Thursday 26 November 2020

वारसदार


काल बीबीसी मराठीवर एक लेख वाचनात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘शरद पवार हे अजित पवार यांना वारसदार करणार नाहीत,वक्तव्याचा संदर्भ देऊन विश्लेषण केले होते. हे विश्लेषण करताना महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पत्रकार जे संपादक स्तरावरचे होते, त्यांच्या प्रतिक्रीया देण्यात आल्या होत्या. त्यात काही बँलेंन्स होत्या, तर नेहमीप्रमाणे पवार साहेबांच्या गुड लिस्ट राहण्यासाठी दिलेल्या प्रतिक्रीया होत्या.

यामध्ये पवार साहेबांचा राजकीय वारसदार कोण? याचे सखोल विश्लेषण करताना शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया ताई सुळे यांना यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे संदर्भ देण्यात आले होते. यापैकी गेल्या वर्षी महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना नेहमीप्रमाणे गुगली टाकत पवार साहेबांनी सांगितलं होतं की, सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्या आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे. आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांना अधिक रस असल्याचे पवार साहेबांनी सांगितलं होतं.

पवार साहेबांच्या या उत्तराचा बारकाईने अभ्यास केल्यास, खरंच सुप्रिया ताईंना राष्ट्रीय राजकारणात रस आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण, त्या राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणातच जास्त रस दाखवतात हे वेळोवेळी दिसून येतं. मग ते उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यातील त्यांचा वावर असो, किंवा राज्यातील इतर विषयात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय विषयांपेक्षा राज्यातील विषयांतच त्यांना जास्त स्वारस्य असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे पवार साहेब जे म्हणतात, ते कितपत वरवरचं आहे, हे सहज लक्षात येईल.

दुसरं विषय हा की, आपला वारसच नेमायचा विषय असतो, तेव्हा पुत्र प्रेमालाच नेहमी प्राधान्य दिलं जातं, हे अगदी रामायण- महाभारतापासून आपण पाहत आलो आहोत. एवढंच कशाला देशाच्या राजकारणात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला आपला राजकीय वारस निश्चित करण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, त्या-त्या वेळी गांधी घराण्याचेच पारडे जड राहिले. राज्याचा विचार केला, तर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपला राजकीय वारस नेमताना राज ठाकरेऐवजी उद्धव ठाकरेंनाच प्राधान्य दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा आपला राजकीय वारस म्हणून आदित्य ठाकरेंलाच प्राधान्य देत आहेत.

याच लेखात प्रताब असबे यांची बीबीसीने प्रतिक्रीया जाणून घेतली, त्यावेळी प्रताब असबेंनी वारसदार हा लोकांनीच ठरवायचा असतो. पवारांनीही आपलं हे मत बोलून दाखवल्याचं सांगितल्याचं त्यांचं म्हणणं होतं. असं होतं, मग गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईंना निवडणून आणण्यासाठी पवारसाहेबांनी बारामतीतच का ठाण मांडलं होतं हे उत्तर त्यांनी द्यायाला हवं होतं.

एवढंच कशाला पवार साहेबांनी ज्या पद्धतीने रोहित पवारांना नेतृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन विधानसभेत निवडून आणलं, तशी संधी पार्थ पवारांना का दिली नाही. पार्थ पवारांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणून त्यांच्याकडून ही संधी का हिरावली. त्यामुळे पवार साहेबांना सुप्रिया सुळेंशिवाय दुसरं कोणीही नको आहे हे वारंवर सिद्ध होत आहे. त्यामुळे पवार साहेबांचा राजकीय वारस सुप्रिया ताईच असतील हे कुणीही डोळे बंद करुन सांगेल.

Wednesday 4 November 2020

पत्रकारिता खरंच खतरे में हैं?


रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर 
काल अलिबाग पोलिसांकडून अटकेची कारवाई झाली. यानंतर अर्णव गोस्वामी यांच्यासह भाजपाने ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना मात्र, ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारेच केल्याचे बोलत आहेत. दुसरीकडे या कारवाईनंतर पत्रकारितेमध्ये दोन गट असल्याचे सरळसरळ दिसत आहे. अनेक पत्रकारांना अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा मनस्वी आनंद साजरा करत ने आहेत. तर काही निवडक पत्रकार अर्णव यांच्यावरची कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याने, त्याला विरोध केला आहे. पण अर्णव यांच्यावरील कारवाईच्या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होत आहे, तो म्हणजे पत्रकारिता खरंच खतरे में हैं?

प्रथम दर्शनी तर याचे उत्तर होच असेच मिळेल. कारण या अनुषंगाने काल रात्री झी न्यूजचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुधीर चौधरी यांनी आपल्या डी.एन.ए. कार्यक्रमात या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासोबतच त्यांनी आपली आपबिती कथन करताना, रिटायरमेंट नंतर काय? पत्रकारांनी आपल्या उमेदीच्या काळात अंगावर घेतलेल्या केसेसच्या तारखांदिवशी कोर्टाच्या चक्राच मारायच्या का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्याचा विचार केला, तर यामागचे भीषण वास्तव समोर येईल.

कारण एखाद्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर काही काळ त्या संस्थेचे मॅनेजमेंट त्या पत्रकाराला सपोर्ट करते. मात्र कालांतराने कातडी बचाव धोरण अवलंबते, हे वास्तव आहे. क्वचितच संस्थांचे मॅनेजमेंट त्या पत्रकारांच्या पाठिमागे शेवटपर्यंत उभे राहते. कारण तो पत्रकार त्या संस्थेचा ब्रँड असतो. त्यामुळे ब्रँड व्हॅल्यूसाठी कोणतीही संस्था काहीही करु शकतो, हे कॉर्पोरेट कल्चर आहे. मात्र, जर तो चॅनेलचा ब्रँड नसेल, आणि जर कोरोना सारखी स्थिती आली, आणि कॉस्टकटिंगमध्ये त्या पत्रकाराचा बळी घेण्यात मॅनेजमेंट कधीही मागेपुढे पाहात नाही. त्यानंतर अंगावर असलेल्या केसेस त्याला स्वत:लाच लढाव्या लागतात. त्यात वेळ, पैसा जातो तो वेगळाच. सध्याच्या घडीला अनेक पत्रकार हा अनुभव घेत आहेत. कारण कोरोनामुळे अनेक पत्रकारांना नारळ मिळालेला आहे. असो...

पण मुद्दा हा की, सुधीर चौधरी यांचे म्हणणे कुणीही गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. वास्तविक, सुधीर चौधरी यांच्याप्रमाणेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही काल आपल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित पत्रकारांना सतर्क केलं आहे.  सर्व पत्रकारांसाठी ही धोक्याची घंट असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. पण ही धोक्याची घंटा कितीजणांना लक्षात आली? हा प्रश्न आहे. असो....

वास्तविक, अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही दिवसात जी भूमिका घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर पोलिसी दांडका कधीही फिरणार हे सर्वांनाच कळून चुकले होते. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनीही शरद पवारांनी अर्णवला आवरण्याची सुचना केल्याचे विश्लेषणातून स्पष्ट केले होते. दुसरीकडे रिपलब्लिकन टीव्हीने काही दिवसांपूर्वी जे स्टिंग ऑपरेशन केले होते, त्यात नवाब मलिक यांनीही अर्णव यांच्यावर पोलिसी दंडुका चालणार हे स्पष्ट केलं होते. त्यानुसार ते झालं ही. त्यामुळे ज्या पत्रकारांना अर्णवच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टार रिपोर्टर भंडारीने हिणवले होते, त्यांना अर्णवच्या अटकेनंतर आनंद होणे स्वाभाविक आहे.



मात्र, ही कारवाई सूडबुद्धीने नाही तर पोलिसांकडे दाखल तक्रारीवरुन केल्याचा दावा ज्या पत्रकार संघटनांकडून होत आहे. तो किती हस्यास्पद आहे, हे यामागची घटना घडामोडी जाणून घेतल्यानंतर लक्षात येईल. वास्तविक, हे प्रकरण 2018 मधील या प्रकरणात एक वर्षाच्या तापानंतर रायगड पोलिसांनीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. तर मग दोन दिवसांपूर्वी अन्वय नाईक यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटल्यानंतरच ही फाईल पुन्हा का ओपन करण्यात आली? दुसरा प्रश्न म्हणजे, अन्वय नाईक आणि त्यांच्या पत्नी यांचे संबंध ताणले होते. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी हे दोघेही वेगवेगळं राहत होते. तर मग आताच का अन्वय नाईक तावातावाने बोलत आहेत. आणखी एक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अन्वय नाईक यांच्या पत्नीने अर्णव यांच्या सह फिरोज शेख आणि नितेश सारडा या दोघांची नावं घेतली. या दोन्ही नावांचा सुसाईड नोट मध्येही उल्लेख आहे. या दोघांपैकी फिरोज शेख यांच्याकडून चार कोटी आणि नितेश सारडा यांच्याकडून 55 लाखाचे येणे बाकी असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. तर मग त्या दोघांवर कारवाई का नाही?

पुढचा प्रश्न म्हणजे, रायगड पोलिसांनी 2018 मध्येच याच्या सखोल चौकशीअंती क्लोजर रिपोर्ट देऊन बंद केली होती. त्यामुळे ती पुन्हा ओपन करायसाठी जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेणं अपेक्षित होते, तशी ती परवानगी का घेतली नाही? आणखी एक अर्णव यांना अटकेसाठी इनकाऊंटर स्पेशलासिस्टलाच का पाठवण्यात आले, असे एक ना अनेक प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीने नसून वैयक्तीक असल्याचं म्हणणे म्हणजे बाळबोधपणाचे लक्षण आहे. त्यामुळे भाऊ तोरसेकरांच्या विश्लेषणानुसार, अर्णवला आवरण्यासाठीच ही कारवाई असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

दुसरं म्हणजे, अर्णव वरील कारवाईवरुन जे पत्रकार आज आनंद साजरा करत आहेत. त्यांनी खरंच आपण पत्रकारिता करत आहोत की, पीआर एजन्ट आहोत, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. कारण अर्णव यांची सादरीकरणाची, त्यांच्या वैचारिक बांधिलकीशी अनेकांचे मतभेद असू शकतात. पण ते देखील पत्रकार आहेत हे विसरुन चालणार नाहीत. यापूर्वी 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली होती. त्यावेळी देखील सरकारचं लागुलचालन करणारे पत्रकार पोलिसी खाक्यापासून वाचले होते. तर जे सरकारच्या विरोधात प्रामुख्याने इंदिरा गांधींच्या विरोधात बोलत होते, त्यांना अशाच प्रकारे पकडून तुरुंगात डांबलं जात होतं. आज ज्या पत्रकारांना अटक झाली आहे. त्यापैकी कुणीही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत दाखवलेली नाही. त्यामुळे आज ते सुपात आहेत. पण ते ज्यावेळी तशी भूमिका घेतली, त्यावेळी त्यांना आपली चूक लक्षात येईल. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. केवळ पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही असणार नाही. त्यामुळेच आज पत्रकारिता खरंच खतरे में वाटत आहे....