रविवारी सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मुजफ्फरपूरमध्ये एक वक्तव्य केलं. पण त्यांच्या एका वक्तव्यानंतर, जणू त्यांनी घोर पापच केलंय, असा काहीसा गजहब माजवला जात होता. तसेच यावर त्यांनी देशातील जवानांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते तर राजधानी दिल्लीत, मोहनजींच्या विरोधात घोषणा देऊ लागले. आणि त्यात कहर म्हणजे, पक्षाचे शीर्ष नेतृत्व. त्यांच्याबद्दल काय बोलणार. कारण ज्या व्यक्तीला मोहनजींचं पूर्ण नाव देखील व्यवस्थित घेता येत नव्हतं. (कारण काल ते माध्यमांना प्रतिक्रिया देतांना मोहन भागवत ऐवजी मोहन भगवत बोलत होते) असे हे साहेब मोहनजींनी जवानांचा आपमान केला. त्यामुळे त्यांनी आणि रा. स्व. संघाने माफी मागितलीच पाहिजे,अशी मागणी केली.
विशेष म्हणजे, काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन हे देखील साधूपणाचा आव आणत होते. संघाने देशासाठी काय केलं याचा पुरावा द्या, असं भाजप प्रवक्ते माधव भांडारींना उद्देशून बोलत होते. त्याला भांडारींनी योग्य उत्तर दिलं खरं. पण ज्या मुद्द्यावरून विरोधक पराचा कावळा करत होते, त्यावर त्यांनी कधी संघ समजून घेतलाय का? हेच त्यांना विचारायला पाहिजे.
कारण, देशाला जेव्हा-जेव्हा गरज पडली,तेव्हा संघ स्वतःहुन पुढे आला. मग ते1962 चं युद्ध असो, किंवा त्सुनामीचं संकट. प्रत्येक वेळी संघाने कोणतीही अपेक्षा न ठेवता पुढं येऊन काम केलंय. काश्मीर विलय प्रक्रियेवेळी देखील,गोळवलकर गुरुजींच्या आदेशानुसार संघाचे स्वयंसेवक भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून पाकड्यांशी लढले.1962 च्या भारत-चीन युद्धात ही सैन्याच्या मदतीसाठी संघानेच धाव घेतली. जखमी सैनिकांसाठी 3000 छावण्या उभारुन त्यांच्यावर उपचार केले. त्याशिवाय, लष्करातील जवानांना युद्धात लागणारी रसद वेळोवेळी पोहचवली. युद्धजन्य परिस्थितीत स्वतःच्या जिवाची जराही परवा त्यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी केली नाही. जर युद्धात शत्रू सैन्याची गोळी लागून मृत्यू झाला, तर त्याची दखल देशात घेतली जाणार नाही,हे माहीती असताना स्वयंसेवकांनी ते केलं. त्यामुळेच नेहमी संघाचा दुस्वास करणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं संघाला निमंत्रण दिलं.
त्सुनामी संकटावेळीही संघानेच मदत कार्यासाठी पुढाकार घेतला. त्सुनामीमध्ये ज्यांचा जीव गेला, त्या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासही पुढे येत नव्हतं,अशावेळी संघ स्वयंसेवकांनीच पुढाकार घेत, सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. एवढंच कशाला मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावेळी देखील अनेक स्वयंसेवक मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते. अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील. त्यामुळे संघावर टीका करण्यापूर्वी संघाचं काम आणि त्यांची क्षमता सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजेत.
वास्तविक, संघ स्वयंसेवकांना ही ऊर्जा शाखा आणि दरवर्षी होणाऱ्या संघ शिक्षावर्गातून मिळते. संघाचे चार वर्ग तालुका स्तरावरुन ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजित केले जातात. या चारही वर्गातून स्वयंसेवकाची मानसिक आणि शारीरिक तयारी करुन घेतली जाते. ही तयारी करतानाही त्यासाठीचं पोषक वातावरण तयार केलं जातं. मोकळ्या वातावरणात,सात दिवसाचं प्राथमिक, 20-20 दिवसाचं प्राथमिक आणि द्वितीय, तर 25 दिवसांचं तृतीय संघा शिक्षा वर्ग, या चारही संघ शिक्षा वर्गातून स्वयंसेवकांना घडवलं जातं. आणि स्वयंसेवक घडवण्याचं काम हे आज सुरु झालं नाही, तर संघाच्या स्थापनेपासून सुरु झालंय.
1925 रोजी डॉक्टर हेडगेवारांनीच संघ शिक्षा वर्गाची सुरुवात केली. त्यांना स्वयंसेवकांना लष्करी पद्धतीचं शिक्षण द्यायचं होतं. पण यातली शास्त्रोक्त माहिती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला दर रविवारी ते लष्करातील मित्रांना बोलवून, लष्करी शिस्तीचं शिक्षण स्वयंसेवकांना देत होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात संघाचा गणवेश लष्करी गणवेशाचा अंतर्भाव होता. संपूर्ण खाकी गणवेश, इंग्रजी आज्ञा, क्रॉस बेल्ट, खांद्यावर आर.एस.एस.चे बिल्ले असं तेव्हा गणवेशाचं स्वरुप होतं.
जून 1927 रोजी संघ विस्ताराच्या हेतूने डॉक्टरांनी नागपुरातीलच मोहिते वाडा इथं40 दिवसाचं शिबीर भरवलं. या शिबिरात अनेक स्वयंसेवक सहभागी होते. त्यांना लष्करातील शिक्षणासह इतर काही गोष्टी शिकवण्यात आल्या. पण यात शिस्त हा महत्त्वाचा विषय होता. बौद्धिक वर्गासह शारिरीक कसरती, लाठी-काठी आदीचं शिक्षण दिलं गेलं. पूर्वी याला ओ.टी.सी. म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प किंवा अधिकारी शिक्षण वर्ग म्हटलं जायचं. याच क्रमातून पुढे जाऊन दहा दिवसाचं आय.टी.सी. म्हणजे इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कॅम्प सुरु झालं. सध्या यातीलच एक आठवडा चालणाऱ्या वर्गाला ‘प्राथमिक शिक्षा वर्ग’म्हटलं जातं.
तालुकास्तरावरुन सुरु झालेली ही संघ शिक्षा वर्गाची मालिका संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात येऊन थांबते. ज्या स्वयंसेवकांनी संघाचे प्राथमिक, प्रथम आणि द्वितीय शिक्षा वर्ग पूर्ण केले आहेत. त्या सर्व स्वयंसेवकांचं नागपुरात एकत्रिकरण होतं. जवळपास 30 दिवस देशाच्या विविध भागातले आलेले स्वयंसेवक एकत्र राहतात. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची मित्रत्वाची बंधुत्वाची भावना निर्माण झालेली असते. तृतीय वर्गातील संघ शिक्षा वर्गात केवळ स्वयंसेवकच नव्हे, तर संघाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी ही सहभागी होतात. त्या अधिकाऱ्यांना जवळून भेटण्याची संधी मिळाल्याने, स्वयंसेवकांचे मानसिक मनोबल उंचावले असते. या सर्व अधिकाऱ्यांचे अनुभव, काम करण्याची तळमळ, यातून स्वयंसेवक भारावून जातात. आणि तेही असेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतात. अन् यातूनच संघ प्रचारक तयार होतात. हे प्रचारक देशाच्या विविध भागात जाऊन कठीण प्रसंगातही राहुन तरुणांना संघटीत करण्याचं काम करतात.
संघाचं हेच काम गेली 90 वर्षे अविरतपणे सुरु आहे. या सर्वांची एकच भावना असते, आणि ती म्हणजे "परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं". याच भावनेने संघाचे स्वयंसेवक काम करत असल्याने, संघ कार्य दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉ. हेडगेवारांनी आपल्या पाच सहकार्यांसोबत सुरु केलेलं काम, आज संपूर्ण जगात विस्तारलेलं आहे. आणि भविष्यातही ते वाढतच राहिल. त्यामुळे संघावर टीका करणाऱ्यांनी संघाचे काम, त्याची कार्यपद्धती समजून घेतली पाहिजे.