Monday 21 November 2022

मराठी पत्रकारांचा केमिकल लोच्या...


केमिकल लोच्या... हा शब्द जरी कानावर पडला की, लगेच आठवतो लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाई अर्थात संजय द्त्त! राष्ट्रपिता महात्मा गांधींप्रती अफाट वाचन केल्याने, मुन्नाभाईला महात्माजी दिसू लागल्याचा आभास निर्माण होतो. त्यानंतर त्याला जो-तो आपल्या समस्या सांगू लागतो, अन् त्या समस्यांवर आभासी महात्माजींना विचारून मुन्नाभाई उत्तरं देतो. पण जेव्हा याच मुन्ना भाईला एका पत्रकार परिषदेत सायकॅट्रिस्टकडून महात्माजींबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात.. तेव्हा त्याची उत्तरे आभासी महात्माजींना माहिती नसल्याने संजय दत्त उर्फ मुन्नाभाई पूरता निराश होतो.

त्यानंतर त्याच प्रश्नांच्या उत्तराची चिठ्ठी प्रश्नकर्ता डॉक्टर मुन्नाभाईला देतो, त्यानंतर आभासी महात्माजींकडून त्याची उत्तरे एकापाठोपाठ एक मिळतात. हे सर्व घडल्यानंतर मुन्नाभाईचा पार्टनर सर्किट म्हणजे अर्शद वारसी, जो त्याला सतत भाई…. मेरेको भी बापू दिख ते हे..असं खोटं सांगत असतो, त्या सर्किटला जेव्हा संजय दत्त उर्फ मुन्नाभाई दिशाभूल करणारा प्रश्न विचारतो की, हे सर्किट तुझे बापू दिख रहे क्या?तेव्हा नेहमीप्रमाणे अर्शद वारसी पुन्हा भाई आपको जिधर दिख रहे है वहीं मुझेही दिख रहे हैअसं खोटं सांगतो. त्यानंतर संजय दत्त एका दिशेकडे बोट दाखवून ये देख सर्किट... बापू जा रहे है उधरअसं सांगतो. तेव्हा तो पुन्हा खोटा आविर्भाव आणतो. अन् अर्शद वरसीचे हा खोटेपणा पकडला जातो, तेव्हा... संजय दत्त त्याच्यावर भडकतो... अन् म्हणतो की, झूठ बोला अपून को... झूठ... क्या अपून पागल है?... वो डॉक्टर बोला... अपून के भेजे में केमिकल लोचा है.... अपून भी साला निकलपडा बापूके भरोसें लडने को... हा संपूर्ण संवाद आणि घटना पाहिल्यानंतर आजच्या मराठी तथाकथित पुरोगामी पत्रकारांची अवस्था त्या मुन्नाभाईप्रमाणे झाली आहे असं वाटतं.

कारण, गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी पुरोगामी पत्रकारांना चुक काय आणि बरोबर काय हेच मुळात कळत नाही आहे. अन् ज्यांना कळतं, त्यांना वळत नाही, अशी स्थिती झाली आहे. हे पुरोगामी पत्रकार आपलं क्षेत्र सोडून एका पक्षाचे बटिक झाल्याने त्यांच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोच्या झाला आहे का असा प्रश्न अपसूकच विचारावासा वाटतो. कारण सध्या हे पुरोगामी पत्रकार राजकीय पक्षाचे बटीक बनल्याने ते म्हणतील ती पूर्व मानून काम करत आहेत. त्यांच्या या पक्षपातीपणाची एक नाही अनेक उदाहरणे देता येतील.



त्यातलंच पहिलं सांगयचं तर... काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरुजी) यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने प्रश्न विचारला, तेव्हा भिडे गुरुजींनी आधी तू कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन... आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रुप आहे.. भारतमाता विधवा नाहिये... कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो... अशी भावना व्यक्त केली. पण त्यानंतर सगळे पत्रकार असे काही चौताळून उठले की, जणू त्यांचा मुलभूत अधिकारच हिरावून घेतला होता. जवळपास सर्वच वृत्तपत्रांची रकानेच्या रकाने भरुन याची बातमी दिली गेली होती. तर अनेक प्रस्थापित पत्रकांरांकडून आपल्या फेसबुक, ट्विटर अशा विविध समाज माध्यमांवरुन भिडे गुरुजींवर यथेच्च चिखलफेक करण्यात आली होती.

दुसरीकडे रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिचवडमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मराठी विशेष करुन महिला पत्रकारांनी साडी घालावी, आपल्या मराठी संस्कृतीचे जतन करावं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. तर त्यानंतर आज सगळे पत्रकार चिडीचूप्प. कोणीही अवक्षरही काढायला तयार नाही. फक्त देखल्या देवा दंडवत म्हणून केवळ निषेध नोंदवत आहेत. कुणीही चौताळून उठताना दिसत नाही. कोणताही पत्रकार सुप्रियाताईंच्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी आपल्या फेसबुकवर लांबच लांब पोस्ट लिहित नाही आहे. तथाकथित बुद्धीजीवींजी देखील तिच तऱ्हा असो...

 


काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेकडून विनयभंगची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड स्वत: ला मी किती पापभिरू आहे... माझ्याकडून अशी चूक होऊच शकत नाही, अशा पद्धतीचा आव आणला जात होता. अन् ती महिलाच कशी चुकीची होती, यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर पडत होत्या दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते जितेंद्र आव्हाडांच्या बचावासाठी पुढे येत आहेत. सुप्रिया ताईंसह जयंत पाटील यांच्यापर्यंत प्रत्येकजण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारत होते की, घरी जा!’ म्हणणं हा विनयभंग आहे का? पण जेव्हा हेच जितेंद्र आव्हाड काही वर्षांपूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या समोर आपल्या विजारीत हात घालून एका वेगळ्याच नजरेतून पाहतात... अन् हा सर्व प्रकार कॅमेरात कैद होतो, तेव्हा कुठेही व्यभिचार नसतो... असो...

एवढंच कशाला जितेंद्र आव्हाड यांनी ज्या महिलेचा हात धरुन घरी जा!’ असं बोललं. त्या महिलेप्रती राज्याचा महिला आयोग गप्प.. कोणतीही प्रतिक्रीया नाही... कारण महिला आयोगाच्या लेखी त्या महिलेचा अवमान होत नाही. पण जेव्हा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं. तेव्हा व्यथित होऊन घरी जा... हा शब्द प्रयोग वापरला, तेव्हा सगळी माध्यमवीर दादांवर तुटून पडली. सतत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर हे वक्तव्य प्रसिद्ध करुन महिलांचा आवमान वगैरे सांगितलं गेलं. राज्याचा महिला आयोगाने तर चंद्रकांतदादांना नोटीस पाठवून म्हणणं सादर करण्यास सांगितलं. पण जितेंद्र आव्हाडांप्रती ढिम्म... असो... यावर जास्त बोलायला नको... कारण पुरोगामी पत्रकारांच्या भावना दुखावतील.

वास्तविक, आज मराठी पत्रकारांचा वैचारिक केमिकल लोचा झाला आहे. त्यामुळे त्यांना चुकीचं काय बरोबर काय हे दिसत नाही आहे. केवळ एकच हिंदुत्वद्वेष, मोदीद्वेष आणि भाजप द्वेष... त्यामुळे जो भाजपा आणि मोदींचा विरोधी तो आपला. म्हणून त्याची पाठराखण केली जाते. तो कितीही चुकीचा असला तरी.. त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात नाही. तर दुसरीकडे भाजपा किंवा एखाद्या हिंदुत्ववाद्याने तर्कसंगत मांडणी केली, त्यात एखादी उपमा वेगळ्या आशयाने मांडली, तर त्या वरुन असा काही गजहब माजवायचा की, जणू धरणीकंपच झाला असेल.. अशाने आज मराठी पत्रकारिता अक्षरश: लयाला जात आहे हे मात्र नक्की!  

Monday 3 October 2022

पैसा झाला मोठा...


गेल्या काही दिवसांत उत्तम पुस्तक वाचनात आलं नव्हतं. त्यामुळे थोडं अस्वस्थ वाटायचं. पण अतुल कहाते यांचे पैसा हे पुस्तक हाती पडल, आणि ही अस्वस्थता काहीप्रमाणात कमी झाली. पैसा हे दोन शब्द खरंतर आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विना पैसा आपल्याला कोणीही विचारत नाही. ज्याचा जितका मोठा बँक बँलेस, तेवढी त्याला समाजात प्रतिष्ठा! हे आज एक समीकरण झाल आहे. पण हा पैसा नक्की जन्माला आला तरी कसा? आणि त्याचा विकास संपूर्ण जगभरात कशापद्धतीने झाला याचा अतिशय रंजक इतिहास अतुल कहाते यांनी आपाल्या पैसा या पुस्तकातून मांडलेला आहे.

खरंतर मानवाच्या उत्क्रांतीनंतर तो जेव्हा वस्ती करुन राहू लागला; तेव्हा त्याला वस्तूंच्या देवाण-घेवाणीची सवय लागली. आणि या देवाण-घेवाणीसाठी मानवाने एक पद्धत वापरण्यास सुरुवात केली. त्या पद्धतीलाच आपण barter system’ म्हणजेच वस्तू विनिमय प्रणाली असे ओळखतो. या प्रणालीमध्ये मानवाच्या आवश्यकतेनुसार, आपल्याकडे जास्त असणारे धान्य, वस्तू, अवजारं आदी गोष्टी, ज्यांना पाहिजेत, त्यांना देऊन त्यांच्याकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू मिळवणे, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य. या बार्टर सिस्टिमच्या काळातील किस्से आज आपण जेव्हा या पुस्तकातून वाचतो. तेव्हा कुणाचाही विश्वास बसणार नाही. कारण, आपल्याला कुणी सांगितलं की, पूर्वीच्या नोकरदार वर्गाला मीठाच्या स्वरुपात त्याचा मोबदला दिला जात होता. तर कुणीही म्हणेल काय येड्यात काढता का?”

पण बार्टर सिस्टिमच्या काळातच चीन, उत्तर आफ्रिका आणि इतर काही ठिकाणी चलन म्हणून मीठ वापरलं जात होतं. रोमन सैनिकांनाही त्यांच्या कामाचा मोबदला हा मीठाच्या स्वरुपातच दिला जायचा. सुदानमध्येही घोडे, कपडे, गुलाम हे सर्व मिठाच्या स्वरुपात दिलं जायचं. एका गुलामाची किंमत ही त्या गुलामाच्या पायाच्या आकाराएवढं मीठ इतकं ठरवलं जाई. त्यातूनच salary म्हणजेच आपल्या मराठी भाषेतील पगार ही संकल्पना अस्तित्वात आली.  

मानवाचा जसजसा विकास होत गेला, तसतशी वस्तू विनिमयाची ही पद्धत लोप पावली म्हणा, किंवा कालबाह्य झाली. याचे प्रमुख कारण एकतर आपल्याकडील वस्तू, जर दुसऱ्याला गरज नसेल, तर आपल्याला हवी असलेली वस्तू कशी मिळवायची किंवा वस्तूंची देवाण-घेवाण करताना त्याचे प्रमाणबद्धता कशी ठरवायची या आणि अशा विविध अडचणींमुळे वस्तू विनिमयाची ही पद्धत एक प्रकारे मोडित निघाली. पण जेव्हा माणसाला धातूचा शोध लागला, त्यानंतर वस्तू विनिमयासाठी चलन संकल्पना आकाराला येऊ लागली. धातूच्या शोधामध्ये जिथं सोनं मिळेल, तिथं सोनं, जिथं चांदी मिळेल तिथं चांदी, जिथं लोखंड मिळेल, तिथे लोखंड अशा स्वरुपात हे चलन वापरलं जाई. काही ठिकाणी तर सोन्यापेक्षा चांदीला अधिक महत्वाचं मानलं जाई. त्यामुळे सोन्यापेक्षा चांदीला भाव जास्त होता.

इ.स.पू. २०० च्या जवळपास वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी चलनाचा वापर सुरु झाला.  इ.स.पू. ६४० ते ६३० या काळामध्ये लिडीयामध्ये (आताच्या पश्चिमी अनातोलिया, सालिहली, मनीसा, तुर्की) छोटंसं साम्राज्य अस्तित्वात होतं. त्या साम्राज्यात प्रथमच नाण्यांचा वापर करण्यात आला.

त्यानंतर ही नाणी ग्रीक शहरांमध्ये आणि सिसिली व इटली आदी भागात पसरली. तर कागदी चलन ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये अस्तित्वात आली. या सर्वांचाही विकास अतिशय रंजक आणि रोमहर्षक म्हणावा लागेल. कारण, याकाळात चलन म्हणून वापरण्यात आलेल्या नाण्यांचा विकास हा काही ठिकाणी क्रूर, रंक्तरंजित होता.

आपल्या भारताच्या बाबतीत सांगायचं झालं, तर चालुक्य राजाच्या काळापासून (इ.स. ५००) होन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या नाण्यांचा वापर होत होता. पण नंतर पुतळी नावाचं नाणंही अस्तित्वात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन नाण्यांबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई नावाचं नाणं नक्की करुन घेऊन, ते चलनात आणलं. या नाण्याच्या एका बाजूला तीन उभ्या ओळींमध्ये श्री राजा शिव अशा मजकूर असे. तर नाण्याच्या मागे दोन उभ्या ओळींमधेये छत्रपती असं कोरलेलं असायचं.

६ जून १६७४ साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेक सोहाळ्याला ब्रिटीश हजर होते. या ब्रिटिशांनी शिवाजी राजांकडे जी मागणी केली, ती वाचून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण, ब्रिटिशांनी चक्क शिवाजी महाराजांना ब्रिटिशांनी चलनात आणलेल्या नाण्यांचा वापर, आपल्या हिंदवी साम्राज्यात करावा असा प्रस्ताव ठेवला होता. महाराज हे अतिशय दूरदर्शी असल्याने त्यांनी ब्रिटिशांचा प्रस्ताव फेटाळून लावत, त्यांच्या त्या प्रस्तावाचा योग्य त्या शब्दांत समाचार घेतला. ब्रिटिश हे आपल्या या कृतीतून एकप्रकारे महाराजांनी अथक परिश्रमांनी उभारलेल्या हिंदवी साम्राज्यावर पकड आजमावू पाहात होते.

पण दुर्देवाने १८३५ मध्ये ब्रिटिशांनी भारतावर आपली पकड मजबूत केली, आणि त्यांनी शिवकालीन सर्व नाणी मोडिक काढून रुपया हे चलन अस्तित्वात आणलं. अन् हाच रुपया आज आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन झालं आहे. या रुपयाशिवाय आज आपलं पानही हालत नाही, अशी स्थिती आहे. या रुपयाचा जन्मापर्यंतची कथा वाचताना आपण त्या काळात जातो, हे या पुस्तकाचं यश मानलं पाहिजे. आज आपण २१ व्या शतकात असलो, तरी या रुपयाच्या जन्मापर्यंतचा इतिहास सर्वांनी वाचलाच पाहिजे.  

Friday 10 June 2022

संघटन शरण चंद्रकांतदादा!


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघाच्या शिस्तीत तयार झालेलं हे व्यक्तीमत्त्व. आपल्या आयुष्यातील ६३ वर्षे पूर्ण करताना, संघटन शरण कसं असावं, हे त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळतं. कारण, रा. स्व. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला जशी शिकवण असते, त्या शिकवणीवरच आधारित दादांची आजपर्यंतची वाटचाल राहिलेली आहे. त्यामुळे संघटनेलाच सर्वस्व मानून, संघटना सांगेल, ते करणं हे दादांचं जीवनसार राहिलेलं आहे.

त्यामुळे दादांनाही कधी एखाद्या पत्रकाराने संघटनेबाबतच्या कोणत्याही निर्णयाबाबत विचारलं, तर दादा तात्काळ म्हणतात. आम्ही संघाच्या शिस्तीत तयार झालो आहोत. त्यामुळे संघटना माझ्या पाकिटावर जो पत्ता लिहिल, त्या पत्त्यावर जायचं आणि पडेल ते काम करायचं. त्यांच्या या उत्तरातून ते संघटनेप्रती किती समर्पित आहेत, याचा सहज प्रत्यय येतो.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना, दादांना स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. दादांसाठी हा सहवास म्हणजे परिसस्पर्शच होता. कारण, स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांच्यामुळे दादांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. एका गिरणी कामगाराचा मुलगा संघटनेच्या बळावर किती मोठा हेऊ शकतो, हे दादांकडे पाहिल्यावर समजते.

त्यामुळे दादा या दोन्ही महाद्वयींना गुरुस्थानीच मानतात. त्यामुळे त्यांना कधीही या दोन्ही महाविभूतींबद्दल विचारलं तर ते म्हणतात की, माझे गुरु यशवंतराव केळकर आणि बाळसाहेब आपटे यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यांनी मला एक शिकवण नेहमी दिली ती म्हणजे तुला एक खोली दिली आहे. ती खोली स्वच्छ कशी ठेवायची जबाबदारी तुझ्याकडे आहे. त्यामुळे तू दुसऱ्याच्या खोलीत काय चाललंय ते पाहू नको. तुला दिलंय ते काम तू कर.दादांवरील याच संस्कारामुळे संघटनेनेही त्यांच्याकडे जे-जे दायित्व सोपवते, ते-ते अतिशय समर्थपणे आणि यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मग ते अभाविपचं राष्ट्रीय संघटनमंत्री पद असो किंवा आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद. या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय लिलया सांभाळल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील दादांनी कुठून निवडणूक लढवायची? हा विषय चर्चेला आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांनी दादांनी कोथरुडमधूनच निवडणूक लढवावं हे निश्चित केलं होतं. विधानसभा निवडणुकीसाठीची पक्ष कार्यकारिणीचीही बैठक झाली, तेव्हा त्या बैठकीतही दादांनी माननीय मोदीजी आणि अमित भाईंना पुण्याऐवजी कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची संधी द्या! अशी विनंती केली. पण मोदीजी आणि अमित भाईंनी निर्णय दिला होता. त्यामुळे नेत्याची इच्छा ही आज्ञा प्रमाण मानून दादांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आणि निवडणूक लढून विजयी झाले.

कोथरुड मतदारसंघातूनही निवडून आल्यानंतरही त्यांनी स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांची शिकवण कृतीत उतरवण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणूक निकालानंतर काहीच महिन्यात कोविड महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढावले. सगळेच या महामारीसमोर हातबल झाले होते.

याकाळात भारतीय जनता पक्षाने सेवा हेच संघटनचा नारा दिला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपा कामाला लागला. आपल्य कोथरुड मतदारसंघातील एकही व्यक्ती कोविडच्या काळात दोनवेळचं जेवण मिळालं नाही, म्हणून उपाशी राहायला, असं होऊ नये, यासाठी दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था यांसह अनेक उपक्रम राबविले. त्यात मग कोविडबाधितांसाठी मोफत वैद्यकीय सल्लासह औषधोपचार असो किंवा कोविड केअर सेंटर असो, किंवा कोविड नंतर सुरु केलेले फिरते पुस्तक घर, मोफत फिरता दवाखाना, वस्ती भागाच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीनची व्यवस्था, एक ना अनेक उपक्रम सुरु केले. यामध्ये आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला ज्याप्रमाणे काहीही कमी पडू नये, यासाठी घरचा कर्तापुरुष धडपडत असतो. अगदी तशीच तळमळ दादांची कोथरुडकरांप्रती राहिलेली आहे. यामुळे कोथरुडकर देखील आज दादांच्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान बाळगतात.

आज त्यांचा वाढदिवस. पण हा वाढदिवस देखील लोकसेवेचं माध्यम मानून साजरा करण्याचा ध्यास, त्यांचा दरवर्षी असतो. यात गेल्या वर्षी त्यांनी घरेलू कामगारांचे मोफत लसीकरण आणि रिक्षाचालकांना एक हजार रुपये किमतीचे मोफत सीएनजी कुपनचे वाटप केले होते. याचा कोथरुडमधील आर्थिकदृष्ट्या कामगारांनीही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यंदाही रिक्षाचालक, पेपर वितरक, दूध वितरक घरकाम करणाऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

यातून त्यांचे सेवा हेच समर्पण ही वृत्ती प्रतित होते. संघाच्या संस्कारामुळेच ते समाज सेवेसाठी सर्वस्व अर्पण करुन काम करत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतायुष्य लाभो हीच प्रार्थना!

Monday 18 April 2022

कोल्हापूर उत्तरच्या निकालाचा अन्वयार्थ


नुकताच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या. पण त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची जुनी वक्तव्य काढून हिमालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मुळात या विजयाचे तटस्थपणे विश्लेषण होण्याची गरज आहे. पण तसे न होता, जो-तो आपापला कंड शमवण्यात मशगुल दिसत आहे.

वास्तविक, ही निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर मधून कोण निवडणून येणार, याचे उत्तर कुणालाही सांगणे अशक्य झाले होते. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेत, हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्यानंतर राजेश क्षीरसागर चार दिवस नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या मनात चांगलीच धडकी बसली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांना मुंबईत बोलवून घेत, आपले मुख्यमंत्रीपद शाबूत राखण्यासाठी काँग्रेसला मदत करण्याचा सल्ला क्षीरसागर यांना दिला. त्यानंतर त्यांनीही शब्द प्रमाण मानून काम करण्यास सुरुवात केली. तरीही त्यांच्याबद्दल शिवसेना नेतृत्वाला शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळे सेनेवर दगाफटक्याचे बालंट येऊ नये यासाठी नेतृत्वाने आपले निरिक्षक मुंबईतून कोल्हापुरात पाठवून दिले. पण तरी शिवसेनेप्रती सहानुभूती असणारे मतदार काँग्रेसला मतदान करण्यास तयार नव्हते, हे वेळोवेळी दिसून येत होते. अन् निवडणूक निकालातूनही हे स्पष्ट पणे जाणवून येत आहे.

कारण, वरकरणी शिवसेनेने आपली मते, काँग्रेसला दिली असल्याचे विश्लेषण केले जात असले, तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना जितकी मते मिळाली, ती सर्व मते पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेली नाहीत. उलट शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचे निवडणूक निकालातून सरळ सरळ दिसून आले. पण याची वाच्यता होऊ नये, म्हणून निवडणूक निकालापूर्वीच शहरात सर्वत्र शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याचे बॅनर शहरभर झळकवले गेले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील या निवडणुकीत नावापुरताच सहभागी झाला होता, असे चित्र होते. कारण, जिल्ह्यातील राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे मंत्री हसन मुश्रीफ हे प्रचारात जास्त काळ रमले नाहीत. एक-दोन सभा वगळता राज्यातील शीर्षस्थ नेते प्राचाराला आल्यानंतरच ते त्यांच्या ताफ्यात फिरताना दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान कितपत होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. असो...

या निवडणुकीत आज भाजपाचा पराजय झाला असला, तरी हा पराजय इतका जिव्हारी लागण्या इतपत नक्कीच नव्हता, हे अनेक राजकीय विश्लेषकही विविध व्यासपीठावरुन मान्य करत आहेत. कारण, तिन्ही पक्ष एकत्रित असतानाही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनाही म्हणावा इतका टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष आज जरी आनंद व्यक्त करत असले, तरी त्यांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर २०१४ चा अपवाद वगळला, तर इथे भाजपाने कधीही विधानसभा निवडणूक लढलेली नाही. तसेच दुसरं म्हणजे कोल्हापूर महापालिकेतही भाजपाची ताकद १३ नगरसेवकांपूरती मर्यादित राहिलेली आहे. याची कारणमिमांसा केली, तर वर्षानुवर्षे कोल्हापूर शहरावर डावे आणि काँग्रेसचा पगडा राहिला आहे. शिवसेना जरी इथे अस्तित्वात असली, तरी ती केवळ काही भागांपूरतीच आणि तडजोडीच्या राजकारणामुळेच वाढू शकली आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववाद्यांचा गढ म्हणून इथे कोणताही मतदारसंघ अस्तित्वात येऊ शकला नाही.

त्यामुळे ही निवडणूक लढवणं भाजपासाठी संघटनात्मक दृष्ट्या मोठं आव्हान होतं. तरीही हे आव्हान पेलण्याची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उचलली. अन् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे चंद्रकांतदादांनी बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढला. तसाच कोल्हापूर उत्तर मतदारसंघ या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंजून काढला. त्यांच्यासोबतीला माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नेटवर्क आणि समरजीत राजे घाटगे आणि शौमिका महाडिक यांच्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या सभांमधील अभ्यासू मांडणीमुळे, उत्तर मतदारसंघात भाजपाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

या निवडणुकीतील भाजपासाठीची एक मोठी उपलब्धी म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर भाजपा ज्या प्रकारे चार्ज झाला, त्यातून भविष्यात कोल्हापुरात भाजपाच्या वाढीसाठी मोठा वाव मिळाला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास बोलून दाखवला आहे.

निवडणूक निकालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांना सोशल मीडियावरुन ट्रोलिंग सुरु आहे. पण हे ट्रोलिंग आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यकौशल्याची पावतीच म्हणावी लागेल. कारण, त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र भाजपामय केला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे भले-भले नेते गारद झाले. दादांच्या संघटन कौशल्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना म्हाडा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली होती. तर बारामती मतदारसंघ वाचविण्यासाठी पवार साहेबांना झगडावे लागत होते. त्यामुळे तेव्हापासूनच चंद्रकांतदादा हे विरोधकांच्या विशेष करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिट लिस्टवर राहिले आहेत.

कोल्हापूर उत्तरच्याबाबतीत आणखी बोलयाचे झाले तर, ही निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत बोटावर मोजण्या इतक्याच दिवसांचा कालावधी प्रचाराला मिळालेला होता. हा कालावधी कमी दिवसांचा असला, तरी भाजपाने तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचारसभांऐवजी घरो-घरी जाऊन संपर्क आणि मतदारांना भाजपाकडे खेचण्यावर भर दिला होता.

त्यामुळेच ज्या कसबा-बावडा भागात भाजपा कार्यकर्त्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत होते, त्या कसबा-बावड्यासह पेठांमधून आणि शहरातील इतर भागातून भाजपाला भरघोस मतदान झाले. विशेष म्हणजे, तिन्ही पक्ष एकत्रित येऊनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जितकी मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली होती; त्यापेक्षा पाच हजार जास्त मते जयश्री जाधव यांना मिळाली. त्यामुळे तिन्ही पक्षांची ताकद कुठे गेली, याचा शोध सध्या राजकीय विश्लेषक घेत आहेत. तर दुसरीकडे २०१४ च्या तुलनेत पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला दुप्पट मते मिळाली.

आज या निवडणुकीचे किंगमेकर सतेज उर्फ बंटी पाटील यांना म्हणवले जात आहे. पण त्यांनाही प्रचार काळात अक्षरश: तोंडाला फेस आला होता. त्यामुळेच प्रचारावेळी जिथे चंद्रकांतदादा पाटील जायचे; तिथे बंटी पाटील त्यांच्या मागून हजर असायचे. इतका धसका बंटी पाटील यांनी प्रचारादरम्यान घेतला होता.

आणखी एक म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला खऱ्या अर्थाने तारून नेले ते खरं म्हणजे मालोजी राजे यांनी. कारण मालोजी राजे स्वत: फुटबॉलप्रेमी आहेत, कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींची मोठी संख्या आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मालोजी राजेंनी आपले मतदान बाहेर काढले नसते, तर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना विजयासाठी पूरती दमछाक करावी लागली असती. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचे खरे किंगमेकर कोण हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. असो...

पण या पोटनिवडणुकीने एक दाखवून दिले ते म्हणजे, कोल्हापूरचा गढ हा काँग्रेसच्या हातातून नसटण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्याप्रकारे दिवा वीजण्याआधी तो जास्त प्रकाशमान होतो; त्याप्रमाणे काँग्रेसच्या विजयाकडे आज पाहिले पाहिजे.

Tuesday 22 March 2022

काश्मीर फाईल्स- डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का देणारा चित्रपट


दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. पण काहींना या चित्रपटामुळे पोटशूळ उठला आहे. त्यामुळे थेट टिका करण्याऐवजी; ते पडद्याआडून टिका करत आहेत. वास्तविक, या चित्रपटामुळे डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का दिला आहे.

कारण, ज्या पद्धतीने डाव्यांचा गढ मानल्या जाणाऱ्या जेएनयूमधून त्यांची मोडस ऑपरेंटी सिस्टिमद्वारे निष्पाप तरुणांचा ब्रेन वॉश करुन, त्यांना देशविरोधी कारवायांमध्ये अडकवले जाते. त्यावर जोरदार आघात या चित्रपटातून केला आहे. अन् यात पल्लवी जोशीने साकारलेल्या राधिका मेननच्या पात्रामुळे डावी मंडळी प्राध्यापिकेचा बुराखा पांघरुन, कशापद्धतीने तरुणांना मिसगाईड करतात, अन् आपला अजेंडा पुढे रेटतात हे अतिशय समर्पकपणे दाखवले आहे. त्यामुळेच अनेकांना यावर पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे.

दोन दिवसापूर्वीच्या सकाळच्या पूरवणीमध्येही श्रीराम पवार यांच्यासारख्या ज्य़ेष्ठ पत्रकारांचा एक लेख छापून आला आहे, त्यातून ही मळमळ अतिशय स्वच्छपणे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी व्ही.पी.सिंह सरकारचा दाखला देऊन अटलबिहारी वाजपेयी यांनी आवाज का उठवला नाही, वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले.

वास्तविक, श्रीराम पवार काय किंवा स्वरा भास्कर काय एकाच माळेचे मणी. कारण, जर या चित्रपटातून तत्कालिन काश्मिरमधील विदारक स्थिती जशी आहे, तशी दाखवली नसती, आणि नेहमीप्रमाणे मुळमुळीत दाखवली असती, तर त्यांनीच हा चित्रपट कसा चांगला आहे? हे ओरडून ओरडून सांगितले असते. पण या चित्रपटातून डाव्यांच्या इकोसिस्टिमलाच जोरदार धक्का लागल्याने, ते आपली मळमळ या-ना-त्या प्रकारे व्यक्त करत आहेत. असो...

मी पत्रकारिता शिकत असताना गोवा फिल्म फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या राक्षसीवृत्तीवर आधारित चित्रपट पाहिला होता. त्याचे नाव आज आठवत नाही. पण त्यातील काही दृष्ये आठवतात. कारण, चित्रपटाची धाटणी देखील अशीच होती.

ज्या मुस्लिम महिला तालिबान्यांचे कायदे पाळत नाहीत, त्यांचाही असाच शेवट केला जात होता. जसा दि कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शेवटच्या भागात कश्मिरी पंडित महिलेला मारल्याचं दाखवले आहे. त्यावेळी तिथले अनेक विश्लेषकांनी या चित्रपटाचे कौतुक केलं होतं.

पण असंच वास्तव, जेव्हा आपल्याकडे दाखवलं जाते, त्यावेळी ते एकांगी वाटतं. कारण, का तर यातून एखादा ठराविक वर्गाची इको सिस्टिम डळमळीत होणार असते. त्यामुळे यापूर्वी विवेक अग्निहोत्रीचाच ताशकंद फाईल्स या चित्रपटाबाबत देखील असाच वाद उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी तर चित्रपट रिलीज करु नये, यासाठी विवेक अग्निहोत्रीला धमकावले ही जात होते. पण तरीही हा चित्रपट रिलीज झालाच. अन् लालबहाद्दूर शास्त्रीजींचा मृत्यूचे गुढ नव्या पीढिला समजले.

भविष्यातही असे अनेक चित्रपट येतील, त्यातही जर डाव्यांच्या इकोसिस्टिमला धक्का लागणार असेल, तर त्याबाबत वाद निर्माण केला जातोच जातो. पण त्यामुळे सत्य काही लपत नाही, हे मात्र नक्की!

Thursday 17 February 2022

RIP ऐवजी ॐ शांती


नुकतेच गानसम्राज्ञी लता दीदि आणि प्रसिद्ध संगितकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. बॉलिवूडसह प्रत्येक देशवासियांनी लता दीदि आणि बप्पीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सोशल मीडियावरही श्रद्धांजलीच्या अनेक पोस्ट आल्या. पण हे करताना एक बदल ठळकपणे अधोरेखित होत होता. तो म्हणजे, अनेकांनी RIP ऐवजी ॐ शांती वापरले होते. हा बदल भारतीयांसाठी फारच सकारात्मक म्हटला पाहिजे.

कारण, आपल्याकडे कोणाचेही निधन झाले की, RIP म्हणजेच Rest in Peace (शांततेत विश्रांती घ्या!) हा शब्द प्रयोग वापरण्याची पद्धत रुढ झाली होती. पण तो वापरणे कितपत योग्य याबद्दल अनेक मतप्रवाह दिसून येत होते. पुरोगामी मंडळी याचे समर्थन करताना दिसत होती. तर राष्ट्रवादी, भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते RIP चा विरोध करत होते. ते RIP ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे यावर व्यक्त होताना अनेकांना प्रश्न पडायचा. पण आता यातून परदेशातच, विशेष करुन ज्यांनी हा शब्द वापरण्याची सवय लावली त्या ख्रिश्चनांमध्येही याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळे याचा खोलात जाऊन आपणही विचार करण्याची गरज आहे.

वास्तविक, RIP म्हणजे Rest in Peace हा मूळ लॅटिन शब्द आहे. Requiescat in permanens या शब्दापासून RIP ची निर्मिती झाली. ख्रिश्चनांमधील अँग्लिकन, लूथरन, मेथोडिस्ट आणि कॅथेलिक प्रार्थनेत या शब्दाचा वापर केला जातो. याचा अर्थ जेव्हा विश्वाचा अंत होईल, त्यावेळी तुझ्या पाप-पुण्याचा हिशेब केला जाईल, तोपर्यंत तू इथेच शांतपणे विश्रांती घे!”

आता याबद्दल अजून जाणून घेऊया. कारण या RIP चा इतिहास ही अतिशय रोमांचक आहे. पाचव्या शतकात हा शब्द काही प्रमाणात कबरवर लिहिला जात असे. पण कालांतराने ख्रिश्चन संप्रदायांमध्ये हा शब्द कबरवर लिहिण्याची प्रथाच रुढ झाली. त्यानंतर रोमन काळात कॅथलिक प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थनेसाठी सर्रास वापरला जाऊ लागला.

दरम्यान, १७ व्या शतकात यूकेमध्ये कॅथेलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि ऑरेंज ऑर्डरची निर्मिती झाली. यूकेमधील प्रोटेस्टंटांचे समूळ उच्चाटन करणे, हे आपल्या जीवनाचे इति कर्तव्यच असल्याची भावना कॅथेलिकांमध्ये निर्माण झाल्याने ते प्रोटेस्टंटचा दुस्वास करु लागले.

त्यातच २०१७ साली उत्तर आयर्लंडमध्ये ऑरेंज ऑर्डरच्या सदस्यांनी प्रोटेस्टंटना RIP हा शब्द वापरण्यास बंदी घातली. यानंतर प्रोटेस्टंटांमधील एका गटाने ऑरेंज ऑर्डरच्या निर्णयाचे स्वागत केले. तर दुसरा गट आजही विरोध करताना दिसत आहे.

प्रोटेस्टंटांमधीलच इवांजेलिकल प्रोटेस्टंटांनी RIP च्या वापरास बंदीला मान्यता दिली आहे. इवांजेलिकल प्रोटेस्टंट सोसायटीच्या सचिव वालेस थॉम्पसन यांनी बीबीसी रेडिओच्या टॉकबॅक कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, RIP ही मृतांसाठी प्रार्थना करताना वापरले जाते. आणि बायबलच्या सिद्धांताच्या हे विरोधात असल्याने, आम्ही रेस्ट इन पीस शब्दाचा वापर न करण्यास सर्वांना प्रोत्साहित करु. त्यासोबतच थॉम्पसन यांनी आपल्या फेसबुक वॉलवरुनही पोस्ट लिहून RIP शब्दाचा वापर थांबवण्यासाठी आवाहन केले.

तर दुसरीकडे प्रेस्बिटेरियन चर्चचे माजी मॉडरेटर डॉ. केन नेवेल यांनी थॉम्पसन यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. प्रेस्बिटेरियन केन नेवेल यांच्या मते, जेव्हा लोक सोशल मीडियावर रेस्ट इन पीस शब्द वापरतात, तेव्हा ते एकप्रकारे स्मरण आणि शुभेच्छा देत असतात.आजही या वादाला पूर्णविराम मिळालेला नाही.

दुसरीकडे भारतीय विशेष करुन हिंदू संस्कृतीत मानवी शरिर नश्वर असून, आत्मा अमर असल्याची धारणा आहे. त्यामुळे हिंदू धर्मात मृत व्यक्तीला मुखाग्नी दिला जातो. मुखाग्नीनंतर त्याचे शरीर पंचत्वातविलीन झाले, असे म्हटले जाते. कारण, श्रीमत भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील २३ व्या श्लोकानुसार,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

अर्थात आत्म्याला ना शस्त्रांनी कापता येते, ना अग्नीने जाळता येते, ना पाण्याने भिजवता येते, ना वाऱ्याने वाळवता येते.त्यामुळे हिंदू संस्कृतीत नश्वर शरिराला आग्नीला समर्पित केलं जातं. त्यामुळे एखाद्याच्या निधनानंतर रेस्ट इन पीसच्या ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरला जातो.

त्याचा परिणाम आता दिसत आहे. लता दीदि आणि बप्पीदांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सेलिब्रेटींकडून ट्विट करण्यात आले, त्यात अनेकांकडून ॐ शांती हाच शब्द प्रयोग करण्यात आला. त्यामुळे आता हा मतप्रवाह एकार्थाने रुढ होताना दिसत आहे. अजय देवगन, अक्षय कुमारसह अनेक नेटकऱ्यांनी रेस्ट इन पीस ऐवजी ॐ शांती हाच शब्दप्रयोग वापरला आहे. त्यामुळे नव्या पीढिच्या अनुषंगाने ही आपल्या सर्वांसाठी सकारात्मक बाब आहे, असेच म्हणावे लागेल.