Friday 14 October 2016

दहशतवाद्यांची फॅक्टरी

उरी हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे, अशी एकच हाक गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिली जात होती. त्याला केंद्राचाही सकारात्मक प्रतिसाद मिळला, अन् गुरुवारी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या घटनेला 48 तास उलटले नाहीत, तोच पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली. भारताला सर्जिकल स्ट्राईक काय असताता, हे आम्ही दाखवू अशी धमकी हाफिज देत आहे. संयुक्त राष्ट्रांनी सईदला 26/11च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले, पण तरीही हा नाग फणा काढून फुत्कारतो आहे. अन् त्याला पाकिस्तानही पाठीशी घालत आहे.
वास्तविक पाकिस्तानची ही दुतोंडी भूमिका काही नवी नाही. काश्मीरविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला नेहमीच खतपाणी घातले. यालाही अमेरिकेचे वेळोवेळी पाठबळ मिळाले. व्हिएतनाम युद्धापासून ते 1990 पर्यंतच्या काळातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हियत रशिया आणि अमेरिका ही दोन बलाढ्य राष्ट्रे समोरासमोर येऊन ठेपली होती. एकमेकाचा वचपा काढण्यासाठी हे दोन्ही देश छोट्या राष्ट्रांचा सदैव वापर करत आली आहेत.
यासाठी सोव्हिएत रशियाने अमेरिकेच्या खालोखाल असलेल्या क्युबाचा, तर अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरले. पाकच्या राज्यकर्त्यांनीही याचा पुरेपुर वापर करुन अमेरिका आणि अरबांकडून बक्कळ पैसा उखळला. अन् तोच पैसा आफगाणमधील तालिबान्यांना आणि मुजाहिद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या काळात पाकस्तानचे मेजर जनरल झिया उल हक यांनी शीतयुद्धाच्या काळात तब्बल 500 अब्ज यूएस डॉलर उखळले. तर सौदी राजपुत्रांनी याच कालावधीत 3.5 अब्ज यूएस डाँलर झियांनी घशात घातले. सेव्हियतांना रोखण्यासाठी आणि आखाती देशातले तेल मिळवण्यासाठी अमेरिकेनेही कधी आखडता हात घेतला नाही. अमेरिकेकडून अब्जावधी डाँलर्सची वाहती गंगा सुरुच राहिली.
अमेरिकेच्या सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी एकप्रकारे अफगाणिस्तानात जिहादची फॅक्टरीच उघडली. आखाती देशातील कोवळा कच्चा माल उचालायचा, अफगाणिस्तानच्या टेकड्यांमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करायची आणि हेच प्रॉडक्ट आखाती देशातील प्रस्थापितांविरोधात त्यांना धक्के देण्यासाठी वापरायचं. हेच उद्योग अमेरिका आणि पाकिस्तान विनासयास करत होतं.
यातूनच मग कालांतराने या जिहादी प्रोडक्टचे विविध गट होण्यास सुरुवात झाली, ओसामाची अल कायदा, आयमान जवाहिरीची पूर्वीची अल-जिहाद, सय्यद अबुल अला मौदुदीची जमाते इस्लामी, मौलाना मुहम्मद इलियास अल कंन्धालवीची तिबलिघ, तिबलिघमधूनच फूटून बाहेर पडलेली दावत-ए-इस्लामी, हफिज-मुहम्मद सईद व झफर इक्बाल या दोन प्राध्यापकांनी लाहोर मध्ये सुरु केलेल्या अहल-ए-हदीथ मदरशातून तयार झालेली जमातुद दावा म्हणजेच लष्कर-ए-तोयबा,बेतुल्लाह मेहसूदची तेहरीक-ए-तालिबान अशा अनेक संघटना पाकिस्तानमध्ये वाढल्या. दहशतवादी संघटनांसाठी या नंदनवनच बनल्या.
अमेरिकेतल्या 9/11 नंतर अमेरिकेचे डोळे खाडकन उघडल्यानंतर अमेरिकन राज्यकर्त्यांनी आपला हात आखडता घेतला. 9/11 च्या हल्ल्यानंतर बुश प्रशासनाने गुड मुस्लीम आणि बॅड मुस्लीमची सरमिसळ घालून आखाती देशाविरुद्ध युद्ध पुकारले. बुशनंतर सत्तारुढ झालेल्या ओबामांनीही तोच कित्ता गिरवला. एकीकडे जगाला शांततेचा दूत दाखवून दुसरीकडे मात्र 9/11चा मास्टर माईंड ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी लष्कराला रान मोकळे करुन दिले. अन् 2011 त्याचा पत्ता लागल्यानंतर त्याचा खात्मा केला.
पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं, पाकिस्तानच्या स्वार्थी राजकारण्यामुळे पाकिस्तान हा देश जिहादची फॅक्टरी बनली होता. काश्मीरला काहीही करुन भारतापासून विलग करायचेच यावरुन त्यांनी विविध गटांना सदैव पाठीशी घातलं. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांनीही वाज खान या पाकिस्तानातील दिग्गज पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमध्ये आपण कशाप्रकारे जिहादची फॅक्टरी चालवतोय याचे दाखले दिले. या मुलाखतीत मुशर्रफांनी लादेन, मौलाना जलालुद्दीन हक्कानी, जवाहिरी हे पाकिस्तानचे हिरो असल्याचं सांगितलं. पण यावेळी खानने मुशर्रफने हाफिज सईदवर कारवाई संदर्भात विचारले, तेव्हा मात्र त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणून वेळ मारुन नेली. आजही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना दहशतवादी हिरोच वाटत आहेत. त्यामुळेच राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांना बुरहान वानी काश्मीरमधील युवा नेता वाटतो.
एकीकडे यूनोच्या व्यासपीठावरुन दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही इतरांसोबत आहोत, असं सांगायचं, पण दुसरीकडं मात्र, दहशतवाद्यांना पाठीशी घालायचे उद्योग पाकिस्तानी राज्यकर्ते इमाने इतबारे करत आहेत. विशेष म्हणजे आता याला चीनी ड्रॅगनचीही साथ मिळत आहे. चीनने वारंवार व्हीटोचा वापर करुन जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला वाचवले आहे. त्यात हाफीज सईदही फणा काढून बसला आहे. राजरोस हे दोन्ही साप भारताविरोधात फुत्कारत आहेत. तसेच अनेक देशांमधून दहशतवादी कुरापती घडवून आणत आहेत.
त्यामुळे यांना ठेचून काढण्यासाठी संयु्क्त राष्ट्राने दहशतवादाचे नंदनवन बनलेल्या पाकिस्तानला टेररिस्ट नेशन घोषित करण्याची गरज आहे.यासाठी अमेरिकेत जी मोहीम सुरु आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेत वसलेल्या भारतीयांनी व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील ‘वुई द पीपल’ सुविधेत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमधील मागणीला आतापर्यंत 5 लाखहून अधिक नागरिकांनी समर्थन दिले आहे. आता अशीच मोहीम इतर युरोपीयन देशांसोबत आखाती आणि एशियाई देशांनी सुरु केल्यास जनभावनांचा आदर राखून संयुक्त राष्ट्राला पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र घोषित करणे भाग पडेल. त्यावेळी चीनलाही आपले घोडे दामटवता येणार नाही हे नक्की!

http://abpmajha.abplive.in/blog/prasanna-joshis-blog-on-pakistan-terrorism