही वाज खान या पाकिस्तानातील दिग्गज पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमध्ये आपण कशाप्रकारे जिहादची फॅक्टरी चालवतोय याचे दाखले दिले. या मुलाखतीत मुशर्रफांनी लादेन, मौलाना जलालुद्दीन हक्कानी, जवाहिरी हे पाकिस्तानचे हिरो असल्याचं सांगितलं. पण यावेळी खानने मुशर्रफने हाफिज सईदवर कारवाई संदर्भात विचारले, तेव्हा मात्र त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणून वेळ मारुन नेली. आजही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना दहशतवादी हिरोच वाटत आहेत. त्यामुळेच राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांना बुरहान वानी काश्मीरमधील युवा नेता वाटतो.
एकीकडे यूनोच्या व्यासपीठावरुन दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही इतरांसोबत आहोत, असं सांगायचं, पण दुसरीकडं मात्र, दहशतवाद्यांना पाठीशी घालायचे उद्योग पाकिस्तानी राज्यकर्ते इमाने इतबारे करत आहेत. विशेष म्हणजे आता याला चीनी ड्रॅगनचीही साथ मिळत आहे. चीनने वारंवार व्हीटोचा वापर करुन जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला वाचवले आहे. त्यात हाफीज सईदही फणा काढून बसला आहे. राजरोस हे दोन्ही साप भारताविरोधात फुत्कारत आहेत. तसेच अनेक देशांमधून दहशतवादी कुरापती घडवून आणत आहेत.
त्यामुळे यांना ठेचून काढण्यासाठी संयु्क्त राष्ट्राने दहशतवादाचे नंदनवन बनलेल्या पाकिस्तानला टेररिस्ट नेशन घोषित करण्याची गरज आहे.यासाठी अमेरिकेत जी मोहीम सुरु आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेत वसलेल्या भारतीयांनी व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील ‘वुई द पीपल’ सुविधेत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमधील मागणीला आतापर्यंत 5 लाखहून अधिक नागरिकांनी समर्थन दिले आहे. आता अशीच मोहीम इतर युरोपीयन देशांसोबत आखाती आणि एशियाई देशांनी सुरु केल्यास जनभावनांचा आदर राखून संयुक्त राष्ट्राला पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र घोषित करणे भाग पडेल. त्यावेळी चीनलाही आपले घोडे दामटवता येणार नाही हे नक्की!

http://abpmajha.abplive.in/blog/prasanna-joshis-blog-on-pakistan-terrorism

Wednesday, 20 July 2016

झाकीर नाईकच्या निमित्ताने...


बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या झाकीर नाईक अनेक इस्लामिक जिहादी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला असल्याचे समोर आले. जगभरातील अनेक तरुण झाकीर नाईकची भाषणे ऐकूनच कट्टरवादाकडे वळत आहेत, हे अनेक दहशतवाद्यांनी जाहीर ठिकाणी लिहल्याने झाकीरसह अन्य मंडळींचे धाबे दणाणले. ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेल्या रोहान इम्तियाज आणि निब्रास इस्लाम यांनीही आपण झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित असल्याचे सांगितले. यातल्या रोहान इम्तियाजने तर आपल्या फेसबुक पेजवर नाईकच्या भाषणानेच आपण याकडे वळल्याचे म्हटल्याने अनेकांची गोची झाली. या प्रकाराने जगात शरियत लागू करण्याच्या नावावर ही मंडळी तरुणांची माथी कशी भडकवतायत हे सर्वांसमोर आले.

ढाक्यातील हल्ल्यानंतर स्वत: धर्माने मुस्लीम असलेल्या आणि एक विचारवंत म्हणून गणल्या जाणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी इस्लामला शांततेचा धर्म समजू नका, असे जाहीर मत मांडून इस्लामच्या प्रस्थापित धर्म पंडितांविरोधात उभा डाव मांडला. जगभरात होणारे दहशतवादी हल्ले आणि त्यामागचे कर्ते करविते धनी हे इस्लामिक विचारवंत असल्याचे समोर येत असल्याने या धार्मिक संस्थांची गोची होऊ लागली. झाकिर नाईक प्रकरणावरूनही हेच पाहायला मिळाले. नाईकच्या कथित धर्म प्रसारामुळे दार-उल-उलूमला थेट आपल्याच जातभाईविरोधात फतवा काढावा लागला. अन नंतर हे प्रकरण अंगाशी येऊ लागल्याने त्यावर सारवासारव करावी लागली. विशेष म्हणजे, यात धर्मगुरू आणि विचारवंतांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. झाकीरच्या समर्थनार्थ सुन्नींचा गट उभा राहीला. तर त्याच्या दुसऱ्याबाजूला शिया धर्मगुरूंनी नाईक विरोधात दंड थोपाटले. मुस्लीम लॉ बोर्डाचे मौलाना खालिद रशीद फरंगी यांनी नाईकला या प्रकरणात गोवण्याचं षडयंत्रच रचलं जात असल्याचा आरोप करून झाकीर नाईकला क्लिन चीट दिली. तर ऑल इंडिया शिया पर्सनल ला बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी झाकिर नाईकवर थेट हल्ला चढवत, त्याचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्याची मागणी केली. त्यामुळे आखाती देशातील शिया विरूद्ध सुन्नी वादाचे वारे आता इतर देशातही वाहू लागले आहेत.

शितयुद्धानंतर आखाती देशात शिया-सुन्नींमधील वादामुळे अनेक हिंसक दहशतवादी संघटना उदयास आल्या. यात मग ओसामची अल कायदा असेल, किंवा मुल्ला ओमरची तालिबान, आणि आताचा इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी. हे सारेच सुन्नी आणि त्यातच कोणत्या ना कोणत्या मदरशाचे मुल्ला-मौलवी. या साऱ्यांनीच शितयुद्धाच्या काळात शियांना चोपून काढले. सौदीच्या राजाश्रयावर पोसलेल्या या तिघांनीही अक्षरश: शिय्यांसोबतच इस्मायली अहमदी आदी आपल्याच जात भाईंचे शिरकाण केले. ढाक्यातही जो हल्ला झाला त्यावेळीही कुराणातील आयत येत नसलेल्या मुस्लिमांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे सध्या जगभरातून शिय्यांना जीव मुठीत धरून आपल्याच देशातून परागंदा व्हावे लागत आहे.

इस्लाम धर्मात कुराणाला सर्वात पवित्र ग्रंथ मानले जातो. पण याच ग्रंथाच्या आयतीचा सोईचा अर्थ लावून तरुणांची माथी भडकवण्याचे काम हे कथित धर्मगुरू करत आहेत. जगभरात शरियत लागू करण्यासाठी जिहाद केला तर जन्नत नसिब होते, हे या धर्मगुरूंचे सांगणे असते. पण खरंच असे होते का हे मुस्लीम धर्माच्याच अभ्यासकांनी मुस्लीम समाजासमोर आणण्याची गरज आहे. वास्तविक, कुराणातील ६,६६६ आयतींपैकी १०००० आयत या वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेली आहेत. पण या वैज्ञानिक रूपाचे दर्शनच तरुणांना घडवलेच जात नाही, अन मग आयतीचा सोईसकर अर्थ लावून तरुणांना दहशतवादाच्या खाईत ठकलले जाते.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जमियत उल हदिसचे सदस्य आणि बंगळुरूच्या दार-उल-इरफात-वल-इरशादचे मिराज शेख रब्बानी हे मौलवी जिहाद कसा करायचा याचे धडे तरुणांना देत होते. यात इस्लाम धर्म वाढवण्यासाठी जर तुम्हाला मृत्यू जरी आला, तरी तुम्हाला जन्नत नसिब होईल, असे हे साहेब सांगत होते. विशेष म्हणजे, ज्यांच्या मनात इस्लामसाठी जिहाद करणे नसेल तो, मुनाफीक (दुतोंडी) आहे असेदेखील हे ठासून सांगत होते. यांची अनेक विखारी भाषणे सोशल मीडियावर आजही उपलब्ध आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्या माध्यमातून काही इस्लामिक धर्मप्रसारक समाजात अशांतता पसरवण्यासाठी कुराणाचा सोईस्कर अर्थ लावून जगात अशांतता पसरवण्याचे प्रकार सुरु असतात. त्याला शह देण्यासाठी इस्लामच्या खऱ्या अभ्यासकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.


Monday, 25 April 2016

डोल्कून इसाचा व्हिसा आणि ड्रॅगनची घबराट

प्रसन्न जोशी
सध्या डोल्कून इसाला भारताने ई-व्हिसा दिल्याने चिनी ड्रॅगनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. चीनने भारताच्या या कृतीचा निषेध करून ‘रेड कॉर्नर’ नोटीसचे निमित्त पुढे करीत भारताने इसाला अटक करून त्याला चीनच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली आहे.
चीनला चपराक
वास्तविक नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून दहशतवादाशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढावे, यासाठी जीवाचे रान करीत आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवरून पाकिस्तानच्या कुरापती भारताने वेळोवेळी उघड्या पाडल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून मसूद अझहरला ‘दहशतवादी’ घोषित करण्यासाठी मोदी सरकारने विशेष प्रयत्न सुरू होते. पण, त्यात खोडा घालण्याचे कामचीनने केले. चीनने संयुक्त राष्ट्रसंघातील ‘व्हिटो’चा वापर करून मसूद अझहरवर बंदी घालण्यास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे दहशतवाद्यांना नामोहरमकरण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर पाणी फिरविले गेले अन् अझहर मसूदला मोकळे रान मिळाले. भारत एकीकडे दहशतवादाशी प्रामाणिकपणे लढत असताना, चीनने आपले आशिया खंडावर वर्चस्व कायमठेवण्यासाठी आणि भारताची महासत्तेकडे सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी हे उद्योग केले होते.
चीनच्या मुस्लीमबहुल वीगर (युघूर) प्रांतातील फुटीरतावादी नेता डोल्कून इसा याला २८ एप्रिल ते १ मेदरम्यान हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथे होणार्‍या एका परिषदेला हजर राहण्यासाठी भारताने ई-व्हिसा दिला त्यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताच्या या कृतीवर चीनने आता गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते ह्युआ च्युनिंग यांनी भारताच्या या कृतीचा निषेध करून ‘रेड कॉर्नर’ नोटीसचे निमित्त पुढे केले. त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, ‘‘डोल्कून इसा हा दहशतवादी असून त्याच्याविरुद्ध इंटरपोलतर्फे ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केल्यामुळे त्याला अटक करून भारताने चीनच्या हवाली केले पाहिजे,’’ अशी बडबड सुरू केली आहे. यावर भारताने तूर्तास जरी प्रतिक्रिया दिली नसली, तरी तज्ज्ञांच्या मते, चीनने अझहर मसूद प्रकरणात पाकिस्तानला गोंजारण्यासाठी भारताच्या विरोधात उभा डाव मांडून दहशतवादाला आपलेही पाठबळ दिल्याचे दाखवून दिले आहे.
कोण आहे डोल्कून इसा?
१९४९ साली तिबेटच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ‘पिपल्स् लिबरेशन ऑफ आर्मी’ (PLAPLA )ने आपला मोर्च पूर्व तुर्कस्थानकडे वळवला होता. पूर्व तुर्कस्थानचा घास गिळण्यासाठी च्या आर्मीने या भागात अनन्वित अत्याचार सुरू केले. त्याविरोधात आवाज उठवण्याचे कामरिबीया कादीर यांनी केले. त्यांनी पूर्व तुर्कस्थान आणि उत्तर चीनमधील तुर्की भाषिकांना संघटित करुन मोठे जन आंदोलन छेडले. याच काळात १९६७ साली जर्मनीत जन्मलेला डोल्कून इसा हा १९८०च्या दशकात शिक्षणाच्या निमित्ताने उत्तर चीनमधील सिक्यांग येथे आला. कादीर यांनी उभे केलेल्या आंदोलनाने इसा इतका प्रभावित झाला की, तो त्यांच्या ‘World Uyghur Congress'Unrepresented Nations and Peoples Organization शी जोडला गेला. कारण, त्याच काळात कम्युनिस्टांनी विद्यापीठामधून देखील तुर्की भाषिकांवर अत्याचार सुरू केले होते. तुर्की भाषिकांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी अनेक हातखंडे वापरलेले होते. याच्याविरोधात इसाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या एका गटाने सिक्यांग विद्यापीठात मोर्चा काढला. परिणामी, इसाला विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. अशावेळी त्याने आपले उर्वरित शिक्षण तुर्कस्थानमधील गाझी विद्यापीठातून पूर्ण केले अन् त्यानंतर आपले संपूर्ण जीवन चीनमधील दडपशाहीच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला वाहून घेतले. त्यानंतर चीन सरकारने इसाला अटक करण्याचे अतोनात प्रयत्न केले. पण, १९९७ साली इसा आपली जन्मभूमी जर्मनीकडे परतला. पण, तरीही त्याने पूर्व तुर्कस्थानावर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवणे सुरूच ठेवले. त्यामुळे २००३ साली चीनच्या गृहमंत्रालयाने इसाला ‘दहशतवादी’ घोषित केले. पण, इसाने मात्र चीन सरकारच्या या आरोपांना केराची टोपली दाखवत २००६ साली तैवानमध्ये या संस्थेच्यावतीने आयोजित बैठकीला हजेरी लावली. याची माहिती २००९ साली मीडियातून प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आल्याने इसावर तैवानमध्ये जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. सन २००९ पासून सिक्यांग (झिनजिअँग) आणि वीघर (युघूर) प्रांतांमध्ये चीनच्या शासनाविरोधात मुस्लीमगटाच्या फुटीर चळवळीने आंदोलन सुरू केले. यापैकी सिक्यांग हा प्रांत मुस्लीमबहुल असल्याने या प्रांतातील जवळपास एक कोटींपेक्षा जास्त मुस्लीमबांधव आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाचे नेतृत्व डोल्कून इसाने केले. त्याच्या या आंदोलनामुळे माजी राष्ट्रपती ह्यु जिंतो यांची खुर्ची धोक्यात आली. त्यामुळे अखेर चिनी सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करीत इसाच्या युघूर कॉंग्रेसवर बंदी घातली. यानंतर इसा नेतृत्व करीत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात जवळपास अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर चीन सरकारने ‘इंटरपोल’च्या माध्यमातून इसाला ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावून ‘दहशतवादी’ ठरवले. त्यामुळे इसाला चीनमधून परागंदा व्हावे लागले. बनावट पासपोर्टच्या आधारे त्याने जर्मनी गाठले.
चीनला भीती
इसा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय जगतात मोठी खळबळ उडाली आहे. कारण, इसाच्या भारत भेटीत तो चीनमधून परागंदा व्हावे लागलेल्या दलाई लामा यांनादेखील भेटणार आहे. त्यामुळे या घटनेला आता अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेतील ‘इनिशिएटिव्हज फॉर चायना’ या संस्थेने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यविषयक परिषदेला अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करताना चीनमधून हद्दपार झालेले अनेक लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यकांक्षी नेते उपस्थित राहून स्वातंत्र्य चळवळींविषयी विचारविनिमय करणार आहेत. त्यामुळेच चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सिंहासनाला आतापासूनच इसारुपी भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. कारण, सुरुवातीपासूनच कम्युनिस्टप्रणीत चिनी सत्ताधार्‍यांनी अहिंसक आंदोलनांना दडपण्याचे आक्रमक धोरण अंगीकारले आहे. पण, या परिषदेच्या निमित्ताने कम्युनिस्टांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लागेल, अशी भीती चिनी सत्ताधार्‍यांना वाटू लागलेली आहे. त्यामुळेच चीनने आपल्या परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून भारतावर दबावतंत्राचा प्रयोग सुरु केला आहे.
चीनची दुटप्पी भूमिका
एकीकडे अझहर मसूदला दहशतवादी जाहीर करण्यास नकार द्यायचा, पण दुसरीकडे इसाने अहिंसक मार्गाने आंदोलने करून सरकारला धक्के दिले म्हणून त्याला दहशतवादी ठरवायचे अशी दुटप्पी भूमिका पुन्हा सार्‍या जगासमोर उघड झालेली आहे. अझहर मसूदने निष्पाप लोकांचा बळी घेतला तेव्हा चीनला तो दहशतवादी दिसला नाही. मात्र, जो इसा कम्युनिस्टांच्या जुलमी सत्तेविरोधात आवाज उठवतो त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवायचे आणि त्याच्या अटकेची अपेक्षा भारताकडून करायची अशी ही ड्रॅगची डबल ढोलकी भूमिका सुरू आहे, ऐवढे मात्र नक्की!

Monday, 23 November 2015

इसिसची पिल्लावळे कुणाचे?


 नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात १२९ पेक्षा जास्त नागरीकांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी आखाती देशात रक्ताची होळी खेळणार्‍या इसिसने (इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया) स्विकारली आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा इसिसचे वादळ घुमायला सुरुवात झाली आहे. सर्वच देश इसिसच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. पण इसिसचे पिल्लावळ कुणाचे? तसेच या संघटनेचा म्होरक्या  अबु बक्र अल बगदादी याचा उदय कसा झाला? यासारखे एक ना अनेक प्रश्‍न आता समोर येऊ लागले आहेत. तेंव्हा त्याची उत्तरे शोधताना एक दशक मागे गेल्यास याची उत्तरे मिळतील.
 इसिस म्हणजे, धर्मांध मुस्लीमांची आणि संपूर्ण जगात क्रुरतेची परिसिमा गाठणारी संघटना. अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या या नंगानाचाला अमेरिकेचा छळवाद देखील तितकाच कारणीभूत आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या संघटनेचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याचा जन्म १९७१ रोजी इराकमधील सामर्रा या छोट्याशा गावात झाला. बगदादीचे घराणे सुशिक्षित होतेे. तो देखील उच्चविद्या विभुषितच होता. त्याने बगदादमधील इस्लामी विज्ञान विद्यापीठातून इस्लामचे तत्त्वज्ञान या विषयावर डॉक्टरेट मिळवली होती. त्यानंतर तेथीलच एका मदरशामध्ये शाही इमाम म्हणून नोकरी पकडली होती. त्यावेळी त्याचा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता. पण अखाती देशांमधल इस्लामवरील मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या टोळ्यांमधील युद्धांचा अमेरिकने तेलाच्या राजकारणासाठी वापर सुरू केल्या नंतर अल कायदा, तालिबान, आणि आता इसिससारख्या संघटना फोफावू लागल्या.
 २००३ मध्ये इराकचे सद्दाम, लिबियाचे गदाफी आदी मंडळी सौदी राजपुत्रांच्या विरोधात उभे ठाकले होेते. त्यांचा अमेरिकच्या साम्राज्य वाढीला विरोध होता. अमेरिका आखाती देशात प्रमाणापेक्षा जास्तच हस्तक्षेप करीत आहे आणि त्याला सौदी राजपुत्रांचा राजाश्रय आहे, असा आरोप इराक आणि लिबियाचे प्रतिनिधी ओपेकच्या (Organization of the Petroleum Exporting Countries) बैठकांमधून करत होते. अन् सौदी राजपुत्रांच्या चंगळवादावर देखील ताशेरे ओढत होेते. त्यामुळेच, अमेरिकेने या दोन्ही देशातील सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला. अमेरिकेचे सैन्य इराक आणि लिबियामध्ये घुसवले.यासाठी बुशप्रशासनाने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन इराकमध्ये लापल्याचे कारण सुरुवातीला पुढे केले. पण नंतर अमेरिकेचे पितळ उघडे पडल्यानंतर बुशनी दुसरं कारण पुढं केले. आणि इराककडे महासंहारक शस्त्रास्त्रे असल्याची टूम काढली. तेही अमेरिकेची सबब खोटी ठरली.
 मात्र तोपर्यंत अमेरिकन सैनिक इराकमध्ये घुसले होते. त्यांनी इराकचा पुरता ताबा घेऊन सद्दामला अटक केली होती. अन् इराकी सैन्य बरखास्त केले. या बरखास्तीमुळे जवळपास इराकी सैनिकांवर उपासमारीची वेळ आली. एवढेच नाही तर काही सैन्याधिकारी, जनरल यांची रवानगी अमेरिकेच्या इराकमधीलच कँप आणि बक्का या छळछावणीत केली.
 अमेरिकेच्या या दादागिरीने यातीलच छळछावण्यांमध्ये बंदी असलेल्या बक्का छळछावणीचे जिहादी विद्यापीठात रूपांतर झाले. या छावणीतील अबु मुस्लीम अल तुर्कमानी सद्दामच्या सैन्यातील इंटेलिजन्सचा प्रमुख आणि अबु अली अल अनबारी इराकी सैन्याचा मेजर जनरल या दोघांनी अमेरिकन छळछावणीतील इराकी सैन्याला एकत्र केले. त्यांनी सैनिकांची संघटना बांधून इराकी सैनिकांचे जाळ उभारले.
 याच दरम्यान, दुसरीकडे इराकमधील अमेरिकन जाच इतका वाढला की, बगदादीने देखील धर्मांध मुस्लमानांच्या टोळ्यांमध्ये सामिल झाला, यातूनच तो २००९ च्या जवळपास अलकायदाचा सभासद बनला, त्याने ओसामाचा मास्टर माईंड अयमान जवाहीरीशी त्याची सलगी वाढवली, यामुळेच बगदादीला इराकमधील ओसामाच्या अलकायदाचे नेतृत्वपद देण्यात आले. बगदादीने याचा पुरेपुर वापर करून इराकमध्ये अल कायदा संघटनेचे जाळे उभारले. पण यामुळे इराकमधील ओसामाचे महत्त्व कमी होऊन बगदादीचे महत्त्व वाढले. बगदादीच्या कार्यपद्धतीवर खुष असलेली इराकमधील जिहादी त्याच्या प्रेमात पडली होती. हजारोंच्या संख्येने धर्मांध तरुण जिहादासाठी बगदादीच्या कळपात सामिल होत होते. पण या मुळे अयमान जवाहरी आणि बगदादी यांच्यात खटके उडत होते.
 २०११ साली लादेनच्या खातम्यानंतर अल कायदाचे जिहादी सैरभैर झाले, ओसामानंतर अल कायदा चालवणार कोण? असा प्रश्‍न सर्वच जिहाद्यांना पडला होता. अयमान जवाहिरीशी सातत्याने खटके उडाल्याने बगदादी देखील अल कायदावर नाराज होता. तो अल कायदामधून बाहेर पडून दुसरी संघटना स्थापन करण्याचा विचार करीत होता. संधीच्या शोधात असलेल्या बगदादीने ओसामाच्या खातम्याच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचा फायदा उचलण्यास सुरूवात केली. एकप्रकारे अमेरिकेने देखील याला पोषक वातावरण निर्माण करून दिले. कारण २०११ साली अमेरिकेने इराकमधील सैन्य माघारी बोलावून छळछावणीतील सर्व बंदींना मुक्त केले. अन् यातूनच सुटका झालेल्यांमधील अबु तुर्कमानी आणि अबु अनबारी यांनी प्रशिक्षित केलेली सशस्त्र मंडळी बगदादीला सामिल झाली. वरील दोन्ही जनरल्स आज इसिसच्या सैन्यात आणि कारभारात दोन नंबरवर आहेत.
 यामुळे बगदादीचे बळ चांगलेच वाढले, यातून त्याने संघटनेसाठी पैसा मिळावा या उद्देशाने सुरुवातीला सीरियावर हाल्ला चढवला. सिरीयन राष्ट्राध्यक्ष बशर असदशी युद्ध पुकारले. यातून बगदादीला सिरीयामध्ये जागाही मिळाली, अन् तेलाचे साठे देखील. आखाती देशात अल कायदा संपल्यात जमा झाल्याने, यातून फुटून बाहेर पडणारी मंडळी बगदादीच्या कळपात सामिला होत होती. २०१३ पर्यंत सिरीयातील लाखो जिहादी बगदादीला येऊन मिळाले. अल कायदाचं अस्तित्वच संपल्याने सौदी राजपुत्रांनी इसिसला जवळ केले. त्यांना रसद पुरवण्यास सुरूवात केली. याला इराकचे पंतप्रधान नूरी अल मलीकी यांनी वाचा फोडली. इसिसला सौदी अरब आणि कुवेत हे दोन देश निधी पुरवत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला. तसेच इसिसला जॉर्डन, सीरिया आणि सौदी अरेबियामधून देखील मोठे फंडींग होत असल्याचे अमेरिकेतल्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन’ या संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. शिवाय इसिसने उत्तर सीरियामधल्या तेल विहिरींवर ताबा मिळवल्याने त्याच्या विक्रीतून या संघटनेच्या तिजोरीत भर पडते आहे.
 २०१४ मध्ये इसिसने आक्रमक रूप धारण करून त्याने आपले सैन्य इराकमध्ये घुसवले, अन् आपले मुख्यालय इराकमधीलच राक्का येथे उभारले. याकाळात अमेरिकेने आखाती देशातील लक्ष जवळपास पूर्ण काढून घेतले होते. अमेरिका शेल्फ तंत्रज्ञानामुळे तेल उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागल्याने त्यांना आता ओपेकच्या तालावर नाचावे लागणार नव्हते, त्यामुळेच की काय ओबामा प्रशासनाने अफगाणिस्तानपासूनचे आपले सर्व सैन्य बाहेर काढले. अन् ठिकठिकाणच्या छळछावणीत बंदी असेल्या सैनिकांना मुक्त केले.
 मुक्त झालेल्या आणि अमेरिकन छळाला संतापलेल्या अनेकांनी इसिसचा आश्रय घेतला. इब्राहिम दुरी हा सद्दामचा ज्येष्ठ अधिकारी बगदादीला सामिल झाला. यातून इसिसने मोठमोठ्या हल्ल्यांना सुरूवात केली. परदेशी पर्यटक, पत्रकार यांची जाहीर कत्तल सुरू केली. अन् विशेष म्हणजे, ही कत्तल करताना हा सर्वप्रकार व्हिडीओ रेकॉर्ड करून प्रसारीत करण्यात येऊ लागला.
 २००१ मध्ये ओसामाने वाढवलेला अबु मुसाब अल झरकावी हा मुल्ला इराकमधे सक्रीय होता. तो देखील बगदादीला येऊन मिळाला. त्यांचा शियांवर मोठा राग होता. शिया हे काफीर आहेत, नास्तिक आहेत अशी त्याची धारणा होती. यातून त्याने इराक आणि सिरीया या दोन्ही देशांमधील शियांची कत्तल करण्यास सुरूवात केली. शिया मशिदी, शिया वस्त्यांवर आत्मघाती हल्ले करणे, अगदी एकट्या शियालाही गाठून मारणे आदी उद्योग सर्रास सुरू होते. अशाप्रकारे बगदादीला एकेक माणसे मिळत गेली.  अन् नंतर जिहादासाठी हीच माणसे जगभर पसरली जाऊ लागली. याला आत दक्षिण अफ्रिकेतील बोको हराम सारखी क्रुर संघटना देखील येऊन मिळू लागल्या आहेत.

अमेरिकेने तेलाच्या राजकारणासाठी सुरू केलेला अखाती देशातील इस्लामी टोळ्यांचा वापर. त्यातून स्थानिकांचा चालवलेला छळ यामुळेच इसिसचे पिल्लावळ जन्माला आले आणि आता ते वयात आले आहे. वयात आलेल्या मुलाचे तरुणपणातील उपद्रव मुल्य दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातूनच तो अमेरिकेच्या दोस्त राष्ट्र असणार्‍या फ्रान्सला लक्ष केले आहे. जानेवारीमधील पॅरिसमधीलच शार्लि हाब्दो वरील हाल्ल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दुसर्‍यांदा हल्ला करून हे सिद्ध केले आहे. आता या उपद्रवी पिल्लावळाचे वाढते पंख लवकरात लवकर छाटण्याची वेळ आली आहे.

Thursday, 27 August 2015

अन् फुगा फुटतोय...


गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या चिनी ड्रॅगनच्या घोडदौडीला आता ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे. स्वत:ला बलशाली म्हणवून घेण्यासाठी चीनने आपल्या अर्थव्यवस्थेत जे काही बदल घडवून आणले, ते बदलच त्याच्यावर उलटू लागले आहेत. सोमवारी शांघाय शेअर बाजारातील घसरण हे त्याचे एक उत्तम उदहारण म्हणता येईल. जगात दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून गणल्या जाणार्‍या अर्थव्यवस्थेचे पितळ आता हळूहळू उघडे पडू लागले आहे. 

गेेल्या काही वर्षांपासून चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि मंदीची झालर कमी करण्यासाठी आपल्या चलनाचे अवमूल्यन करण्याचा जणू सपाटाच लावला. याचा परिणाम शांघायसह जगातील इतर देशांमधील शेअर बाजार कोसळण्यावर झाला.
 तर दुसरीकडे, चीन उत्पादन करत असलेल्या उत्पादनांची विश्वासार्हता कमी झाल्याने देशांतर्गत वस्तूंची मागणी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चीनमधील आयात-निर्यातदेखील अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे, चीनची अर्थव्यवस्था एकप्रकारे मंदीच्या गर्तेत सापडली आहे. वास्तविक, चीनी अर्थव्यवस्थेचा मुख्य जोर हा आयातीपेक्षा निर्यातीवरच जास्त आहे; पण सातत्याने त्यात घटच झाली आहे. रॉयटर्स या जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या भारतातील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, जून अखेर चीनी वस्तूंच्या निर्यातीमध्ये ८.३ टक्क्यांची घसरण झाली. शिवाय ‘युआन’ (चीनचे चलन)च्या सातत्याने अवमूल्यनाने चीनी अर्थव्यवस्थेच्या फुग्यातील हवाच चालली आहे, असा निष्कर्ष काढला होता.
 चीनने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले स्थान टिकविण्यासाठी स्थानिक उद्योगांना वारेमाप सवलती दिल्या, इथे चीन चुकला. उद्योगांना मदत करण्यासाठी देऊ केलेले कर्ज शेअर्समध्ये रुपांतरित करण्याची घोडचूक चीनने केली. सरकारचे उद्योगांना अभय मिळाल्याने चीनमधील जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला आणि त्यांनी कर्ज काढून पैसे शेअर मार्केेटमध्ये गुंतवले. त्यामुळे शेअर बाजारातील दलालांची चांगलीच चांदी झाली. एका वर्षात तब्बल १५० टक्के परतावा शेअर होल्डरांना मिळू लागल्याने शांघाय शेअर बाजारात एकच गर्दी उसळली. काही विदेशी गुंतवणूकदारांनी आपले हात ओले करून घेण्याच्या उद्देशाने डॉलर्सच्या स्वरूपात आपला पैसा शांघाय शेअर बाजारात लावला. युआनच्या अवमूल्यनाने त्याचे धक्के आता त्यांना बसू लागले आहेत.
 दुसरीकडे अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानाचा परिणामदेखील चीनी अर्थव्यवस्थेवर झाला. २१व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या दरांमध्ये घसरण होऊ लागली होती. या घसरणीचा फटका वारंवार आपल्या अर्थव्यवस्थेला बसू नये, म्हणून चीनने चालाखीने खेळी करत, आपल्या ‘युआन’चे आवमूल्यन करण्यास सुरुवात केली. गेल्या सोमवारी चीनने आपल्या युआनच्या दरात तब्बल दोन टक्क्याने अवमूल्यन केले. त्याचा थेट परिणाम शांघाय शेअर मार्केेटवर झाला. शांघाय शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेले शअरचे भाव गडबडले. अन् अनेकांना अरबो-खरबोंचे नुकसान सहन करावे लागले.
 वास्तविक, इतर राष्ट्रांवर दबदबा निर्माण करण्यासाठी चीनला १९७८पासून वेगाने प्रगती करण्याची हाव जडली. त्यासाठी त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेची कवाडे इतर देशांना उघडी करून दिली. १९७८ ते २००५ या काळात चीनने आपला विकास दर असा काही वाढवला की, हा आकडा बघून सगळे जग अचंबित झाले. १९७८ साली चीनचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) १५३ अमेरिकन डॉलर होता. मात्र, तोच जीडीपी २००५ साली एक हजार २८४ अमेरिकन डॉलरपर्यंत फुगला होता. हा आकडा पाहून जगातील गुंतवणूकदारांनीच नव्हे, तर अर्थतज्ज्ञांनीदेखील तोंडात बोटे घातली. चीनने आपला हा आकडा वाढविण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना बोलावून आपल्या देशात दुकान थाटावे आणि देशवासीयांना गडगंज बनवावे, यासाठी उद्योजकांना अनेक गाजरे दाखवली. अन् यावर भुललेल्या गुंतवणूकदारांनी विविध मार्गाने या देशात भली मोठी गुंतवणूक केली. शेअर बाजारात ही गुंतवणूक सर्वात मोठी होती, भारतीय रुपयांनुसार हा आकडा सात लाख कोटी इतका मोठा होता. आज हा सर्व पैसा शांघायच्या बाजारात बुडाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही, असे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडे अजून तीन हजार कोटी डॉलर्सची गंगाजळी शिल्लक असल्याने तिचा वापर अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे मत शेअर बाजारातील घसरणीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुरामन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील असे चढ-उतारांपासून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. उलट व्यक्तिगत पातळीवर शेअर बाजारातील अशी घसरण हा नव्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णकाळच असतो.

Wednesday, 5 August 2015

मुल्ला ओमरचा मृत्यू आणि तालिबान्यांमध्ये यादवी

नुकतेच तालिबान्यांचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा खातमा झाल्याच्या वृत्ताची पुष्टी आफगाणिस्तान सरकारने केली. या घटनेनंतर ओमरची गादी कोण चालवणार? याबाबत तालिबान्यांमध्ये चर्चा सुरू झाली. ओमरनंतर दोन नंबरचा नेता म्हणून गणला जाणार्‍या मुल्ला अख्तर मन्सूर याने ही गादी बळकावली, त्यामुळे काही तालिबानी नाराज झाले. शिवाय मंसूर विरोधात ओमरचाच भाऊ अब्दुल मन्नान याने दंड थोपटले आहेत. त्यामुळे तालिबान्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यामुळे भविष्यात तालिबान्यांमध्ये यादवी माजण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

१९९०च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबानने चांगलाच धुडगूस घातला होता. तोंडाला मफलर, पठाणी पेहराव आणि हातात एके ४७ घेऊन, हे गुंड टोयाटो पिकअपमध्ये बसून येत आणि भरवस्तीत मोठा हैदोस घालत. पोलीसही यांचा प्रतिकार करण्यापेक्षा लपून बसण्यातच धन्यता मानत असत. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली होती, घरांमधून कोणीही चित्रपट अथवा टीव्ही पाहू शकत नव्हते. स्त्रियांवर तर इतका जाच होता की, दहा वर्षांच्या पुढे मुलींना शिक्षण घेण्यास बंदी होती. स्त्रियांनी आपल्या आरोग्य तपासणी पुरुष डॉक्टराकडून करायची नाही, असे फर्मानच होते. जर असे केल्यास, त्या स्त्रीला भ्रष्ट केले जात होते. घराबाहेर पडतानादेखील बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडण्यास बंदी होती. आणि सोबत वडील, भाऊ किंवा नवरा यापैकी कुणाला तरी एकाला सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते. 
एखादी स्त्री जर एखाद्या तिर्‍हाईत व्यक्तीसोबत बोलताना दिसली, तर त्या स्त्रीलादेखील दंडित केले जात होते. शिवाय त्या पुरुषाला पकडून मुख्य चौकांमध्ये, अथवा शहारातील मोठ्या मैदानामध्ये आणून फासावर लटकवले जात होते. या वेळी सर्व अफगाणी जनतेला त्याठिकाणी एकत्रित राहण्याचे आदेश दिले जात होते. देशात कायदा आणि सुव्यवस्था नव्हती, तर ‘शरियत’ शिवाय दुसरा कोणताच कायदा चालत नव्हता. मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळा नव्हत्या, तर मदरसे चालवले जात होते! आणि यामधूनदेखील तजवीद (कुराण तोंडपाठ करून घेणे), तफसीर (कुराणाचे बरोबर अर्थ ते पण स्वत:च्या फायद्यानुसार), फिका (इस्लामिक न्याय), हदिस (प्रेषितांचे जीवन व त्यांनी दिलेले निर्णय), मंतिक(तत्त्वज्ञान तेही जिहादी), तबलीग (अल्लाच्या संदेशाचा प्रसार) असे विषय शिकवले जात होते. अन् या मदरशांमध्ये ५० ते दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत. म्हणजे एकप्रकारे जिहाद्यांची फॅक्टरीच अफगाणिस्तानमध्ये कार्यरत होती. 
याला पैसा सरकारकडून नव्हे, तर कंदहारच्या मुल्ला ओमर याच्या एका छोट्याशा घरातून येत होता. कारण जे सरकार होते ते मुल्ला ओमरच्या तालावर नाचणारे होते. मुल्ला ओमर हा तालिबान्यांचा स्वयंघोषित प्रेषित (देव)च होता. त्यामुळे तो म्हणेल, ती पूर्व अशीच स्थिती अफगाणिस्तानमध्ये होती. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे नुकतेच ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीने आणि अफगाणिस्तानच्या सरकारने मुल्ला ओमरचा खातमा झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली; पण याला इथेच पूर्णविराम मिळाला नाही, तर आता मुल्ला ओमरच्या उत्तराधिकार्‍याचा वाद सुरू झाला आहे. मुल्ला अख्तर मन्सूर याच्याकडे तालिबान्यांची जबाबदारी गेल्यामुळे काहीजण नाराज झाले आहेत, तर काहींच्या मते मुल्ला ओमरचा वारसा त्याचा मुलगा याकुब याने चालवावा, अशी धारणा आहे. यासाठीच आता मुल्ला ओमरचा भाऊ मुल्ला अब्दुल मन्नान यानेदेखील आपल्या पुतण्यालाच हा अधिकार मिळावा, यासाठी बोंबाबोंब सुरू केली आहे. वास्तविक, मुल्ला ओमर हा कोणी राजकारणी नव्हता, की ना कोणता क्रांतिकारी. त्याचे मूळ नाव महम्मद ओमर असे होते. १९५९ साली कंदहार जवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या या मुलाचे वडील एक भूमिहीन मजूर होते. जन्मावेळीच वडिलांचे छत्र हरपल्याने हा नोकरीच्या शोधात सिंगसेर येथे आला. त्या गावच्या मुल्लाची जागा रिकामी असल्याने महम्मदचा, मुल्ला ओमर झाला. वास्तविक अफगाणिस्तान हा टोळ्यांचा देश. या टोळ्या आपापसात लढाया करीत. यातूनच आफगाणिस्तानमध्ये पेटलेले हे टोळी युद्ध रंक्तरंजित बनले होते. याचा फायदा रशियन सैन्य घेत होते, तेव्हा या सर्व टोळ्यांना एकत्रित आणण्यासाठी मुल्ला ओमरने आपला शिक्षकी पेशा सोडून हातात बंदूक घेतली. अफगाणमधील टोळ्यांना एकत्रित करून, त्याने ‘तालिबान’ ही संघटना जन्माला घातली. आधीच या संघटना रक्ताला चटावलेल्या होत्या. त्यामुळे देशातील इस्लामीकरण टिकविण्यासाठी यांनी एकत्रित येऊन, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये रक्ताचे पाट वाहायला सुरुवात केली होती. १९८९ ते १९९२पर्यंत तालिबान्यांचा हा नंगा नाच संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये चालत होता. त्यातूनच १९९२ साली तालिबान्यांनी तत्कालिन नजिबुल्ला सरकार उलथवून लावले. अन् तालिबान्यांचे सरकार स्थापन केले. हे सरकार मुल्ला ओमरच्या सिंगेसरमधल्या छोट्याशा एका खोलीतूनच चालवले जात होते. एका खोलीत मदरसा आणि दुसर्‍या खोलीत सरकार चालविण्याचे कार्यालय. मुल्ला ओमरला पाहिजे त्या वेळी पाहिजे ते अध्यादेश वजा फतवे काढण्याची सवय होती. एकप्रकारे मुल्ला ओमरचा मनमानी कारभारच देशभर चालू होता. त्यामुळे हा स्वयंघोषित प्रेषित आपल्या कार्यपद्धतीमुळे जगातील नवा हुकूमशहाच ठरला होता. याला आर्थिक रसद सौदीपुत्रही देत होते आणि ओसामा बिन लादेनही. कारण, एकतर १९९५ साली तालिबान्यांचा अफगाणिस्तानमध्ये नंगा नाच सुरू होता, त्या वेळीच या मुल्लाने तिसरे लग्न केले. अन् तेही ओसामाच्या मुलीशी. अन् गंमतीची गोष्ट म्हणजे, ओसामानेदेखील मुल्ला ओमरच्या एका बहिणीशी लग्न केले. या नव्या साटे लोट्यामुळेच हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. तालिबानी संघटना वाढविण्यासाठी आणि पोसण्यासाठी आर्थिक रसद पुरविण्याचे काम ओसामा करीत होता. यातून जिहादी बळकट होत होते. याचाच परिणाम अमेरिकेवरील ‘९/११’च्या हल्ल्यात झाला. यानंतर ओसामाला अफगाणिस्तानचा ‘राजा’आश्रय देण्याचे काम मुल्ला उमर आणि त्याचे आफगाणी सरकार यांनी केले. अन् यातूनच हे दोघेही जगाचे इस्लामीकरण करण्याच्या मागे लागले होते.
अफगाणमध्ये तालिबान्यांचा प्रभाव जसजसा वाढत होता, तसतसा मुल्ला ओमरच्या आसपासचा गोतावळादेखील वाढत होता. यात सर्व होते, मुल्ला होते, मौलवी होते, सर्व इस्लामी कट्टरपंथीच होते. पाश्‍चात्यांचा उमरला भयंकर तिटकारा होता. त्यामुळे तालिबानी परदेशींना उमरच्या जवळही भटकू देत नव्हते; पण ९/११च्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकन सैन्य आणि नॉर्दन आलायन्स हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये डेरेदाखल झाले आणि एकप्रकारे मुल्ला ओमरच्या एकाधिकारशाहीला उतरती कळा लागली. अमेरिकन सैन्याने, तर तालिबान्यांना पिंजूनपिंजून मारले. त्यामुळे ओसामा सोबतच मुल्लालाही लपावे लागले. त्याला एका शहरातून दुसर्‍या शहरात पळावे लागत होते. अखेर २००९ साली अमेरिकन सैन्याने ओसामाला अबोटाबादमध्ये संपवल्यानंतर तालिबानी ताकद कमी झाली. यानंतर तालिबान्यांना पोसणारा कोणीही नसल्याने तालिबानी संपल्यात जमा झाले. नुकताच तालिबान्यांचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा मृत्यू झाल्याचे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी जाहीर केल्यानंतर त्याच्या वारसा हक्काच्या वादाला सुरुवात झाली आहे. मुल्ला अख्तर मन्सूर आणि मुल्ला याकुब हे दोघेही आमने-सामने आले आहेत. हा वाद चिघळणार आणि तालिबान्यांमध्येच यादवी माजणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
कारण मुळात मन्सूर हा तालिबान्यांमध्ये दोन नंबरचा नेता म्हणून ओळखला जातो. तोच ओमरच्या अनुपस्थितीत सर्व सूत्रे सांभाळत असे. त्यामुळे उमरनंतर त्यालाच नेता करण्यासाठी काहिंनी चंग बांधला, तर आता ओमरच्या मुलालाच ही गादी मिळावी, त्यासाठी त्याचा काका मुल्ला अब्दुल मन्नान सरसावला आहे. या सर्व घटनांमुळे अफगाणिस्तानमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच आखाती देशावरील इसिसच्या वाढत्या प्रभावामुळे तालिबान्यांचे आस्तित्व धोक्यात आले आहे, तेव्हा तालिबानी एकत्र राहून इसिसशी संघर्ष करतात की, आपापसातच लढून पुन्हा टोळी युद्धाला आमंत्रण देतात किंवा इस्लामिकरणासाठी इसिसशी हातमिळवणी करतात, यावरच आखाती देशाचे राजकारण अवलंबून आहे. यातच अफगाणिस्तानमधील ‘टोलो न्यूज’ या वृत्तवाहिनीने मुल्ला उमर सोबतच त्याचा मुलगा याकुब हा पाकिस्तानमधील क्वेटामध्ये ठार झाल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा मन्सूर यांने फेटाळून लावला आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून तालिबान्यांसोबत अफगाणिस्तान सरकारची सुरू असलेली शांततावार्ता मोडल्याचे मन्सूर यांनी जाहीर करून, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचीच एकाधिकारशाही या पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. या यदवीमुळे लोकशाही निर्माण होत की नवा मुल्ला उमर जन्माला येतो हे पाहणे संयुक्तीक ठरेल.
http://mumbaitarunbharat.in//Encyc/2015/8/5/1398101.aspx#.VcIsPu7_Knx.